ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी दिल्लीतील कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या 'चलो संसद' आंदोलनादरम्यान त्यांना आलेल्या अनुभवाविषयक सांगितले. अश्रुधुराच्या माऱ्यामुळे त्यांना दम्याचा झटका आला होता, मात्र जवळ इनहेलर असल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, आपण कोणत्याही राजकीय पक्षाच्या किंवा नेत्याच्या विरोधात नसून विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांच्या समर्थनासाठी आंदोलनात सहभागी झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांनी काढलेल्या 'चलो संसद' मोर्चात ७५ वर्षीय शबाना आझमी सहभागी झाल्या होत्या. परीक्षांमधील कथित अनियमिततेविरोधात आणि शैक्षणिक सुधारणांच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी त्या जंतर-मंतर येथे पोहोचल्या होत्या. याचवेळी अश्रुधुराचा सामना करावा लागल्याने त्यांना दम्याचा त्रास सुरू झाला.
एका मुलाखतीत शबाना आझमी म्हणाल्या, "मला दम्याचा त्रास आहे. अश्रुधुरामुळे मला झटका आला, पण माझ्याकडे इनहेलर होता. त्यामुळे मी स्वतःला सावरू शकले. मला जवळच्या इमारतीत सुरक्षित नेण्यात आले. श्वासोच्छ्वास पूर्ववत झाल्यानंतर मी पुन्हा आंदोलनस्थळी परतले आणि लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची भेट घेतली." "त्यांचा उत्साह अभूतपूर्व आहे. त्या सर्वांना माझा सलाम," असे त्या म्हणाल्या.
सीजेपी आंदोलनात सहभागी होण्यामागचे कारण स्पष्ट करताना शबाना आझमी यांनी सांगितले की, त्यांनी आणि त्यांचे पती, ज्येष्ठ गीतकार व पटकथालेखक जावेद अख्तर यांनी सुरुवातीला हा विषय थेट आंदोलनाऐवजी संवादातून सोडवण्याचा प्रयत्न केला होता.
शबाना यांच्या म्हणण्यानुसार, १५ जुलै रोजी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहून हवामान कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्याशी संवाद सुरू करण्याची विनंती केली होती. हे पत्र सार्वजनिक न करता केवळ गोपनीय स्वरूपात पाठवण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
"आम्हाला दोन दिवसांत याबाबत माहिती दिली जाईल, असे सांगण्यात आले होते. आम्ही बराच काळ प्रतिसादाची वाट पाहिली. मात्र कोणताही ठोस प्रतिसाद न मिळाल्याने अखेर विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आम्ही आंदोलनस्थळी जाण्याचा निर्णय घेतला," असे शबाना आझमी यांनी सांगितले.
दरम्यान, आंदोलनात बॉलीवूडमधील मोजकेच कलाकार उपस्थित असल्याच्या प्रश्नावरही शबाना यांनी प्रतिक्रिया दिली. "फक्त चित्रपटसृष्टीतील लोक उपस्थित आहेत की नाही, यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आंदोलनाचा मूळ मुद्दा समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे. या विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे गंभीरतेने पाहिले पाहिजे," असे त्या म्हणाल्या.