अभिनेत्री गौरी कुलकर्णीने आपल्या बॅचलर लाईफ विषयी आणि लग्नाबाबत स्पष्ट विचार मांडले आहेत. पूर्वी लग्नाबाबत साशंक असलेल्या गौरीला मुंबईत कामानिमित्त एकटे राहू लागल्यानंतर एका जोडीदाराची ओढ जाणवू लागली आहे. आयुष्याच्या प्रवासात कुणीतरी सोबत असावं असं वाटतं असे तिने म्हटले आहे. गौरीला साधेपणाने विवाह बंधनात अडकणे जास्त आवडेल आणि जेव्हा तिला योग्य व्यक्ती भेटेल, तेव्हाच ती हा निर्णय घेईल, असेही तिने सांगितलं.
Marathi actress Gauri Kulkarni single?
मराठी चित्रपट आणि मालिका विश्वातील लोकप्रिय चेहरा, अभिनेत्री गौरी कुलकर्णी सध्या तिच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. अनेक अभिनेत्री आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि लग्नाबद्दल उघडपणे बोलणे टाळतात, मात्र गौरीने या विषयावर अतिशय स्पष्टपणे आपले मत मांडले आहे. "लग्न कधी करणार?" लोक विचारत असलेल्या प्रश्नांवर तिची मजेशीर उत्तरे ऐकायला मिळाली. पण इतकचं नाही तर गौरीने आपल्या बॅचलर लाईफबद्दलही सांगितले. शिवाय, आपल्या आयुष्यातील पार्टनर कसा हवाय, याबद्दलही गौरीने एका मुलाखतीत प्रांजळपणे सांगितले.
मुंबईतील एकटेपणा आणि लग्नाचा विचार
गौरीने सांगितले की, तिचे आई-बाबा बीडला राहतात. आणि ती मुंबईत एकटी राहते. सुरुवातीला ती लग्नाबाबत फारशी गंभीर नव्हती किंवा ती संभ्रमात होती की, लग्न करायचे की नाही. मात्र, २०२० मध्ये जेव्हा ती कामाच्या निमित्ताने मुंबईत एकटी राहू लागली, तेव्हा तिच्या विचारात बदल झाला. जेव्हा तिला मालिका मिळाली, तेव्हा तिने जॉब सोडला.
गौरी म्हणाली, "मुंबईत एकटी राहू लागल्यानंतर मला जाणवलं की, आपल्याला कुणीतरी हवंय. याचा अर्थ असा नाही की मी एकटी राहू शकत नाही किंवा जोडीदार असणे ही माझी गरज आहे, पण आयुष्याच्या प्रवासात सोबत करण्यासाठी कुणीतरी असावं, असं आता मला वाटतं."
प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबाप्रमाणे गौरीच्या घरातही तिच्या लग्नाची चर्चा होत असते. नातेवाईक जेव्हा तिला लग्नाबद्दल विचारतात, तेव्हा ती मोठ्या खुबीने हा प्रश्न टाळते. गौरी सांगते, "जेव्हा कुणी विचारतं लग्न कधी? तेव्हा मी सांगते आई-बाबांशी बोला. आणि आई-बाबांना विचारलं की ते सांगतात, तिलाच विचारा. या उत्तरामुळे विचारणारे लोक हक्केबक्के होतात." मात्र, गौरीच्या पालकांनी तिला पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. ती योग्य विचार करूनच निर्णय घेईल, असा विश्वास तिच्या आई-वडिलांना आहे.
जोडीदाराबद्दल काय वाटतं गौरीला?
लग्नासाठी गौरीची अट अतिशय साधी पण महत्त्वाची आहे. ती म्हणते, "जर कुणी आयुष्यात आलं तर मी नक्कीच विचार करेन. पण केवळ मला वाटून चालणार नाही, तर समोरच्या व्यक्तीलाही माझ्याबद्दल तसंच वाटायला हवं. आमच्या दोघांच्या भावना सारख्या असायला हव्या. जेव्हा आम्हाला वाटेल की आम्ही एकमेकांसाठी 'करेक्ट' आहोत, तेव्हाच मी लग्नाचा निर्णय घेईन."
मोठ्या लग्नाला फाटा
आजकाल सेलिब्रिटींची लग्ने अतिशय भव्य आणि खर्चिक असतात. मात्र, गौरीने स्पष्ट केले आहे की, तिला मोठं लग्न करण्यात रस नाही. ती अत्यंत साध्या पद्धतीने आणि सर्वांना आवडेल, असं लग्न करण्यास पसंती देईल.
कशी आहे खऱ्या आयुष्यात गौरी?
गौरी खऱ्या आयुष्यात चंचल आहे. आता सगळं सेटल व्हायला पाहिजे, अशा विचारांची ती अजिबात नाही. नवी आव्हाने, नव्या गोष्टी शिकायला आवडतात, असे तिने खुलासा केला. पहिली मालिका मिळाल्यानंतर गौरीला अजिबात आत्मविश्वास नव्हता. जेव्हा तिला दुसरी मालिका मिळाली, दोन-तीन वर्षांनंतर काम करण्याचा आत्मविश्वास आला. जे पैसे मिळायचे त्यातून घराचे भाडे देखील जात नसायचं. सेव्हिंगला पैसेही राहत नव्हते. पहिले वर्षभर असचं चालू राहिलं. पण, गौरीने हा नियम मोडून काढला. तिचा अभिनय बघून तिला काम मिळू लागलं. कास्टिंग प्रोसेस कसं आहे, हे मला कळलंही नाही आणि तिने जाणूनही नाही घेतलं. खूप लांबचा प्रवास आहे आणि आणखी चांगलं काम करायचंय, असं तिने मत व्यक्त केलं.
ऑलमोस्ट सुफल संपूर्ण, आई कुठे काय करते, शिवा, अबोली या मालिकांमधून तिने उत्तम अभिनय साकारला आहे.