Abhang Repost Band Journey Pudhari photo
मनोरंजन

Abhang Repost: अभंग रिपोस्ट या बँडची सुरूवात कशी झाली, त्यांचे निकष काय होते?

Abhang Repost: अभंग रिपोस्ट या बँडची सुरूवात कशी झाली, त्यांचे निकष काय होते?

पुढारी वृत्तसेवा

मधली काही वर्षे मराठी रंगमंचाला काहिशी ओहोटी लागल्यागत अवस्था झाली होती. नवे काही घडत नव्हते, सत्तरीतली रुक्मिणी काय पहायची असे टोमणे मारले जात होते. आता ते चित्र बदललेय. रंगमंच गजबजतोय. नवे पर्व सुरु झाले होतेच, आता ते केवळ स्थिरावलेय असे नव्हे तर बहरलेय. मराठी रंगमंचावरच्या काही कलाविष्कारांची ही काही रसग्रहणे आम्ही रसिकवाचकांसाठी डिजिटल आवृत्तीत सादर करण्यास प्रारंभ करतो आहोत आषाढीच्या मुहूर्तावर सुरु करत आहोत या रसग्रहण मालिकेला सुरुवात. अठ्ठावीस युगे पंढपुरात उभ्या असलेल्या अवघ्या महाराष्ट्राला पिसे लावणाऱ्या त्या सावळ्या विठ्ठलाच्या वारीपासून करतोय या अधूनमधून उमटणाऱ्या सदराचा प्रारंभ.

मृणालिनी नानिवडेकर

अभंगवारी @2026

गेली सहा हजार वर्षे विठोबा पंढर पुरात उभा आहे, अवघ्या जगाचा तो पालनकर्ता. महाराष्ट्राचा लोकदेव. तो तसाच कर कटावर घेऊन युगे अठ्ठावीस उभा असला तरी जग थोडेच असे उभे थबकलेय. किती म्हणून बदल झाले आहेत या जगात. पाठवरवंटा गेला मिक्सर आले. भुरजपत्र गेले, बोरु गेली, typewriter गेले मोबाईलवर टायपिंग सुरु झाले. जग आधुनिक झाले, कळीवर चालणारे झाले. नवता आली पण परंपरा कायम ठेवून. पावसाचे चक्र बदलले एलनिनो आले गेले, येतील जातील पण विठोबा तसाच उभा असेल आणि त्याच्या अनावर ओढीने पंढरपूरकडे जाणारी पावलेही तशीच प्रवास करत असतील.

वारी आणि ज्याच्या ध्यासाने हजारो भाविक मजलदरमजल करत पंढरीला पोहोचतात तो विठोबा. ज्याला त्याला स्वभावप्रमाणे भावणारा. आणि कित्येक पिढयांवर तशीच मोहिनी घालणारा. आज पंढरीला जाणारी नवी पिढी खरेच काय विचार करत असेल? भक्तीबद्दल भावना तशीच आहे पण प्रगटीकरण वेगळे. ते वेगळेपण कधी टेकवारीतून माहिती तंत्रज्ञानक्षेत्राशी जोडलेले गेलेले दाखवतात तर कधी अभांग रीपोस्ट अशा कार्यक्रमातून कलाकार.या विठुशी जितकी वारी जोडलेली तितकेच अभांगही.

पिढ्यानपिढ्या उपासकांमध्ये नित्यपाठात ओवी अभंगाचे परंपऱे नुसार चालत आलेल्या चालीत गायन होत असे. खरे तर नित्यपाठ म्हणजे प्रार्थना. या प्रार्थनेचे सूर ठरलेले. त्याला संगीताचा बाज देत ते कलाक्षेत्रात मांडले ते पंडित भीमसेन जोशी यांनी अभन्ग वाणीतून, लता मंगेशकर यांनी संगीतकार श्रीनिवास खळे यांच्या समवेत केलेल्या तुकोबारायाच्या अभंगातून. आजही ही स्वरामोहिनी रसिकांना मोहवते आहे. अर्थात पिढ्या उलटून गेल्या तसे जागतिककरण, वैश्विकीकरण सर्व क्षेत्रात रुजले.ग्लोबल म्युझिक मराठी तरुणाईला आकर्षू लागले.

वेगवेगळ्या प्रेरणा त्यात प्रगटू लागल्या अन मुंबईच्या केसी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या दुष्यन्त देवरुखकरला विराज आचार्य आणि स्वप्नील तरफे या संगीतक्षेत्रातल्या मित्रांबरोबर कार्यक्रम करताना, गप्पा मारताना जाणवू लागले की मराठी मातीत रुजलेले काही करावे. दुष्यन्त ड्रमर, स्वप्नील बास गिटार वाजवणारा आणि विराज ढोलकीचा कलाकार. मराठीत काही करायचे हा ध्यास मनाने घेताच अर्थातच मनात आला विठुराया. सावळ्याचे वेड इथल्या मातीत रुजलेले. ते अभंग बनून आविषकृत करायचे ठरले. अभंग नव्या पिढीपर्यंत पोहोचवायचे म्हणून नाव ठरले अभंग रिपोस्ट.ही आहे आज सर्वत्र गाजणाऱ्या अभंग रिपोस्ट या कार्यक्रमामागची कहाणी. कार्यक्रम करायचा हे तर ठरले. मग मराठी मनावर मोहिनी घालणाऱ्या शेकडो रचनातून नेमके काय निवडायचे आणि रंगमंचावर कशाचा आविष्कार करायचा याचा शोध सुरु झाला.

