Taking a selfie in a dangerous place
पुढारी तडका आर्टीकल Pudhari File Photo
संपादकीय

तडका : बाबांनो जरा सांभाळून!

पुढारी वृत्तसेवा

अरे काय चाललंय काय हे? मान्य आहे की, प्रखर उन्हाळ्यानंतर पाऊस पडला की, निसर्ग आणि सृष्टी हिरवीगार होते. साहजिकच कुठेतरी निसर्गामध्ये जाण्याची इच्छा तुमच्या मनात निर्माण होते. जा ना. जरूर जा; पण सांभाळून! पंचमहाभूतांशी खेळाल तर निश्चितच पस्तावाल. पावसाळ्यामध्ये हिरव्यागार झालेल्या दर्‍या, डोंगर, वाहते पाणी हे मनाला भुरळ पाडणारे असतेच; पण तितकेच धोकादायकसुद्धा असते, हे आधी समजून घ्या.

आणि काय तो तुमचा रिल काढण्याचा आणि धोकादायक जागी जाऊन सेल्फी घेण्याचा नाद? असंख्य लोकांचे जीव गेलेले आपण पाहिले आहेत. ऐकले आहेत, तरीही आपण पुन्हा त्याच त्याच चुका करत असू, तर निसर्ग आपल्याला माफ करणार नाही. लोणावळ्याजवळील भुशी डॅममध्ये दरवर्षी कितीतरी लोकांचे मृत्यू होतात; पण ती गर्दी काही केल्या हटता हटत नाही. घरातील लग्न पार पडल्यानंतर निवांतपणा म्हणून तिथे फिरायला गेलेल्या अन्सारी कुटुंबातील पाच जणांचा धबधब्याच्या पाण्यामध्ये वाहून जाऊन मृत्यू झाला आहे. हृदय पिळून टाकणारी घटना आहे आणि अक्षरशः त्याचा व्हिडीओ पाहताना नकोसे वाटत होते. निसर्गाच्या रौद्ररूपापुढे मानव किती क्षुद्र आहे, हे पाहताना जाणवत होते.

कोणताही मृत्यू झाल्यानंतर शासनाने काय केले पाहिजे, यावर खूप लोक भाष्य करतात. एवढ्या मोठ्या लोकसंख्येमध्ये आणि एवढा प्रचंड निसर्ग समृद्ध असलेल्या देशामध्ये प्रत्येक ठिकाणी शासकीय माणसे हवीतच कशाला? ती असूच शकणार नाहीत. काळजी आपली आपणच घेतली पाहिजे. बेदरकार वाहनचालक अशा कुठल्याही सूचनेला न जुमानता त्याच तुफानी स्पीडने गाड्या चालवतात आणि अपघाताला निमंत्रण देतात. पाणी वाहत असलेल्या ज्या ज्या ठिकाणी धोकादायक जागा आहेत तिथे ‘यापुढे जाऊ नका’ अशी सूचना देणारा बोर्ड मोठ्या अक्षरात लिहिलेला असतो. आलेले पर्यटक त्या बोर्डकडे साफ दुर्लक्ष करून पाण्याच्या दिशेने मार्गक्रमण करतात. हे मार्गक्रमण पाण्याच्या दिशेने नसून मृत्यूच्या दिशेने असते हे त्यांना पण कळत नाही. अरे बाबांनो, सुशिक्षित आहात तर या सगळ्या पाट्या वाचा ना? पाटी वाचल्यानंतर क्षणभर तिथे थांबून विचार करा ना?

किमान याचा तरी विचार करा की, आपण सहकुटुंब, लहान मुले, बाळे यांना घेऊन वाहत्या पाण्यात जात आहोत; पण तसे होत नाही. नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर काय करायचे याचे प्रशिक्षण घेऊनही तसा फारसा उपयोग होत नसतो. कारण, या संकटामध्ये अडकलेल्या जीवांना तितका विचार करायला वेळच मिळत नाही. ते आपल्या मृत्यूच्या धास्तीने घाबरलेले असतात आणि बाहेरून काही मदत मिळेल का हे पाहत असतात. नका रे बाबांनो, असे जीवघेणे खेळ करू. बोटीमध्ये जास्त लोक असतील तर नका ना जाऊ पाण्यापाशी... जीव तुमचा जातो आणि तितकीच आमचीही तळमळ होते हे लक्षात घ्या. दुःख फक्त तुमच्या नातेवाईकांनाच होते असे नाही, तर आमच्यासारख्या सामान्य नागरिकांनासुद्धा असे व्हिडीओ पाहिल्यानंतर मनाची तगमग होते. ताई, दादा, भावांनो पाण्यापाशी जाणार असाल, तर सांभाळून जा. तुमच्या घरचेच नाही, तर आमच्यासारखे सामान्य लोकसुद्धा काळजी करत आहेत, हे समजून घ्या.

SCROLL FOR NEXT