पंचमदांनी नाकारलेलं 'मेरा कुछ सामान' गाणं आशा ताईंनी पाहिलं, वाचलं आणि पुढील १० मिनिटांत धून तयार केली. 'इजाजत' चित्रपटातील हे गाणं इतकं सुपरहिट झालं की, यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. दुसरीकडे, लता मंगेशकर यांच्या विषयीचा एक अनोखा प्रसंग आशाताईंनी सांगितला होता. त्यासाठी शेवटपर्यंत वाचा....
Asha Bhosle-Lata Mangeshkar bonding with each other incident of gulzar
हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळापासून ते आजच्या डिजिटल युगापर्यंत, ज्या एका आवाजाने रसिक मनावर अधिराज्य गाजवलं, ते नाव म्हणजे आशा भोसले. आशाजींनी केवळ गाणी गायली नाहीत, तर प्रत्येक शब्दाला आपल्या श्वासाने जिवंत केलं. १६ हजारांहून अधिक गाणी आणि २० हून अधिक भाषांमधील त्यांचा प्रवास हा जागतिक संगीताचा एक अनमोल वारसा आहे. मराठी, बंगाली, पंजाबी, तमिळ, भोजपुरी, गुजराती, मल्याळम, इंग्रजीसह रशियन भाषेतील गाण्यांचा समावेश आहे. (asha bhosle)
'चला चला नव बाळा' ते 'दम मारो दम'
आशा भोसले यांनी आपल्या करिअरमधलं पहिलं गाणं १९४८ मध्ये गायलं होतं. चित्रपट होता 'चुनरिया'. आशा शास्त्रीय संगीतशिवाय गझल, पॉप म्युझिक सारखी गाणीही गायली आहेत. वयाच्या अवघ्या १० व्या वर्षी 'माझा बाळ' या मराठी चित्रपटातून सुरू झालेला हा प्रवास 'चुनरिया' (१९४८) ते पॉप गाण्यापर्यंत आला. एका बाजूला 'दिल चीज क्या है' सारखी खयाल-गझल त्यांनी नजाकतीने गायली, तिथेच 'दम मारो दम' मधील पाश्चात्य धाटणीचा पॉप आवाजही तितक्याच ताकदीने दिला. शास्त्रीय संगीत असो किंवा कॅबरे गाणी, आशाजींचा आवाज प्रत्येक जॉनरमध्ये 'फिट' बसला.
पंचमदा आणि आशाजी- संगीतातील सुवर्णयुग
'तिसरी मंजिल' चित्रपटाच्या निमित्ताने जेव्हा आर. डी. बर्मन (पंचमदा) आणि आशाजींची जोडी जमली, तेव्हा भारतीय संगीताला एक वेगळीच दिशा मिळाली. पंचमदांचे संगीत अन् आशाजींच्या आवाजाने सूर सातासमुद्रापार गेलं.
पंचमदा, आशाताई आणि गुलजार यांचा अनोखा किस्सा
इजाजत चित्रपट १९८७ मध्ये प्रदर्शित झाला. त्यातील मेरा कुछ सामान हे गाणे चांगले प्रसिद्ध झाले. यामागे देखील एक किस्सा सांगितला जातो. गुलजार यांनी या गाण्याचे बोल कागदावर लिहून पंचमदांकडे दिले. त्यावेळी बंगालीमध्ये ते पुटपुटले आणि म्हणाले, पुढच्या वेळी येताना वृत्तपत्रातील बातम्या घेऊन ये आणि मला सांग की ट्यून बनव. मी बनवून देईन. पण कागदावरचे बोल अजिबात चांगले नाहीत. ती एक कविता किंवा पत्र लिहिल्यासारखं वाटत होतं. तिथेच बसलेल्या आशाताईंनी ते पाहिलं, वाचलं आणि त्या गुणगुणल्या. पुढच्या १० मिनिटात धून तयार झाली. हे गाणं इतकं सुपरहिट झालं की त्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तर गुलजार यांना सर्वोत्कृष्ट गीतकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
हिंदी सिनेसृष्टीत आपल्या सुरिली आवाजाने मंत्रमुग्ध करणार्या आशाजींनी 'झुमका गिरा रे', 'रात अकेली है', 'आजा आजा', 'दम मारो दम', 'दिल चीज क्या है' यासारखी सदाबहार गाणी गायली. नव्वदच्या दशकात 'बाजीगर', 'रंगीला', 'ताल' यासारख्या चित्रपटांत ए. आर. रहमान आणि अनु मलिक यांच्यासोबतही काम केलं. त्याआधी 'तिसरी मंजिल' चित्रपटादरम्यान, आरडी बर्मन यांनी आशा भोसले यांच्याशी गाण्यासाठी संपर्क केला होता. त्यावेळी आशा भोसले यांचं वैवाहिक जीवन संपुष्टात आलं होतं. आपल्या वैयक्तिक आयुष्यात आलेल्या वादळात देखील त्या स्थिरावल्या आणि पंचमदासोबत अनेक गाणी गायली.
लतादीदींचा तो रियाज आणि समर्पण
एका रिॲलिटी शोमध्ये आशाताईंनी आपल्या बहिणीबद्दल लता मंगशेकर यांच्याबद्दल एक भावूक आठवण सांगितली. त्या म्हणाल्या, "मी आणि दीदी रेकॉर्डिंगला अतिशय साध्या सुती साड्या आणि काचेच्या बांगड्या घालून जायचो, कारण आमचं चित्त केवळ सुरांवर असायचं."
त्या पुढे म्हणाल्या, '१० वर्षांपूर्वी माझ्या दीदीने एक गाणे गायले होते. त्यावेळी मी दीदीला म्हणाले की, दीदी तुझा आवाज ठिक वाटत नाहीये आणि तुझे सूर कच्चे वाटत आहेत. त्यावेळी दीदी म्हणाल्या, अच्छा, असयं? तुला जास्त माहिती आहे...' दुसर्या दिवशी लतादीदी सकाळी-सकाळी तानपुरा घेऊन रियाज करायला बसल्या आणि त्यानंतर तेच गाणं मला पुन्हा गाऊन दाखवलं. त्यांचा हा रियाज म्हणजे संगीताप्रती असलेलं समर्पण आहे.'