मुंबई : पुढारी वृत्तसेवा महानायक अमिताभ बच्चन यांची प्रकृती हळूहळू सुधारत आहे. दस्तुरखुद बच्चन यांनी मंगळवारी त्यांच्या ब्लॉगवरून चाहत्यांना तब्येतीविषयीची माहिती दिली. अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगच्या सुरुवातीला त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करणाऱ्यांचे आभार मानले आहेत. तब्बेत हळूहळू सावरत आहे. पूर्णपणे बरे होण्यासाठी वेळ लागणार आहे. डॉक्टरांच्या सूचनांचे, निर्बंधांचे काटेकोर पालन करत आहे. सर्व काम बंद आहे. सध्या पूर्णपणे विश्रांतीचा सल्ला दिला गेला आहे. छातीवर पट्ट्या आहेत. प्रकृती ठणठणीत झाल्यानंतरच पुन्हा कामाला सुरुवात करेन, असे अमिताभ यांनी पुढे लिहिले आहे.
जुहूमधील जलसा बंगल्यात होळी साजरी केल्याचा उल्लेखही अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये केला आहे. सोमवारी रात्री आम्ही सहकुटुंब होळी साजरी केली. या सणाच्या निमित्ताने आम्ही सर्वजण एकत्र आहोत, या गोष्टीचा आनंद आहे. तुम्हा सर्वांना होळीच्या माझ्याकडून शुभेच्छा, असे अमिताभ यांनी पुढे म्हटले आहे. हैदराबादमध्ये प्रोजेक्ट के सिनेमाचे चित्रीकरण सुरू असताना एका अॅक्शन सीनदरम्यान अमिताभ जखमी झाले. त्यामुळे सिनेमाचे चित्रीकरण थांबवण्यात आले आहे. सीन करताना अपघात झाला. त्यात बरगड्यांना दुखापत झाली आहे. त्यामुळे सिनेमाचे शूटिंग थांबवून तातडीने मुंबईला परतलो, असे अमिताभ यांनी सांगितले.