संपादकीय

‘सराव’ भारताचा, पोटदुखी चीनला

दिनेश चोरगे

आसियान देशांसोबत दक्षिण चिनी समुद्रात भारतीय नौदलाच्या युद्धाभ्यासावर चीन मोठ्या प्रमाणावर लक्ष ठेवून होता. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या निरंकुश वर्तनाला आळा घालण्यासाठी भारताने 7 आणि 8 मे रोजी दक्षिण चीन समुद्रात आसियान देशांच्या नौदलांसोबत युद्ध सराव केला होता. यामध्ये भारतीय नौदलाव्यतिरिक्त आसियान देश फिलिपाईन्स, इंडोनेशिया, सिंगापूर, मलेशिया, थायलंड, ब्रुनेई आणि व्हिएतनामच्या नौदलांचा सहभाग होता. चीन केवळ लढाऊ विमाने आणि गुप्तचर युद्धनौकांच्या साहाय्याने हेरगिरी करत नव्हता, तर युद्धाभ्यासाच्या ठिकाणापासून सुमारे पन्नास किलोमीटर अंतरावर चिनी सागरी मिलिशियाची जहाजेही दिसत होती. जगाची दिशाभूल करण्यासाठी चीनने मिलिशिया जहाजांची व्यापारी जहाजे म्हणून नोंदणी केली आहे; परंतु प्रत्यक्षात ते पीपल्स लिबरेशन आर्मीच्या नौदल शाखेच्या इशार्‍यावर समुद्रात आपल्या कारवाया करतात.

दक्षिण आशियातील छोट्या देशांसह चीन भारताला ज्या प्रकारे घेराव घालत आहे, त्याच धर्तीवर भारतही आसियान देशांसोबतच्या धोरणात्मक भागीदारीला आकार देत आहे. त्यामुळे चीन या डावपेचांवर लक्ष ठेवून होता. मात्र, चिनी युद्धनौका सराव स्थळाच्या फार जवळ आल्या नाहीत. त्यामुळे संघर्षाची शक्यता टळली.

अलीकडच्या काळात हिंदी महासागर आणि दक्षिण चीन समुद्रात चीनची दादागिरी वाढत आहे. एवढेच नाही, तर सागरी हद्दीबाबत सर्व आसियान देशांशी चीनचा वाद सुरू आहे. चीनविरुद्धच्या सागरी हद्दीच्या वादात फिलिपाईन्सने आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाऊन आपल्या सार्वभौमत्वाबाबतचा खटला जिंकला. याशिवाय व्हिएतनामसारख्या अनेक शेजारी देशांशी चीनचे सीमावाद आहेत. यंदाची कवायत ही व्हिएतनामच्या विशेष आर्थिक क्षेत्रात पार पडली.

यादरम्यान चीनकडून कोणताही हस्तक्षेप होऊ नये म्हणून चिनी जहाजांवर कडक नजर ठेवण्यात आली होती. तत्पूर्वी, सिंगापूर नौदल तळावरील सरावात भारताचे गाईडेड मिसाईल डिस्ट्रॉयर आयएनएस दिल्ली आणि स्टेल्थ फ्रिगेट आयएनएस सातपुडा यांनीही सहभाग घेतला होता. मात्र, राजनैतिक फायदा घेण्याच्या उद्देशाने भारताने ज्या देशांचे चीनशी संबंध बिघडत चालले आहेत त्यांच्याशी घनिष्ठ संबंध निर्माण केले आहेत. इतकेच नाही, तर अनेक देशांसोबत युद्धाशी संबंधित सराव कार्यक्रमही आयोजित केले आहेत. त्यामागचा उद्देश युद्ध विमाने आणि पाणबुड्या कुशलतेने चालवणे हा आहे. भारताने अनेक आसियान देशांना शस्त्रे विकण्यास सुरुवात केली आहे. ब्रह्मोस सुपरसॉनिक क्षेपणास्त्रांचा समावेश असलेल्या प्रणालीसाठी भारताने अलीकडेच फिलिपाईन्सशी करार केला होता. फिलिपाईन्ससोबतचा करार 375 दशलक्ष किमतीचा आहे. व्हिएतनाम आणि इंडोनेशियासोबतही असाच करार होण्याची अपेक्षा आहे.

चीनसोबतच्या सीमावादामुळे भारताने संरक्षणात्मक धोरणाचा भाग म्हणून आसियान देशांशी घनिष्ठ संबंध प्रस्थापित केले आहेत. खरे तर, आसियान देशांसोबतच्या या सागरी सरावाचा उद्देश समुद्रात अचानक उद्भवू शकणारे संघर्ष टाळणे हा होता. यातून परस्पर विश्वासही वाढवायचा होता आणि अपघातांची शक्यताही कमी करायची होती. चीनने सतत वाद निर्माण केल्यामुळे हे अपरिहार्य होते. भारताच्या सीमांवर अतिक्रमण करू पाहणार्‍या चीनला आपणही त्याविरोधात इतर आघाड्या तयार करू शकतो, याची जाणीव करून देणे आवश्यक होते. आसियान- भारत संयुक्त सागरी सराव हा याचाच एक भाग होता आणि तोे कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण झाला. संपूर्ण दक्षिण चीन समुद्रावर चीन आपला दावा सांगत असला, तरी दुसरीकडे आसियान देशही या समुद्राच्या विविध भागांवर आपला दावा सांगत आहेत. त्यामुळे भारत या देशांसोबत सामरिक हितसंबंध जोपासत आहे. चीनच्या विरोधात आसियान देशांना बळ देण्याचा भारताचा हा शेवटचा प्रयत्न आहे.

– अमोल जोशी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT