Latest

Sharad Pawar on Ajit Pawar’s defection : अजित पवारांच्या बंडावर शरद पवार काय बोलेले? त्यांच्याच शब्दात

मोहसीन मुल्ला

अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नऊ नेते राज्याच्या मंत्रिमंडळात सहभागी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याचे स्पष्ट होताच पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका मांडली.  माझा महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेवर आणि तरुण पिढीवर विश्वास प्रचंड विश्वास आहे, १९८०साली जे चित्र दिसले ते चित्र जनतेच्या पाठिंब्यावर कसे उभे करता येईल, हा माझा एककलमी कार्यक्रम राहील, असे ते म्हणाले. शरद पवारांची संपूर्ण पत्रकार परिषद त्यांच्याच शब्दात. (Sharad Pawar on Ajit Pawar's defection)

संदर्भ Twitter @PawarSpeaks

———————————————————————————————————————

देशाच्या प्रधानमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी केलेलं वक्तव्य हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधी होतं. त्या वक्तव्यात त्यांनी दोन गोष्टी सांगितल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भ्रष्टाचारात सापडलेला पक्ष आहे. हे सांगताना त्यांनी राज्य सहकारी बँक आणि सिंचन विभागात जी तक्रार होती त्याचा उल्लेख केला. यामध्ये प्रधानमंत्र्यांनी जो आरोप केला, त्यानंतर आज राज्याच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही सहकाऱ्यांना त्यांनी शपथ दिली. याचा अर्थ प्रधानमंत्र्यांनी केलेले आरोप वास्तव नव्हते. त्या आरोपातून पक्षाला आणि ज्यांच्याबद्दल आरोप केले त्यांना मुक्त करण्यात आले त्यासाठी मी प्रधानमंत्र्यांचा आभारी आहे.

आमच्या काही सहकाऱ्यांनी जी पक्षाची भूमिका आहे त्यापेक्षा वेगळी भूमिका घेतली. पक्षाच्या संघटनात्मक बदलाचा विचार करण्यासाठी ६ जुलै रोजी पक्ष कार्यालात मी बैठक आयोजित केली होती. त्यापूर्वीच काही सहकाऱ्यांनी पक्षापासून एकदम वेगळी भूमिका घेतली आहे. तसेच आम्हीच पक्ष आहोत अशी भूमिका मांडली. विधीमंडळातील काही सदस्यांनी कितपत वेगळी भूमिका घेतली हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईल. याचे कारण यापैकी काही सदस्यांनी आम्ही सही केली असली तरी आमची वेगळी भूमिका कायम आहे असे मला सांगितले. याबाबत माझ्याशी संपर्क केलेल्या सहकाऱ्यांनी जनतेपुढे हे चित्र मांडले तर त्यांच्याबद्दल माझा विश्वास बसेल जर त्यांनी मांडले नाही तर त्यांची वेगळी भूमिका आहे, असा निष्कर्ष मी काढेल.

पक्षाच्या भवितव्याचा प्रश्न राहीला तर आजचा प्रकार इतरांना नवीन असेल मात्र मला नवीन नाही. १९८० साली निवडणुकीनंतर मी ज्या पक्षाचे नेतृत्व करत होतो त्या पक्षाचे ५८ आमदार निवडून आले होते त्यापैकी महिन्याभराने सहा आमदारांच्या व्यतिरीक्त सगळे आमदार सोडून गेले. माझ्यासहीत पाच आमदारांना सोबत घेऊन मी पुन्हा पक्षाची बांधणी केली. पुढच्या निवडणूकीत जे आम्हाला सोडून गेले त्यापैकी दोन-तीन जण सोडल्यास सगळे पराभूत झाले. १९८० साली जे चित्र दिसले ते चित्र पुन्हा महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठिंब्यावर कसे उभे करता येईल हा माझा एककलमी कार्यक्रम राहील. माझा महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेवर आणि विशेषत: तरुण पिढीवर प्रचंड विश्वास आहे. चार वर्षांपूर्वी राज्यातील विधानसभेतदेखील हेच चित्र होते.

पण राज्यात जिथे जाता येईल तिथे जाणे, आपली भूमिका मांडणे हे केले त्याचा परिणाम आमची संख्या वाढली आणि आम्ही संयुक्त सरकार स्थापन केले. आज पुन्हा ती स्थिती आहे. या सर्व स्थितीत अनेकजण संपर्क करून आपण सर्व एक आहोत, आमची तुम्हाला साथ आहे, अशी मत मांडत आहेत. आजचा दिवस संपल्यावर उद्या सकाळी कऱ्हाडला स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीचे दर्शन घेऊन साताऱ्यात दलित समाजातील घटकांचा पहिला मेळावा घेणार. त्यानंतर राज्यात आणि देशात जावून लोकांशी जास्तीत जास्त संपर्क वाढविण्याचा प्रयत्न माझ्याकडून केला जाईल, ही माझी नीती राहील.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT