कामाच्या ठिकाणी निर्माण होणारी मैत्री, आकर्षण आणि प्रेम खरंच टिकून राहू शकतं का, या प्रश्नाभोवती फिरणारी ‘प्रेमाला कंडिशन्स अप्लाय’ ही नवी मराठी वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आधुनिक नातेसंबंधातील आव्हाने, भावना आणि करिअर-प्रेम यांच्यातील समतोल यावर आधारित ही मालिका तरुण प्रेक्षकांसाठी खास ठरणार आहे.
प्रेम, करिअर, महत्त्वाकांक्षा आणि नात्यांमधील गुंतागुंत यांचा वेध घेणारी ‘प्रेमाला कंडिशन्स अप्लाय’ ही नवी मराठी ओरिजिनल वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनेता सिद्धार्थ मेनन आणि अभिनेत्री जान्हवी उदय मुख्य भूमिकांमध्ये झळकणार आहेत. या मालिकेचे दिग्दर्शन गौरव पत्की यांनी केले आहे.
‘प्रेमाला कंडिशन्स अप्लाय’ची कथा अनन्या आणि ऋषी या दोन तरुण, यशस्वी आणि महत्त्वाकांक्षी व्यावसायिकांभोवती फिरते. एकाच ऑफिसमध्ये काम करत असताना त्यांची ओळख होते आणि हळूहळू मैत्रीचे रूपांतर प्रेमात होते. समान ध्येय, एकमेकांविषयीचे प्रेम आणि भावनिक जवळीक यामुळे त्यांचे नाते अधिक घट्ट होत जाते. कॉफी ब्रेकमधील संवाद, चोरट्या नजरा, कामाच्या निमित्ताने वाढणारा सहवास आणि उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या गप्पा यामुळे दोघांचे नाते अधिक दृढ होते. मात्र ऑफिसमधील नियम, व्यावसायिक मर्यादा, करिअरच्या अपेक्षा यांमुळे त्यांच्या प्रेमाची खरी परीक्षा सुरू होते.
वेगवान कॉर्पोरेट जीवनशैलीच्या पार्श्वभूमीवर घडणारी ही कथा आहे. वैयक्तिक आनंद आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या यांच्यात समतोल साधताना अनेक कठीण निर्णय त्यांना घ्यावे लागतात. प्रेमासाठी किती मोठी किंमत मोजावी लागू शकते, हा प्रश्न अनन्या आणि ऋषीसमोर उभा राहतो. अनन्या आणि ऋषी यांच्यातील केमिस्ट्री, भावनिक चढ-उतार आणि करिअरच्या वाटेवर येणारी आव्हाने यामुळे कथा अधिक रंजक बनते. ही सीरीज २४ जून, २०२६ रोजी मराठी झी ५ वर प्रदर्शित होणार आहे.
“प्रेमाला सीमा नसतात, असे आपण अनेकदा ऐकतो. मात्र, अनन्या आणि ऋषी यांच्या बाबतीत ही गोष्ट तितकी सोपी नाही. करिअर आणि नातेसंबंध या दोन्हींचा समतोल साधण्याचा प्रयत्न करणारे सहकारी म्हणून त्यांना एकत्र काम करत असताना प्रेम टिकवून ठेवणे किती आव्हानात्मक असू शकते, याची जाणीव होते.गौरव पत्की, दिग्दर्शक
अभिनेता सिद्धार्थ मेनन म्हणाला, प्रेमाला कंडिशन्स अप्लाय’ ही नेहमीसारखी प्रेमकथा नाही, तर जगण्याच्या ताणाखाली उमलणाऱ्या प्रेमाची कथा आहे. ऋषीची भूमिका साकारताना व्यावसायिक मर्यादा आणि वैयक्तिक भावना यांमधील ताण अनुभवण्याची संधी मिळाली. त्याचबरोबर प्रेम आणि जवळीक यांचा अतिशय पारंपरिक, पण तरीही नव्या पद्धतीने शोध घेता आला.