ऋषीपंचमी हा दिवस प्राचीन भारतातील महान ऋषींच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आणि त्यांच्या ज्ञानाचे स्मरण करण्यासाठी साजरा केला जातो. वैदिक संस्कृतीत ऋषी केवळ धार्मिक मार्गदर्शक नव्हते, तर ते आजच्या परिभाषेतील संशोधक, खगोलशास्त्रज्ञ, गणितज्ज्ञ आणि वैद्यकशास्त्रज्ञ होते. आकाशातील सप्तर्षी तारांगण (Ursa Major) हे याच महान ऋषींच्या स्मरणाचे आणि खगोलशास्त्रातील त्यांच्या योगदानाचे प्रतीक मानले जाते. ऋषीपंचमीच्या दिवशी कश्यप, अत्री, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि वशिष्ठ या सप्तर्षींची पूजा केली जाते. या दिवशी केवळ धार्मिक विधी न करता प्राचीन भारताने विज्ञान, तंत्रज्ञान आणि तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते.
ऋषी कणाद : महर्षी कणाद यांनी वैशेषिक दर्शनाची रचना करून सृष्टीच्या निर्मितीची तात्त्विक मांडणी केली. त्यांना अणू सिद्धांताचे (Atomic Theory) जनक मानले जाते. पदार्थ हे लहान कणांचे (अणूंचे) बनलेले असतात, हे विचार त्यांनीच सर्वप्रथम मांडले.
महर्षी चरक : यांनी आयुर्वेदाच्या मूल्यांची आणि मानवी कल्याणाची तात्त्विक पायाभरणी केली. त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ चरक संहिता मानवी शरीरशास्त्र, औषधी वनस्पती आणि रोगांचे निदान यावर आधारित वैद्यकशास्त्राचा पाया आहे.
महर्षी सुश्रुत : यांनी शल्यचिकित्सेत नैतिक नियमावलीची निर्मिती केली. त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ म्हणजे सुश्रुत संहिता. ते जगातील पहिले शल्यचिकित्सक मानले जातात. प्लास्टिक सर्जरी, मोतिबिंदू शस्त्रक्रिया आणि शल्यचिकित्सेच्या उपकरणांचा शोध त्यांनीच सर्वप्रथम लावला.
ऋषी भारद्वाज : ऋग्वेदातील अनेक मंत्रांचे द्रष्टे, गुरुकुल परंपरेचे समर्थक असे हे महान ऋषी. यंत्र व विमानशास्त्राविषयीचे मूलभूत विचार त्यांनीच सर्वप्रथम मांडले. त्यांनी ‘यंत्र सर्वस्व’ नावाचा एक विस्तृत ग्रंथ लिहिला होता, ज्याचा एक महत्त्वाचा भाग ‘वैमानिक शास्त्र’ (किंवा वैमानिक प्रकरण) म्हणून ओळखला जातो. भौतिकशास्त्र, धातूशास्त्र आणि उड्डाणशास्त्राविषयीचे प्राथमिक विचार त्यांच्या लिखाणात आढळतात.
महर्षी पतंजली : हे योगदर्शनाचे जनक असून, मानवी मनाच्या शुद्धीचा मार्ग त्यांनी दाखवला. योगसाधनेचे शास्त्रशुद्ध विश्लेषण ‘योगसुत्र’ आणि संस्कृत व्याकरणावरील ‘महाभाष्य’ त्यांनीच लिहिले.
ऋषी आर्यभट्ट/बौधायन : यांनी गणितालाच ध्यानाचे आणि साधनेचे माध्यम मानले. बौधायन सुलभ सूत्रामध्ये ‘पायथागोरसच्या प्रमेया’चा पाया आणि भूमितीतील जटिल गणितांचे नियम आढळतात.
महर्षी वशिष्ठ व विश्वामित्र : गायत्री मंत्राचे ज्ञान विश्वामित्रांनी दिले. अध्यात्मातील आचारसंहिता, पर्यावरण संवर्धन, खगोलशास्त्र, ऋतूचक्र आणि धनुर्विद्या (शस्त्रास्त्रशास्त्र) याचे ज्ञान या दोन्ही ऋषींनी दिले.