प्रत्येक तक्रारीचे निवारण करून मिळेल असे ऑनलाइन फर्मान समाधान दीदी चॅट बॉटच्या माध्यमातून शक्य करण्यात सरकारला यश प्राप्त झाले आणि तक्रारकर्त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळाले. या एआय चॅट बॉटवर एवढ्या तक्रारी तरंगू लागल्या की एआयला कोणाची तक्रार आधी घ्यावी ते सुधरेणा.
तक्रार ओरडून सांगावी लागते. मग, ठिपक्यांच्या रांगोळ्यांप्रमाणे काहीतरी चॅट बॉटवर येतं आणि उत्तरादाखल मार्गदर्शन मिळतं. एआय एकएक तक्रारी पुढे केंद्र सरकारच्या पोर्टलवर नेऊन सरकवतो. तसे निवारणही करण्यात येईल अशी हमी येऊ लागते. अशाने लोकशाही बिनधास्त झाली आणि आता नळावरची भांडणं पोर्टल वर येऊ लागली, तर ती दिदीला कसं पेलवणार, हा केंद्र सरकारला आधीच पडलेला प्रश्न!
सर्वात जास्त उपरती नळावरच सुचतात. दुसरा प्रश्न जमिनीचे वाद. ही भांडणाची दुसरी आवृत्ती असे पोर्टलला समजले. त्यानंतर कोर्ट कचेर्या या स्टेप्स हे पोर्टल वगळणार आणि डायरेक्ट मुद्द्याला हात घालणार ही तक्रारकर्त्यांना नामी संधी होती. मग, डायरेक्ट निकाल हाती; पण तक्रारी अचूक असल्या पाहिजेत. चुकीला माफी नाही अशा काहीशा आविर्भावात समाधान दीदीचे चॅट बॉट ताडकन ओपन होत आधीच सुचवत होते. पोर्टल वजनदार तक्रारी घेऊन येईपर्यंत हलक्या हलक्या तक्रारीत बोजड होऊन जाते की काय, याचीही धास्ती. 60 दिवसांत तक्रार निवारण व्हायचं ते आता या दीदींमुळे आठवड्यात पार पडेल. दीदी रक्षाबंधन आणि भाऊबीजेला लोकशाहीतील बांधवांकडून ओवाळणी न घेता लोकशाहीला सुरक्षा प्रदान करून समाधानाची लहर आणणार हे चित्र स्पष्ट झाले. केंद्रातल्या राज्यमंत्री महोदयांनी या दीदीला पाठिंबा देऊन हे कार्य दीदींकडे सुपूद केले. बघता बघता दीदींकडे लाखाच्या वर तक्रारी येऊन पडल्या. समाधान दीदी देशातल्या कानाकोपर्यांतल्या बंधूंच्या आणि भगिनींच्याही समस्या चॅट बॉटमार्फत सोडवणार.
प्रत्येक नागरिक आपल्या जीर्ण किंवा खड्या आवाजात जरी तक्रारी करू लागला, तरी दीदींच्या पोर्टलवर त्यांना ओरडून अपमानित करून परत पाठवले जाणार नाही, हा दीदींचा जनतेला दावा. आपल्या आवाजात, भाषेत कसेही बोलावे; पण स्पष्ट बोलावे, कोणाच्याही दारी न जाता थेट माझ्या पोर्टलवर यावे, कोणत्याही भाषा चालतील. पोर्टल आपलेच आहे, काळजी नसावी! थँक्यू समाधान दीदी!
(आपलाच एक बंधू )