रघू : घरगुती सेवा देणार्यांना न्याय मिळवून दिलाच पाहिजे. पण माझी पत्नी कोणत्या मुद्द्यावर भांडणार न्याय मिळालाच तर? हा पण एक मुद्दा आहे...
बिरू : ते खरंय. पण बहुतांशी बायका याच मुद्द्यावरून भांडत असतील का नवर्यासोबत?
रघू : आता बायकोचा मोबाईल रिचार्ज संपला. मी लक्ष नाही दिले तरी भांडण होते. रिचार्ज संपला की इनकमिंग कॉल पण बंद. हाही मुद्दाच आहे.
बिरू : पण हे मुद्दे घरगुती वादामुळे डोक्यात ठेवून आहात का? तसे असेल तर तुम्ही आणि वाद हेच समीकरण योग्य आहे.
रघू : वाद सगळीकडे होतात. मुद्दे समजत नाहीत म्हणून गुद्द्यावर पोहोचतात लोक.
बिरू : तुम्ही गुद्दे खाल्लेले दिसतात घरी बायकोकडून. आम्ही बापडे बायकोशी बोलायलाच वेळ मिळत नाही.
रघू : म्हणून लोकांच्या लावालाव्या पाहत बसता, मिटवण्याच्या नावाखाली.
बिरू : तुम्ही असंच बोलणार. माझ्यावर सोसायटीची जबाबदारी आहे. तुमच्याकडे घरची फक्त. समाजकार्य करून दाखवा.
रघू : सर्व मुद्दे घरातच दडलेले असतात. मग डोक्यात, दारात मग संसदेत मांडले जातात.
बिरू : निकाल लावल्याशिवाय चिंता मिटत नाहीत. निकाल लावता आला पाहिजे.
रघू : वादच झाले नाहीत तर तुम्ही कशाचा निकाल लावणार? आणि सोसायटीमध्ये तुम्हाला कोण विचारणार?
बिरू : तेही खरंय. वाद आणि अडचणी दोन मुद्दे सोसायटीचा जीव आहेत. ते आहे म्हणून तरी किमान लोक येऊन एकमेकांशी बोलतात तरी. नाहीतर कोण कुठे कुठल्या अडचणीत आहे हे पण समजले नसते.
रघू : दुसरा मुद्दा आहे औषधं आणि शाळांची फी. फक्त लुटमार चालू आहे. देवस्थाने आणि विमानतळावर पण लुटमारी चालू आहे. दहा रुपयांच्या वस्तू शंभर रुपयांना विकतात आणि लोक घेतात. ही प्रगती आहे?
बिरू : तुमच्या घरात वाद प्रगतीच्या मार्गावर होता काल. ऐकू येत होता तो. वहिनी भांडत होत्या तुमच्याशी विमानतळावर. पाणीसुद्धा विकत घेतला नाही बाटली महाग आहे म्हणून. एवढा चिक्कूपणा बरा नाही.
रघू : तुम्ही घरगुती भांडणे चोरून ऐकता?
बिरू : अहो दुसरे दिवशी तेच मुद्दे सादर करता तुम्ही आमच्यासमोर. मुद्देसूद निकाल देता यावा यासाठी ऐकावं लागतं हो चोरून. हा हा हा...!