पुढारी ऑनलाईन डेस्क : "राज्यपालांच्या बेताल वक्तव्यामुळे राज्यात या सरकारच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी, शिवरायांच्या अपमानाचा विषय मागे पडावा म्हणून बोम्मई यांनी जत बदद्ल वक्तव्य केले. भाजपची नेहमी स्क्रिप्ट तयार असते." आज माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत (Sanjay Raut News) यांनी सत्ताधारी पक्षावर निशाणा साधला आहे.
गेले काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक वाद सुरु आहे. एका कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्यावरून चांगलेच राजकारण तापले आहे. त्यामुळे त्यांना राज्यपाल पदावरुन हटवावे, अशी मागणी मविआकडून करण्यात येत आहे. याच दरम्यान भाजपा नेते सुधांशू त्रिवेदीनेही छत्रपती शिवाजी महारांजाच्याबद्दल केलेल्या वक्तव्याने महराष्ट्रातील राजकारण अधिकच ढवळून निघाले.
हे सर्व सुरू असतानाच यामध्ये आणखी एक भर पडली ती दोन दिवसापूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलेल्या सीमाप्रश्न आणि जत बद्दल केलेल्या वक्तव्यावरून पुन्हा वाद उफाळून आला आहे. यावर माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत यांनी शिंदे गट आणि भाजपवर निशाणा साधला. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी सीमाप्रश्नावरुन केलेले विधान हे मोठे कट कारस्थान आहे, षडयंत्र आहे. राज्यपाल कोश्यारी, सुधांशु त्रिवेदी यांनी शिवाजी महाराजांवर चिखलफेक केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केल्याने राज्यभरात सरकारच्या विरोधात संतापाची लाट उसळली. यावरुन लोकांचं लक्ष हटवावं, अपमानाचा विषय मागे पडावा म्हणून बोम्मईने हे वक्तव्य केले आहे, असा आरोप संजय राऊत यांनी यावेळी केला.
कर्नाटकचे भाजपचे मुख्यमंत्री महाराष्ट्रच्या भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांवर बोलणे ही ठरलेली स्क्रिप्ट आहे. "असं नसतं, तर भाजपचा एक मुख्यमंत्री भाजपच्या दुसऱ्या राज्यावर असा हल्ला करताना देशात कुठे दिसत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानावरुन जी संतापाची लाट सुरु आहे तो विषय मागे पडावा म्हणून ही स्क्रिप्ट तयार केली. महाराष्ट्राची एक इंच काय, एक वितही भूमी शिवसेना देणार नाही. महाभारत याच गोष्टीमुळे घडलं आहे. आता हे महाराष्ट्राचं नवं महाभारत घडू शकतं. पण तुम्ही कितीही कट कारस्थाने केली तरी महाराष्ट्राची जनता शिवरायांचा अपमान कधीही सहन करणार नाही
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, खोके सरकारवर महाराष्ट्राचा विश्वास नाही", हे खोेके सरकार आहे. ते नेहमी खोक्याची गोष्ट करतात. ते खोक्यासाठी काहीही करतील. महाराष्ट्राची भूमीही सोडतील, विकतीलही असा घणाघाती आरोप संजय राऊत यांनी केला. पण आता आम्ही सर्वात मोठ्या लढाईसाठी तयार आहोत. ती लढाई कोणत्याही थराला जाईल", ही लढाई उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असेल.
ते बोलताना म्हणाले, गुवाहाटीला जाऊ देत, लंकेला जाऊ देत किंवा आफ्रिकेला जाऊ देत ते जनतेच्या मनातून उतरले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ज्योतिषी भेटीवरुन चर्चा सुरु आहे. यावरुन बोलताना ते म्हणाले, मनोबल खचल्याने ते कुंडली दाखवत आहे. जितके आत्मबल आणि मनोबल कमी तितके ते जंतरमंतरच्या पाठीमागे लागतात, ज्योतिषाच्या पाठीमागे लागतात. महाराष्ट्राच्या जनतेने त्यांचं भविष्य निश्चित केले आहे. म्हणून ते ज्योतिषाच्या मागे लागलेत. कामाख्या देवी दर्शनावरुन विचारले असता ते म्हणाले त्यांच्या कुंडलीत सत्तायोग नाही, अघोरी लोक आहे, जे लोक अघोरी विद्येच्या पाठीमागे लागतात त्यांचा अंतही अघोरी असतो, अस म्हणतं त्यांनी शिंदे गटावर निशाणा साधला.
हेही वाचा