अभंग रिपोस्ट ब्रँडचे व्यवस्थापक अभिषेक शिंपी सांगतात, ''दोनच निकष ठरवले होते. आजही त्यावरच कायम आहोत. रचनेत संदेश हवा आणि ते उत्तम संगीतातून लोकांपर्यंत पोहोचवता येईल असा बाज देता यायला हवा.'' लोकांना काही सांगायचेय तर ते या कार्यक्रमात केवळ मनोरंजन म्हणून नव्हे तर संदेश म्हणून सांगायचे ठरले, असे स्वप्नील सांगत होते. 25 ते 30 रचना या निकषावर आम्हाला पसंत पडल्या. या तिघांना गायक अजय वाव्हळ, गिटार वाजवणारे प्रतिश म्हस्के येऊन मिळाले होते. विराज यांचा सख्खा भाऊ पियुष आचार्यही बँडचा भाग झाले होते. दोघे आचार्य बंधू नंदिनीताई बेडेकर यांचे शिष्य. नंदिनीताई या गानसरस्वती साक्षात किशोरीताई अमोणकर यांच्या शिष्य.

भारतीय शास्त्रीय संगीत परंपरेतील या भरजरी वस्त्राशी या तरुणांनी मग हळूहळू रंगमंचावर आणि संगीत क्षेत्रात इतिहासच तयार केला. आज सुमारे दहा वर्ष झाली अभंग रिपोर्ट कार्यक्रम होतोच आहे महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या शहरांमध्ये रंगमंचावर महाविद्यालयात विठोबाच्या भक्तीचे सूर गिटार , ड्रम या आधुनिक वाद्यांच्या साथीने घुमू लागतात आणि कार्यक्रमाला आलेले प्रेक्षक या कार्यक्रमाचाच भाग होता कार्यक्रम केवळ ऐकायला आले नाहीत तर वारीला आले आहात असं सांगत सहाही गायक वादक मंडळी सभागृहाला जणू जाग करत असतात.

अभंग आणि पोस्टचा प्रत्येक प्रयोग इलेक्ट्रॉनिक एक्सपिरीयन्स असतो. कशाला पंढरी जातो रे बाबा कशाला पंढरी जातो, यासारख्या विचारणा करत या जगाच्या मनात त्यानं विचार सुरू करावा पासून तर कार्यक्रमाला सुरुवात होते.

या कार्यक्रमात तुकाराम महाराजांचे अभंग आहेत पण समाजाला शिकवण देणाऱ्या तुकडोजी महाराजांच्या सोप्या रचना निवडल्या गेल्या आहेत. त्या सभागृहात शब्दशः माहोल तयार करतात. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव देव बाजारचा भाजीपाला नाही रे देवा अशा न भेटायचं नाही तुकडोजी महाराजांची गाजलेली रचना सुमारे 30 ते 35 मिनिटे आधुनिक वाद्यांच्या सहाय्याने प्रेक्षकांच्या मनावर गारुड करत असते व संदेश द्यायचा आहे तो अशा पद्धतीने या अभंगाच्या माध्यमातून कार्यक्रमात रुजवला जातो की खरोखरच येणारा प्रेक्षक हा आपोआपच भाविक होतो आणि रॅशनल विचार करत या परंपरेचे अर्थ शोधायला लागतो.

'चल ग सखे चल ग सखे पंढरीला' हा असाच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रसिद्ध असलेले गाणे ते सादर करताना अभंग रिपोस्ट मधला सगळा ब्रांड पंढरीच्या वाटेवर उजळून निघालेला असतो. रंगमंचाच्या पार्श्वभूमीवर तंत्रज्ञानाच्या मदतीने दाखवली जाणारी पंढरीच्या वारीची दृश्य तुळशीवृंदावन हातात घेऊन चालणारी एक महिला आणि तिच्याबरोबर एकतारी वाजवत निघालेला तिचा पती हे दृश्य प्रेक्षकांना वारीचीच अनुभूती देतो.

केवळ लोकप्रिय आणि ठेक्याच्या रचनाच अभंग रिपोस्टचा गाभा नाहीत, तर आनंदाचे डोही आनंद तरंग सारखे लताबाईंच्या आवाजातील एक स्वर्गीय रचना जिचा भाव हा एक विठोबा पर्यंत पोचवणारा आहे ती देखील अत्यंत अंतर्मुख पणे सभागृहात सादर केली जाते.

केवळ दहा ते पंधरा मिनिटांचा हा अविष्कार पण मुळात शब्दांशी खेळत ज्या प्रकारे मांडला जातो त्यातून पंढरीच्या वाटेवरची पाऊले मनाचा शोध घ्यायला लागतात. ग्लोबल वार्मिंगचा विषय चहूबाजूंनी पिडा देत असताना 'वृक्षवल्ली आम्हा सोयरी वन चरेची' रचना त्याच अंगाला सादर केली जाते आलेल्या प्रेक्षकाला हे तुफान आवडतं.

अभंग रिपोस्टमधील प्रत्येक रचनेवर सभागृहातील प्रेक्षक बेभान होतात अगदी नाचतातही. मन पंढरपूरच्या वारीला तर निघतेच, पण अंतर्मनात डोकावून आधुनिक जगाचा कुठे चुकतंय संतांची शिकवण काय याचाही विचार करू लागतो त गेले दहा वर्ष हा बँड महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गाजतोय. 'बसून काय राहताय चला जाऊया पंढरीला' म्हणत प्रत्येकाला नाचत ठेवणं हे या बँडची वैशिष्ट्य आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT