‘देऊळ बंद २’ या चित्रपटाबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. ‘देवाची परीक्षा’ या संकल्पनेवर आधारित कथानकामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली असून प्रवीण तरडे पुन्हा मोठ्या भूमिकेत दिसू शकतात, अशी चर्चा आहे. मात्र या प्रकल्पाबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
Pravin Vitthal Tarde Deool band- 2 movie latest updates
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि सामाजिक आशय मांडणारा चित्रपट ‘देऊळ बंद’ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. देव आणि विज्ञानाच्या संघर्षावर आधारित कथेमुळे मुळचा देऊळ बंद हा चित्रपट प्रचंड चर्चेत आला होता. आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात देवाची परीक्षा या संकल्पनेची चर्चा होऊ लागलीय. संकटाच्या काळात आपण म्हणतो की, देव आपली परीक्षा बघतोय. पण, इथे मात्र देवाचीच परीक्षा ठरतेय. ‘देवाची परीक्षा’ या संकल्पनेनंतर देऊळ बंद २ या चित्रपटाच्या कथानकाची चर्चा होताना दिसतेय. याबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
पहिल्या भागात प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणारा सामाजिक संदेश देण्यात आला होता. देव, श्रद्धा आणि समाजातील बदलत्या विचारसरणीवर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळेच त्याच्या संभाव्य सिक्वेलबाबत सुरू झालेल्या चर्चांनी पुन्हा एकदा लक्ष वेधून घेतले आहे.
संवेदनशील आणि ज्वलंत मुद्दे
सध्या सोशल मीडियावर ‘देऊळ बंद २’ या नावाने विविध पोस्ट आणि चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटात ‘देवाची परीक्षा’ या संकल्पनेभोवती कथा फिरणार असल्याचे बोलले जात आहे. या संकल्पनेमुळे चित्रपट अधिक गंभीर आणि विचारप्रवर्तक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवरून देवालाच आव्हान करण्यात आल्य़ाने नवी कथा काय जादू दाखवणार, याकडे लक्ष लागले आहे.
कधी रिलीज होणार चित्रपट?
'वटवृक्ष एण्टरटेन्मेंट' निर्मित आणि प्रविण तरडे लिखित, दिग्दर्शित 'देऊळ बंद २' २१ मे रोजी रिलीज होतोय. त्याआधी सोशल मीडियावर रिलीज झालेल्या व्हिडिओमधून अंगावर काटा आणणारे दृश्ये पाहायला मिळताहेत.
'देऊळ बंद २' च्या कथानकात काय?
चित्रपटात सामाजिक वास्तव, श्रद्धा आणि मानवी संघर्ष आहे. शेतकऱ्यांचे तीव्र ज्वलंत प्रश्न, त्यांना येणाऱ्या अडचणी या विषयांवर प्रकाश टाकणारी दृश्ये आहेत. अत्यंत संवेदनशील मुद्दे कथानकात हाताळल्याने अंगावर शहारे आणणारी कथा पाहायला मिळेल, असे म्हटले जात आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि अध्यात्म यांमधील संघर्ष, देवाचे अस्तित्व आणि सामाजिक भान याविषय सखोल मांडणी करण्यात आलीय.
दमदार संवाद
स्वामी समर्थांच्या अस्तित्वाला एका भक्ताची परीक्षा द्यावी लागत आहे. "बाईच्या मनाची खोली मोजू नको बाबा त्यात शेतकऱ्याची...", "या देशात सगळं ओरिजनल आहे, डुप्लिकेट फक्त शेतकरी!", "रोज एक तरी आत्महत्या होणाऱ्या आमच्या या तालुक्यात पुढच्या आठ दिवसात एकही आत्महत्या झाली नाही पाहिजे... जर झाली तर माझं देऊळ बंद कायमचं!", असे अनेक दमदार संवाद चित्रपटात ऐकायला मिळतात.
प्रवीण तरडेंचे प्रभावी दिग्दर्शन
प्रवीण तरडे यांच्या भूमिकेबाबतही मोठी चर्चा सुरू आहे. पहिल्या भागात त्यांनी साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली होती. त्यामुळे सिक्वेलमध्ये ते पुन्हा एकदा महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील का, याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. देऊळबंद-२ चित्रपटाचे दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद प्रविण तरडे यांनी केले आहे. चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी पुन्हा 'स्वामी समर्थांच्या' दैवी भूमिकेत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणार आहेत. स्नेहल तरडे यांची महत्त्वाची भूमिका आहे. प्रवीण तरडे सदूशेठ नावाच्या १०० तोंडांच्या रावणाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. निर्मिती कैलास वाणी, सौ. जयश्री वाणी, कैवल्य वाणी आणि जुईली वाणी-सूर्यवंशी यांनी केली आहे.