“साहेब, नमस्कार. या निवडणुकीमध्ये तुम्ही अपक्ष म्हणून उभे आहात. जनमानसाचा कौल कसा आहे असे तुम्हाला वाटते?”
“जनता सगळ्याच राजकीय पक्षांना कंटाळलेली आहे हे तर दिसतेच आहे. खरे पाहता मी या निवडणुकीला उभे राहायला तयार नव्हतो. कारण माझासुद्धा सगळ्या राजकीय पक्षांवरचा विश्वास उडालेला आहे. तिकीट देतो देतो म्हणतात आणि ऐनवेळेला दिलेले तिकीट पण काढून घेतात. याला काही अर्थ नाही. राजकारणाच्या भानगडीत पडायचे नाही, असे ठरवून मी घरी बसलो होतो. पण लोक कसले गप्प बसू देतात? लोकांची सारखी रीघ लागली घरी. सगळ्यांचा एकच आग्रह... ‘भाऊ, तुम्ही निवडणूक लढवणार नाही तर मग आम्ही कोणाकडे पाहायचे? आपल्या वॉर्डाचा विकास करायचा तर तुम्हीच असले पाहिजे.’
मी प्रत्येकाला नाही म्हणून सांगत होतो. पण आधी जनता आणि मग कार्यकर्ते प्रचंड संख्येने घरी यायला लागले आणि त्यांच्या आग्रहामुळे मला उभे राहावे लागले. शेवटी जनतेचा कोणी विचार करणार आहे की नाही? जनतेची सेवा आणि वॉर्डाचा विकास करण्यासाठीच मी उभा आहे.”
“बरोबर आहे भाऊ, अपक्ष उभे राहून तुम्ही समीकरण मात्र बदलून टाकले आहे, असे सगळे म्हणतात. हे कसे काय शक्य झाले?”
मतदारसंघाचे होईल ते होवो. परंतु तुम्हाला खासगीत म्हणून सांगतो. 10 एकर जमिनीचा तुकडा विकला तेव्हा कुठे मला उभे राहता आले. स्वतःची जमीन विकून लोकांची सेवा करणारा कुणी अपक्ष उमेदवार तुम्हाला भेटला तर मला जरूर सांगा. आता तुम्ही विचारलेल्या प्रश्नाकडे वळतो. तुम्ही म्हणालात की, मी मतदारसंघाचे गणित बिघडवून टाकले. अहो कशाचे गणित आणि कशाचे काय? माझा स्वतःचा जनसंपर्क दांडगा आहे. गेली पाच वर्षे डोहाळ जेवणापासून ते अंत्यविधीपर्यंत वॉर्डातील प्रत्येक कार्यक्रमाला मी स्वतः हजर आहे. मरणाला आणि तोरणाला माणसाने हजर असले पाहिजे असे म्हणतात. अशा प्रत्येक ठिकाणी हा भाऊसाहेब स्वतः हजर असतो. मी जनतेसाठी 24 तास उपलब्ध आहे. पोलिस स्टेशनला कंप्लेंट झाली तर जमानत घेण्यासाठी, कोणी आजारी पडला तर त्याला दवाखान्यात नेण्यासाठी, कुणा शेंबड्या पोराचा बर्थडे असेल त्यासाठी मी हजर आहे. अगदी वाट्टेल त्या प्रसंगासाठी मी जनतेच्या दारात जातो. ही जनता मला विजय मिरवणुकीमध्ये घेऊन जाईल याची मला खात्री आहे.”
“बराय, येतो साहेब. या निवडणुकीत यश मिळण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा.”
“अहो म्हणजे काय? निवडून येणारच आहे. निकाल लागला की या पेढे खायला. राम राम.”