पुढारी ऑनलाईन डेस्क : छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. हिंदवी स्वराज्य संस्थापक, रयतेचा राजा, लोककल्याणकारी राजा श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अतुलनीय पराक्रमाने ही महाराष्ट्राची भूमी पावन झाली आहे. रयतेचा राजा कसा असावा याचा पायंडा छत्रपतींनी रचला. शिवाजी महाराजांच्या अनेकविध गोष्टी आजही समाजाला प्रेरणा देतात. मानवतेचे उत्कट तत्वज्ञान आपल्या आचरणातून सांगणाऱ्या या महान व्यक्तिमत्वाची गौरवस्पद गाथा छोट्या पडद्यावर किर्तनाच्या माध्यमातून 'नाचू कीर्तनाचे रंगी' या शिवजयंती विशेष भागात पहायला मिळणार आहे. १९ फेब्रुवारीला असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने रविवार (दि. २० फेब्रुवारी) रोजी 'नाचू कीर्तनाचे रंगी' हा शिवजयंती विशेष भाग रंगणार आहे.
युवा कीर्तनकार ह. भ. प ज्ञानेश्वर माऊली महाराज पथाडे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्या निरूपणातून सांगणार आहेत. अविश्रांत परिश्रम घेऊन आपले ध्येय सिद्धीस नेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले सर्व आयुष्य वेचले. एका आदर्श स्वराज्याची निर्मीती केली. महाराष्ट्राचा हा जाणता राजा पिढ्यानपिढ्या प्रत्येकासाठी प्रेरणास्त्रोत राहिला आहे. हीच प्रेरणा 'नाचू कीर्तनाचे रंगी' शिवजयंती विशेष भागातून आपल्या चाहत्यांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व सगळ्यांना प्रेरणा देणारे असून त्यांच्यातील प्रत्येक गुण सगळ्यांनीच आत्मसात करण्यासारखे आहेत. आजच्या युवापिढीने छत्रपती शिवाजी महाराजांचे कोणते गुण आत्मसात करायला हवे हे कीर्तनाच्या माध्यमातून युवा कीर्तनकार ह. भ. प ज्ञानेश्वर माऊली महाराज पथाडे सांगणार आहेत. 'नाचू कीर्तनाचे रंगी' या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या संस्कृती परंपरेसोबत वैविध्यपूर्ण सणांची महती कीर्तनाद्वारे सांगितली जाणार आहे.
हेही वाचलंत का?