Pudhari tadaka article
तडका आर्टिकल Pudhari File Photo
संपादकीय

तडका आर्टिकल : राजकारणाची ऐशीतैशी

पुढारी वृत्तसेवा

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांच्या पाठोपाठ येऊ घातलेल्या विधानसभा आणि महानगरपालिकांच्या निवडणुका आपल्यासारख्या सामान्य लोकांसाठी अजिबात महत्त्वाच्या नाहीत. आपल्यासाठी महत्त्वाच्या नसल्या तरी प्रत्येक राजकीय कार्यकर्त्यासाठी त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. निवडणुका जाहीर होण्यापूर्वी राजकीय कार्यकर्ते संपर्क वाढवायला सुरुवात करतात. वॉर्डात असेल, गावात असेल किंवा विधानसभा मतदारसंघात असेल, तर जिथे कुठे लग्न समारंभ किंवा काही वाईट घटना घडली असेल, तिथे हे आवर्जून पोहोचतात. ‘मरणाला आणि तोरणाला हजर राहिले पाहिजे’ ही आपली मराठी संस्कृती आहे. शिवाय या दोन्ही ठिकाणी भरपूर गर्दी जमा झालेली असते, त्यामुळे एकाच वेळी अनेक लोकांशी संपर्क होऊ शकतो म्हणून ही संधी राजकीय लोक कधी सोडत नसतात.

राजकीय नेतेमंडळी एखाद्या विवाह समारंभाला येणार असतील, तर त्यामुळे मुलीकडील मंडळींची आणि विशेषत: वधुपित्याची प्रतिष्ठा वाढत असते. आमदार, खासदार, नगराध्यक्ष, अगदीच कुणी नाही तर गेला बाजार नगरसेवक तरी आपल्याकडील विवाह समारंभाला हजर असावा, असे लोकांना वाटत असते. त्याप्रमाणे त्याला निमंत्रण दिलेले असते. या तथाकथित राजकीय व्हीआयपी लोकांच्या उशिरा येण्यामुळे बरेचदा लग्न दोन तास, तीन तास, क्वचित प्रसंगी पाच तास उशिरा लागलेले आपण नेहमी पाहत असतो.

दुःखद घटनेमध्ये मृत व्यक्तीच्या दहाव्याच्या दिवशी सर्व नातलग आणि इतर लोक एकत्र येत असतात. या दुःखद घटनेला संपर्क वाढवण्याची पर्वणी म्हणून राजकीय लोकही दहाव्या दिवशी येतात आणि शोकसभेमध्ये भावनांनी ओतप्रोत असलेले भाषण करतात. क्वचित प्रसंगी मयत व्यक्तीने आपल्या पक्षावर निष्ठा ठेवून कसे कार्य केले, याची आठवणही त्याच्या नातेवाईकांना करून देतात. थोडक्यात, मतदान मिळवण्याची एक संधी म्हणून दहावा दिवस पण सोडला जात नाही.

असा हा नातेवाईकांसाठी दुःखाचा प्रसंग राजकीय लोकांनी संधी साधून घेण्यासाठी वापरला, याचे वाईट वाटल्यामुळे उरळी कांचन येथील ग्रामस्थांनी स्मशानभूमीच्या बाहेर चक्क एक बोर्ड लावला आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, ‘मयत आणि दहावा हा त्या कुटुंबासाठी आणि नातेवाईकांसाठी खूप मोठा दुःखाचा प्रसंग असतो. श्रद्धांजली वाहून राजकीय फायदा घेण्यासाठी लोकांना वेठीस धरणे थांबवले पाहिजे.’ त्यात ते पुढे असेही म्हणतात की, ‘एकाच ज्येष्ठाने श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाचा शेवट करावा. राजकीय लोकांनी भाषणे करून लोकांच्या भावनेशी खेळणे बंद करावे. व्यक्तीची आठवण म्हणून तसेच हरिनाम कानावर पडावे म्हणून सहसा ग्रामीण भागात कीर्तन ठेवले जाते. कीर्तन झाले की, श्रद्धांजली वाहून सर्वजण आपापल्या कामाला लागतात. एक दुःखद प्रसंग आणि मयत व्यक्तीबद्दलच्या सहाजिकच निर्माण होणार्‍या आठवणी जागवत लोक आपापल्या घरी जातात. या ठिकाणी परिसरातील स्थानिक राजकीय लोक येऊन चक्क अर्धा एक तास भाषण करतात. त्यांचा उद्देश सरळसरळ पाहता निवडणुकीचा प्रचार करणे हाच असतो; पण त्याला श्रद्धांजलीचे आवरण घातलेले असते. या सर्व प्रकाराला लोक कंटाळले आहेत आणि त्यामुळेच त्यांनी स्मशानभूमीबाहेर चक्क असे बोर्ड लावले आहेत. यातून तरी राजकीय लोक धडा घेतील, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

SCROLL FOR NEXT