ramanand sagar ram vs ranbir kapoor in ramayana what made people worship arun govil as god know umargaon miracle
पुढारी ऑनलाईन :
‘रामायणम्’चा टीझर रिलीज झाल्यानंतर भगवान रामाच्या भूमिकेत दिसणाऱ्या रणबीर कपूर याच्या लूकला मिश्र प्रतिसाद मिळत आहे. त्याची तुलना अरुण गोविल यांच्याशी केली जात आहे, ज्यांनी रामायण या मालिकेत भगवान रामाची भूमिका साकारली होती. पण नेमकं असं काय होतं, ज्यामुळे अरुण गोविल लोकांसाठी ‘राम’ आणि पुढे ‘देव’ बनले?
‘रामायणम्’चा मध्ये रणबीर कपूर भगवान रामाची भूमिका साकारणार असल्याची बातमी समोर आल्यानंतरच यावर मोठी चर्चा सुरू झाली होती. लोकांमध्ये प्रश्न होता की रणबीर कपूर ‘मर्यादा पुरुषोत्तम राम’च्या भूमिकेत योग्य दिसेल का? तो या पवित्र भूमिकेला न्याय देऊ शकेल का? सोशल मीडियावरही यावर मतभेद दिसून आले.
आता ‘रामायणम्’चा टीझर रिलीज झाल्यानंतर रणबीर कपूरचा रामाच्या रूपातील पहिला लूक समोर आला आणि लोक आश्चर्यचकित झाले. त्याच्या लूकला मिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. काहींना त्यांचे एक्सप्रेशन योग्य वाटले नाहीत, तर काहींनी त्यांच्या हावभावांवर प्रश्न उपस्थित केले. अनेकांनी त्याची तुलना अरुण गोविल यांच्याशी केली.
गेल्या ३९ वर्षांत अनेक अभिनेत्यांनी रामाची भूमिका साकारली, पण अरुण गोविल यांच्यासारखी सौम्यता, गुण आणि संस्कार फार कमी लोकांमध्ये दिसले. त्यामुळेच प्रेक्षकांना त्यांच्यात देवाचे रूप दिसले आणि त्यांनी त्यांची पूजा करण्यास सुरुवात केली.
सुरुवातीला अरुण गोविल यांना नाकारण्यात आले होते
अरुण गोविल यांनी एका मुलाखतीत सांगितले की, सुरुवातीला रामानंद सागर यांनी त्यांना रामाच्या भूमिकेसाठी नाकारले होते. ‘विक्रम आणि बेताळ’च्या काळात त्यांना ‘रामायण’बद्दल समजले आणि त्यांनी ऑडिशन दिले, पण त्यांची निवड झाली नाही.
रामानंद सागर यांच्या मुलांनी प्रेम सागर, मोती सागर आणि आनंद सागर त्यांना भरत किंवा लक्ष्मणाची भूमिका करण्याची ऑफर दिली होती. पण अरुण गोविल यांनी स्पष्ट सांगितले की, त्यांना रामाचीच भूमिका करायची आहे. शेवटी काही दिवसांनी त्यांना पुन्हा बोलावण्यात आले आणि रामाची भूमिका देण्यात आली.
६ महिन्यांची मेहनत ‘राम’ बनण्यामागचे रहस्य
प्रेम सागर यांनी सांगितले की, अरुण गोविल यांची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्यांची हलकी, मोहक स्मितरेषा होती. ही स्मितरेषा परिपूर्ण करण्यासाठी त्यांनी जवळपास ५-६ महिने मेहनत घेतली. त्यानंतर त्यांना ‘विक्रम आणि बेताळ’मध्ये भूमिका मिळाली आणि पुढे ‘रामायण’मध्ये रामाची भूमिका मिळाली.
शारीरिक बांधा आणि जबरदस्त स्मरणशक्ती
अरुण गोविल यांचा शारीरिक बांधा देखील रामाच्या भूमिकेसाठी अगदी योग्य होता. त्यांच्या शरीराची प्रमाणबद्ध रचना ही एक मोठी जमेची बाजू होती. त्यांची स्मरणशक्तीही विलक्षण होती. ते चार-चार पानांचे संवाद सहज पाठ करून सुंदर शैलीत सादर करत. त्यांचा राजेशाही लूक आणि प्रभावी संवादशैली प्रेक्षकांच्या मनावर खोल ठसा उमटवत होती.
जेव्हा अरुण गोविल ‘भगवान’ बनले
‘रामायण’चे काही भाग दिल्लीतील अधिकाऱ्यांना दाखवण्यात आले. ते पाहिल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली – “हे तर भगवान आहेत.” यानंतर जेव्हा प्रेक्षकांनी टीव्हीवर त्यांना पाहिले, तेव्हा त्यांना खरोखरच भगवान राम दिसू लागले.
उमरगावमधील ‘चमत्कार’
गुजरातमधील उमरगाव येथे शूटिंगदरम्यान एक विलक्षण घटना घडली. स्थानिक आदिवासी महिला आपल्या लहान मुलांना अरुण गोविल यांच्या पायांशी ठेवत आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घेत. त्या त्यांच्यात भगवान राम पाहत होत्या.
अरुण गोविल यांना ‘राम’ बनवणारी गोष्ट म्हणजे त्यांची साधी पण प्रभावी स्मितरेषा, त्यांची शरीरयष्टी, संवादशैली, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भूमिकेत पूर्णपणे समरस होण्याची त्यांची तयारी. तसेच रामानंद सागर यांनीही त्यांना चालणे, बसणे, प्रतिक्रिया देणे आणि चेहऱ्यावर योग्य भाव ठेवणे यासाठी विशेष प्रशिक्षण दिले होते. याच सर्व गोष्टींमुळे अरुण गोविल हे प्रेक्षकांसाठी केवळ अभिनेता न राहता ‘भगवान राम’ बनले.