मुंबई : पुढारी ऑनलाईन
बॉलिवूड इंडस्ट्रीत असो वा कोणतेही क्षेत्र असो काळ कधीही एकसारखा राहत नाही. काही वेळा काहींचे नशीब चमकते तर काहीवेळा पदरी निराशा येते. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. परंतु, सुशांत सिंह राजपूतच नव्हे तर बॉलिवूडमध्ये असे अनेक दिग्गज कलाकार तणावात गेले होते. परंतु, त्यांनी हार मानली नाही. कोणकोणते स्टार्स डिप्रेशनमधून बाहेर आले, जाणून घेऊया.
नुसरत भरूचा
अभिनेत्री नुसरत भरुचा बॉलिवूड इंडस्ट्रीत आज शिखरावर पोहोचली आहे. पण, यासाठी तिला १२ वर्षे संघर्ष करावा लागला. २००६ मध्ये करिअरची सुरुवात करणार्या नुसरतला २००९ मध्ये 'प्यार का पंचनामा' या चित्रपटापासून ओळख मिळाली. यानंतर तिला २०१८ मध्ये 'सोनू की टीटू की स्वीटी' या चित्रपटातील अभिनयाने गाजली. या तिच्या संघर्षाबद्दल नुसरतने सांगितले होते, 'यश मिळेपर्यंत संघर्ष दररोजचा असतो. लोक आपल्यात अनेक उणीवा शेधत असतात. आपण कामासाठी ऑडिशन देतो. चित्रपट मिळेल, अशी अपेक्षा आपल्याला असते. काही वेळा चित्रपट आपल्याला मिळत असतो, तोपर्यंत मध्येच दुसरे कोणीतरी येते. परंतुं माझा असा विश्वास आहे की, येथे तुमच्या हातात काहीही नसते. फक्त तेथे काम करत राहणे महत्वाचे असते. एकदा चित्रपट न मिळाल्याने निराशा व्हावं लागलं. 'आकाशवाणी'मध्ये माझी भूमिका स्ट्रॉन्ग होती. त्यामुळे मला वाटले की, माझे नशीब चमकेल. पण तेव्हा तसे झाले नाही. यामुळे मला खूपच मोठा धक्का बसला. यानंतर मी एका वर्षासाठी खूपच डिप्रेशनमध्ये गेले.
अहाना कुमरा
'लिपस्टिक अंडर माय बुर्का' या चित्रपटाद्वारे यश मिळवणारी अभिनेत्री अहाना कुमरा हिनेही आपल्या करिअरमध्ये खूपच संघर्ष केला आहे. तिला पहिल्या टिव्ही शो 'युध' आणि 'सोना स्पा' या चित्रपटामध्ये तिला अपयशाला सामोरे जावे लागले होते. याबाबत अहाना कुमराने सांगितले की, 'जेव्हा तुम्ही चित्रपटात येणार असता त्यावेळी तुम्हाला मिळेल ते काम करण्याशिवाय पर्याय नसतो. यापूर्वी मी कास्टिंग आणि सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. कारण मला त्यावेळी चित्रपटात भूमिका मिळाल्या नाहीत. कारण माझे आई-वडील दिग्दर्शक नाहीत. याशिवाय मी कोणत्याही स्टारची मुलगी नाही. मला हे माहित होते, मला जे काही काम दिले जाईल ते निर्भयपणे करण्याचा माझा निर्णय होता. चांगल्या कामावरूनच दुसरे काम मिळेल. दररोज तुम्हाला कोणीतरी सांगेल की, तुम्ही लठ्ठ आणि सडपातळ आहात. तर काही वेळा खूपच वाईट दिसत असल्याचे सांगितले जाईल. परंतु या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करा. जे तुम्हाला बरोबर वाटेल ते करा. त्यामुळे मला मिळेल ते काम मी कधीही नाकारत नाही. हा संघर्ष करणे सोपे नाही. या संघर्षात अनेक स्टार पूर्णपणे नैराश्यात जातात.
दीपिका पादुकोन
आजची बॉलिवूडची टॉप अभिनेत्री एकेकाळी प्रचंड डिप्रेशनमध्ये गेली होती. तिने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की, (रणबीरचं नाव न घेता) 'मला रिलेशनमध्ये धोका मिळाला होता. माझ्यासोबत रिलेशनमध्ये असताना तो आणखी एका व्यक्तीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. जे मी स्वत:च्या डोळ्यांनी पाहिलं होतं'.
ब्रेकअप झाल्यानंतर जवळजवळ ती सहा महिने डिप्रेशनमध्ये गेली होती. पण, आईने मुंबईत येऊन तिला सावरलं. तिने स्वत:ला यातून बाहेर काढलं आणि इंडस्ट्रीमध्ये कमबॅक केलं.
