PM Modi Independence Day Speech 2026 File Photo
संपादकीय

संकल्प विकसित भारताचा

पुढारी वृत्तसेवा

स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात कोणते मुद्दे मांडणार, कोणत्या आर्थिक-सामाजिक विषयांना स्पर्श करणार आणि देशातील जनतेला कोणता संदेश देणार, याची उत्सुकता असणे साहजिकच असते. देशातील प्रत्येक माणसाशी संवाद विशेषत: तरुणाईशी हितगुज साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच जेन झीला हाक दिली. ‘२०४७ विकसित भारत’ हाच आपला दृढ संकल्प असल्याचे सांगून पुढील वर्षभरात एक कोटी युवकांना एआयचे (कृत्रिम बुद्धिमत्ता) प्रशिक्षण दिले जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली. देशाला जगात तिसरी महासत्ता बनविण्यासाठी विकसित भारताच्या संकल्पनेचा आराखडाच पंतप्रधानांनी आपल्या ७६ मिनिटांच्या भाषणातून सादर केला. या संकल्पनेत ‘जेन झी’ व ‘जेन अल्फा’ ही युवा पिढी समोर ठेवूनच आपले लक्ष्य साध्य करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संसदेचे पावसाळी अधिवेशन गोंधळ- गदारोळातच पार पडले. दिल्लीत ‘जेन झी’च्या मोर्चावर पोलिसांनी निर्घृण लाठीमार केल्याच्या घटनेपासून म्हणजेच गेल्या वीस जुलैपासून अगदी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत संसदेच्या दोन्ही सदनांचे कामकाज विरोधी पक्षांनी चालू दिले नाही. गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेच्या सभागृहात येऊन विद्यार्थ्यांच्या मोर्चावर पोलिसांना गोळीबार करण्याचे आदेश कुणी दिले हे सांगावे, अशी ताठर भूमिका विरोधी पक्षांनी घेतली. सरकारने चर्चेची तयारी दाखवली, तरीही आम्हाला भाषणबाजी ऐकून घ्यायची नाही, असे विरोधी पक्ष सांगत राहिले. हे पावसाळी अधिवेशन चर्चेविनाच वाहून गेल्यामुळे पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावरून काय बोलतात, याकडे सर्व देशाचे लक्ष लागून राहिले होते. त्यांनी आपल्या भाषणात २०४७ विकसित भारत कसा घडवायचा आहे व त्यासाठी तंत्रज्ञान, विज्ञान, शिक्षण, संरक्षण, उत्पादन, परमाणू ऊर्जा, कौशल्यविकास आधारित मनुष्यबळ, क्रीडा, एआय, सेमीकंडक्टर अशा विविध क्षेत्रांत भारताला कशी प्रगती साधायची आहे, याची संकल्पना मांडली. विरोधी पक्षाने गोंधळ, गदारोळ घालण्याचे काम करीत राहावे, आपल्याला मात्र ‘विकसित भारत २०४७’ हे लक्ष्य गाठायचे आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. १५ ऑगस्ट २०४७ रोजी भारताच्या स्वातंत्र्याला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत, तोपर्यंत विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्याचे लक्ष्य सरकारने ठेवले आहे. लाल किल्ल्यावर प्रथमच 'वंदे मातरम्‌' गायले गेले. या राष्ट्रीय गीताला दीडशे वर्षे पूर्ण झाली. त्याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. लाल किल्ल्यावरून सादर झालेल्या 'वंदे मातरम्‌' गीताने संपूर्ण भारतीयांमध्ये कशी ऊर्जा निर्माण झाली, याचाही अनुभव यानिमित्ताने देशवासीयांना आला. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून केलेले हे तेरावे भाषण होते. आजवर त्यांनी केलेले तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात कमी कालावधीचे हे भाषण होते. बारा वर्षांपूर्वी सत्तेवर येण्यापूर्वी मोदींनी देशातील नक्षलवाद संपुष्टात आणण्याचे आश्वासन जनतेला दिले होते. दिलेला शब्द त्यांनी पूर्ण करून दाखवला. त्याचा त्यांनी उल्लेख करताना म्हटले, सशस्त्र नक्षलवादी आता उरलेले नाहीत; पण वैचारिक नक्षलवादी अजूनही अस्तित्वात आहेत. नक्षलग्रस्त भागात आता भारताचा तिरंगा अभिमानाने फडकू लागला आहे; पण वैचारिक नक्षली संधीच्या शोधात आहेत. अशा नक्षल्यांना शोधले पाहिजे व त्यांना तरुणांची दिशाभूल करण्यापासून रोखले पाहिजे. बौद्धिक नक्षल्यांना वेगळे पाडण्याचेही आवाहन त्यांनी यावेळी केले. गरीब व मध्यमवर्गीय मुलांच्या पालकांसाठी कोचिंग क्लासेस हा खर्चाचा मोठा बोजा वाटतो. कोचिंग क्लासची स्पर्धा गरीब व मध्यमवर्गीयांना परवडत नाही. कोचिंग क्लासला पाठवले नाही, तर मुलांचे करिअर विकसित होणार नाही, असे मध्यमवर्गीयांना वाटते, याची चिंता आम्हाला वाटते, हे पंतप्रधानांनी आवर्जून म्हटले. अशा मुलांसाठी विविध परीक्षांसाठी मोफत ऑनलाईन कोचिंग देण्याची घोषणाही त्यांनी केली.

देशातील जनतेला काही जण घाबरवतात, भयभीत करतात, चिंतेत ठेवण्यात आनंद घेतात; पण अशा लोकांपासून सावध राहण्याचे त्यांनी आवाहन केले. गेल्या दहा बारा वर्षांत कितीही संकटे आली, तरी ‘नागरिक देवो भव:’ असा मंत्र घेऊन आम्ही त्यावर मात करण्यात यशस्वी झालो, असे त्यांनी आत्मविश्वासाने सांगितले. महिला आरक्षण विधेयक कसे खोळंबले आहे, याची त्यांनी आठवण करून दिली. महिला आरक्षण लागू करून महिलांचा सन्मान करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होणे, ही काळाची गरज आहे, असे त्यांनी सर्वच राजकीय पक्षांना आवाहन केले. विकसित भारताचे ध्येय गाठण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत; पण त्यासाठी आपली मानसिकता व कार्यसंस्कृती बदलावी लागेल. गेल्या पाच-सात दशकांपासून प्रलंबित असलेली कामे आपल्याला पाच-सात वर्षांत पूर्ण करावी लागतील, असेही त्यांनी जनतेला बजावले. आत्मनिर्भर भारताचा त्यांनी यंदाच्या भाषणात पुन्हा उल्लेख केला. कोणत्याही बाबतीत इतर देशांवर अवलंबून राहण्याची वेळ येऊ नये, यासाठी भारताने आपली क्षमता वाढवली पाहिजे, तसेच आपल्या हिताचे रक्षण आपणच केले पाहिजे, असे सांगत देशाच्या अर्थव्यवस्थेविषयी बोलताना पंतप्रधानांनी बँकांच्या कारभाराचा व त्यांच्या कार्यक्षमतेचा उल्लेख केला. एखादी भारतीय बँक जगातील पहिल्या पाच बँकांमध्ये असली पाहिजे, तसेच 'फॉर्च्युन ५००' यादीमध्ये पन्नास भारतीय कंपन्या असल्या पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखवली. गेल्या बारा वर्षांत पंचवीस कोटी लोक गरिबीतून बाहेर आलेले आहेत, हे त्यांनी अभिमानाने सांगितले. वेगाने वाढणारी भारताची अर्थव्यवस्था कोणी रोखू शकत नाही, अशा शब्दांत त्यांनी जगाला बजावले. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाने 'घर घर तिरंगा, हर मन तिरंगा' ही मोहीम आठवडाभर चालवली. त्यातून देशभक्तीची भावना निर्माण व्हावी या हेतूने काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक शहरात व गावागावांत 'घर घर तिरंगा' अशा घोषणा देत मिरवणुकाही काढल्या. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने घराघरापर्यंत पोहोचण्याचा आणि देशप्रेमाची भावना जागवण्याचा प्रयत्न सरकार आणि पक्षाच्या पातळीवर झाला. राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांनीही या राष्ट्रीय जागरणात हिरिरीने भाग घेतला; मात्र लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याला संसदेतील दोन्ही विरोधी पक्षनेते उपस्थित राहिले नाहीत, हे योग्य झाले नाही. ही संधी त्यांनी गमावली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT