ट्रकची कारला धडक; ६ जणांचा मृत्‍यू 
Latest

Nagpur Accident : सोनखांब येथे ट्रकची कारला धडक; लग्नाला गेलेल्या चुलत भावांसह ६ जणांचा मृत्‍यू

निलेश पोतदार

नागपूर ; पुढारी वृत्‍तसेवा : नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील सोनखांब परिसरात झालेल्या गाडी आणि ट्रकच्या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. शुक्रवारी (दि.१५) मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात सोनखांब आणि ताराबोडी दरम्यान घडला. या अपघातात मयूर इंगळे (वय २२), वैभव चिखले (वय ३२), सुधाकर मानकर (वय ४२), विठ्ठल थोटे (वय ४५), अजय चिखले (वय ४०) व रमेश हेलोंडे यांचा मृत्यू झाला. तर गंभीर जखमी जगदीश ढोणे याच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत.

नागपुरातील एक लग्नसमारंभ आटोपून हे वऱ्हाड खासगी वाहनाने काटोलच्या दिशेने परतत होते. तातडीने गंभीर अवस्थेत जखमींना नागपुरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काटोल तालुक्यातील मेंढेपठार येथील अनेकजण गावातीलच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, माजी जि.प. उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले यांच्या मुलाच्या लग्नासाठी नागपुरात आले होते.

त्यांची गाडी नागपूरवरून काटोलच्या दिशेने जात असताना ती एका ट्रकवर धडकली. यात गाडीमधील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात इतका भीषण होता की यात गाडीचा अक्षरश: चुराडा झाला.
एकाच गावातील सर्व मृत असल्याने गावात शोककळा पसरली आहे. मृतांमध्ये दोन सख्ख्या चुलतभावांचा समावेश आहे. उत्तरीय तपासणी झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांना सुपूर्द करण्यात आले. अंत्यविधीसाठी माजी मंत्री अनिल देशमुख व जि.प सदस्य सलील देशमुख यांच्यासह राष्ट्रवादीचे व सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. गाडी चालकाचाही मृत्यू झाला आहे. दरम्यान, या अपघातात गंभीर जखमींची सलील देशमुख यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली.


हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT