Latest

शाळांच्या वेळा बदलणार, उष्णतेच्या लाटेमुळे निर्णय

Arun Patil

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : राज्यात उन्हाचा तडाखा वाढल्याने राज्यातील शाळांच्या वेळात बदल होण्याची शक्यता आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये तापमान मोठ्या प्रमाणावर वाढले, अशा जिल्ह्यांमधील शाळांच्या वेळा स्थानिक प्रशासनानेच ठरवाव्यात, अशा सूचना शिक्षण आयुक्‍त सूरज मांढरे यांनी दिल्या आहेत. शक्यतो शाळा सकाळीच भरवल्या जाणार आहेत. उष्णतेची लाट तीव्र असेल अशा ठिकाणच्या शाळा बंद ठेवल्या जाऊ शकतात.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा काही ठिकाणी शाळा उशिराने सुरू झाल्या आहेत. त्यामुळे उन्हाळी सुट्ट्यांमध्येही शाळा सुरू आहेत. त्यातच तापमान 40 ते 44 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचत आहे. अशा काळात जर दुपारी शाळा सुरू राहिल्या, तर विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो.

यामुळे शिक्षण आयुक्‍तांनी शाळा शक्यतो सकाळच्या वेळेत भरवाव्यात, अशा सूचना केल्या आहेत. काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट सुरू आहे. त्यामुळे शाळा सुरू ठेवायच्या की नाहीत, याबाबत निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य स्थानिक पातळीवरील शिक्षणाधिकारी, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना देण्यात आले आहे.

कोरोनामुळे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी राज्यात 30 एप्रिलपर्यंत शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या शाळांनी यापूर्वीच परीक्षा घेतल्या आहेत, त्यांना सुटी देण्याची मुभाही देण्यात आली आहे. जर उष्णतेची लाट संपूर्ण राज्यभरात आली, तर अनेक जिल्ह्यांमधील शाळा बंद कराव्या लागण्याची शक्यता असून, शिक्षकांना जून महिन्यादरम्यान राहिलेला अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT