शरयू माने
आधुनिकीकरण आणि औद्योगिकीकरण यामुळे उपयोगात येणारे पाणी म्हणजे पिण्यायोग्य पाणी घटत चालले आहे. याउलट जे पाणी खर्चालाही आपण जास्त वापरू शकत नाही, असे क्षारयुक्त पाणी वाढत चालले आहे. भविष्यात कोट्यवधी संख्येने लोक पाण्याच्या अभावात जीवन जगतील, असा नीती आयोगाने 2018 मध्ये इशारा दिलेला आहे. जागतिक जलसंपत्ती दिनाच्या निमित्ताने पाणी संकट आणि पाणी वाचविण्याच्या शास्त्रावर टाकलेला द़ृष्टिक्षेप.
सरकारी योजनेंतर्गत पाणी वाचवा मोहीम राबविली जाते. कित्येक ठिकाणी सांडपाणी तसेच वाहू दिले जाते. झोपडपट्टी, अविकसित क्षेत्रे या ठिकाणी सांडपाण्याचे साम्राज्य पसरलेले दिसते. नदी, धरणे, तलाव यासारखे स्वच्छ पाण्याचे जलस्रोत आपले मर्यादित अस्तित्व सुधारत यंत्रणेच्या ओझ्याखाली निमूटपणे आखडते घेताना द़ृष्टीस पडत आहेत. कारखाने आणि इतर वस्तूनिर्मितीसाठी लागणार्या यंत्रणेत अतिरिक्त पाण्याचा वापर आणि उत्सर्जित होणारे उष्ण पाणी पुन्हा निसर्गाच्या जलसाठ्यांमध्ये प्रवाहित केल्यामुळे पर्यावरणाचा आणि जलचरांचा नाश स्वाभाविक आहे. ऑक्सिजनची मात्रा या जल प्रक्रियांमुळे संपुष्टात येऊन काही ठिकाणी जलचरांचा नाश मोठ्या प्रमाणात संभवतो. तसेच, आधुनिक यंत्रणेमुळे नदीचे प्रवाह नैसर्गिकरीत्या समुद्रास मिळत नाहीत.
नदीजोड प्रकल्प, धरणे यामुळे नदीचे प्रवाह अडवले जाऊन नदीच्या नैसर्गिक घटकांचा र्हास होत आहे. समुद्रातील पाण्यावरही परिणाम अंशतः होतो. समुद्रातील क्षार पातळी 35 टक्क्यांहून जास्त झाल्यास समुद्राची मिठागरे तयार होऊन आजूबाजूच्या नैसर्गिक संपत्तीवर त्याची बाधा संभवते. हे मीठ वार्याने सगळीकडे पसरले, तर हिरवाई नष्ट होऊन झाडाझुडपांचा र्हास होईल. यावर तोडगा म्हणून पुन्हा नवीन यंत्रणेचा अभ्यास आणि पुन्हा यंत्रांद्वारेच यावर प्रक्रियेचा मारा केला जाऊ शकतो. निसर्गाने आखलेली स्वतःभोवतीची सोनसाखळी आधुनिकीकरणामुळे निसर्गाच्या पायातील बेडी झालेली आहे. 2030 पर्यंत सर्वांसाठी पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणे आणि परिसराची स्वच्छता राखणे, हे जलसंपत्ती दिनाचे महत्त्व आहे. विकास म्हणजे पृथ्वी तत्त्वाला अनुरूप अशी राबवलेली यंत्रणा.
ज्यात निसर्गाच्या विरुद्ध जाऊन केलेली सुधारणा नसावी. जागतिक जलसंपत्ती दिनाच्या औचित्याने काही उपाययोजना राबविण्यात आल्या. घरच्या घरी पाणी वाचवा, जागरूकता वाढवा, स्थानिक उपक्रमांमध्ये सहभाग, शाश्वत कार्यपद्धतींचे समर्थक व्हा, सामुदायिक चर्चांमध्ये सहभागी व्हा, या गोष्टींचा समावेश केला गेला. ‘पाणी अडवू, पाणी जिरवू, पाणी वाचवू’ या त्रिसूत्रीचाही आपण अवलंब केला पाहिजे. आज बरेचसे पाणी कारखान्यांना लागते. उदा., साखर कारखान्यांत किलोच्या प्रमाणातील साखर स्वच्छ करण्यासाठी हजारो लिटर पाणी लागते. एक छोटे यंत्र तयार करताना वारंवार होणारा पाण्याचा वापर हा लाखो लिटर इतक्या प्रमाणात केला जातो. आधुनिकीकरण आणि औद्योगिकीकरण यामुळे उपयोगात येणारे पाणी म्हणजे पिण्यायोग्य पाणी घटत चालले आहे. याउलट जे पाणी खर्चालाही आपण जास्त वापरू शकत नाही, असे क्षारयुक्त पाणी वाढत चालले आहे.
भविष्यात कोट्यवधी संख्येने लोक पाण्याच्या अभावात जीवन जगतील, असा नीती आयोगाने 2018 मध्ये इशारा दिलेला आहे. वसुंधरा हे मुळात पाण्याचे निवासस्थान आहे. या जलस्रोतांची मानवाने किती पटीत हानी केली, याला पुरावे भरपूर आहेत. हा पुरावा म्हणजे प्रक्रियेतील यंत्रे. मनुष्याने फक्त सुविधांसाठी या संसाधनांचा पृथ्वीवर डोंगर रचून नद्या, तलावांना अडवण्याचा उपक्रम केला. हे फार अपराधी कृत्य म्हटले तरी ते अवास्तव नाही. काही घटकांची संयुगे एकत्रित येऊन पाण्याची निर्मिती होते. मानवी जीवनही पृथ्वीवरच आढळते. एकमेकाला मारक न ठरता तारक ठरण्यासाठी मानवाने या सुविधेला नैसर्गिकरीत्या हाताळण्याची गरज आहे. सर्वांनी एकत्रित येऊन जागतिक जलसंपत्ती दिन साजरा करत या गोष्टींची पूर्ती करायला हरकत नाही. सर्व देश या दिवशी आपली मते माध्यमांद्वारे व्यक्त करतात; पण पुनःपुन्हा घोषणा आधुनिकतेच्या होतात. हे थांबून नैसर्गिक पौराणिकशास्त्राचे महत्त्व जनतेला पटवून देण्याची जास्त गरज आहे.