पुढारी ऑनलाईन डेस्क - शिवा आणि आशू गुळूंब गावावरून घरी आलेत. आशू गायब झाल्याच्या धक्क्याने सीताई अंथरुणाला खिळलेली होती. आशू सुरक्षित असल्याचं पाहून ती सुटकेचा श्वास घेते, पण सातार्यात नेमकं काय घडलं याची विचारणा करते. आशू खोटं सांगून सत्य लपवतो, पण सीताई शिवाला सातार्यात काय घडलं ते सांगायला भाग पडते. शिवा आशूच्या अपहरणाचा सगळा प्रकार सांगते.
हे ऐकून सीताई संतापते आणि सगळ्या घडलेल्या प्रकारासाठी शिवालाच जबाबदार ठरवते. इकडे कीर्ती वस्तीत जाऊन हा मुद्दा उचलते आणि बाईआजी, वंदनाला आशूसोबत जे घडलं त्यासाठी माफी मागायला लावते. शिवा तिथे पोहोचताच कीर्ती हे सगळं सीताईनेच करायला सांगितल्याचं सांगते. शिवा सीताईला अपहरण नाट्याबद्दल समजावण्याचा प्रयत्न करते, पण सीताई तिला ठामपणे नकार देते आणि तिला घटस्फोटाच्या कागदांची आठवण करून देत म्हणते, तुझ्याकडे आता "फक्त एक महिना उरलाय, मग तुला या घरातून जावंच लागेल."
शिवा हादरून जाते कारण तिला कळतं की, आता आशूनेही तिची साथ सोडली आहे. दरम्यान, देसाई कुटुंबात एका नवीन मुलीचं आगमन होणार आहे. तिचा स्वभाव आणि संस्कारांनी सगळे प्रभावित होतात. कीर्तीचा पुढचा डाव काय असेल? देसाई घरात आलेली ही नवीन मुलगी कोण आहे? शिवाला खरंच आशुला घटस्फोट द्यावा लागेल? 'शिवा' रोज रात्री ९:०० वा. झी मराठीवर पाहा.