दिग्दर्शक ईश्वर निवास
१९९९ मध्ये पहिल्यांदा 'शूल' या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले दिग्दर्शक ई निवास (Eeshwar Nivas)यांचे करिअर आज शिखररावर आहे. परंतु त्यांनादेखील एकेकाळी संघर्ष करावा लागला होता. २०१४ च्या 'टोटल सियापा' नंतर चाहत्यांनी ई निवासची कारकीर्द संपली असे जाहीर केले. परंतु अलीकडेच त्यांनी याकडे दुर्लक्ष करून 'योर ऑनर' या वेबसीरिजमधून डिजीटलमध्ये पदार्पण केले.
त्यांच्या संघर्षाबद्दल दिग्दर्शक ई निवास म्हणाले, पहिला 'शूल' चित्रपट बनवला. तेव्हा मी फक्त २२ वर्षांचा होतो. त्यावेळी मला चित्रपट निर्मितीच्या तांत्रिक गोष्टी समजल्या होत्या. मात्र मला कदाचित जग आणि लोक समजले नव्हते. 'टोटल सियापा' या चित्रपटानंतर मी ब्रेक घेतला आणि मी आधी शिकलेल्या सर्व गोष्टी विसरण्याचा प्रयत्न केला. जेव्हा चित्रपट फ्लॉप होत होते तेव्हा मी खूप हताश होतो, परंतु जेव्हा मी ब्रेक घेतला तेव्हा मी घरी रिकामा बसलो नाही. मी अनेक जाहिरातीत काम केले. मी त्यावेळी स्वत:ला कामात गुंतवून घेतले. यावेळी आपले चित्रपट कोठेही दिसत नाही असे लोक म्हणू लागले. त्यावेळी लोकांना असे वाटायचे की ई निवास यांचे चित्रपट कधीच येणार नाहीत. त्यावेळी मी हे सर्व गप्प ऐकून घेत होतो. परंतु मला माहित होते की, मी स्वत: यापुढे चांगले काम करेन असा माझा निश्चय होता. मी एका संधीची वाट पाहत होतो. मला खात्री होती की, मी पुन्हा नव्याने चित्रपट घेऊन येईन.
अविनाश तिवारी
अभिनेता अविनाश तिवारी यांना २०१८ मध्ये 'लैला मजनू' चित्रपटात पहिली मुख्य भूमिका मिळण्यापूर्वी मोठा संघर्ष करावा लागला होता. चित्रपटाच्या फ्लॉप झाल्यानंतरही त्याचा अजूनही संघर्ष सुरू आहे. अविनाश तिवारी म्हणाले की, प्रत्येक इंडस्ट्रीत संघर्ष असतोच. मी ज्यावेळी हा मार्ग निवडला तेव्हा मला माहित होते की, हा रस्ता सोपा होणार नाही. परंतु जरी मला यात संधी मिळाली नाही तरीही मी रस्त्यावर लोकांना बोलावून माझे काम पाहण्याची विनंती करेन. हा माझा निर्णय होता. मला यात आवड निर्माण झाली होती. मी या इंडस्ट्रीबद्दल फारसा विचार केलेला नव्हता. ज्या गोष्टीत आपल्याला रस असतो त्यावर फोकस करावा अशी माझी इच्छा आहे. मला हादेखील विश्वास आहे की, आपण हिरो आहोत. जेव्हा आपण चमकू तेव्हा सगळे जग पाहत राहिल.
विद्या बालन
अभिनेत्री विद्या बालन आज चित्रपट इंडस्ट्रीची टॉप स्टार आहे. पण २० वर्षांपूर्वी जेव्हा विद्याने करिअरची सुरूवात मल्याळम चित्रपटांद्वारे करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिला खूपच अडथळे आले. यानंतर सुपरस्टार मोहनलाल यांच्याबरोबर तिला पहिला चित्रपट मिळाला. त्यानंतर आणखी १२ मल्याळी चित्रपटांची ऑफर मिळाली. दुर्दैवाने, मोहनलाल यांच्यासोबत असलेला 'चक्रम' हा चित्रपट बॅकफूटवर आला. विद्या म्हणाली, मी तमिळ चित्रपटांकडे वळले. तिथेही मला रिप्लेस केलं गेलं. याशिवाय मला 'परिणिता' या चित्रपटासाठी ऑडिशन्सही द्यावे लागले. परंतु विद्या बालनला या चित्रपटातील भूमिकेसाठी आधी नकारच मिळाला. मी खूप रडायचे. कधी नवी संधी मिळते याची मी वाट पाहायचे. पण नंतर 'परिणिता'मध्ये संधी मिळाली.'