बदलीसाठी वाट्टेल ते!  (Pudhari File Photo)
संपादकीय

Transfer Policy | बदलीसाठी वाट्टेल ते!

शासकीय कर्मचार्‍यांच्या आयुष्यामध्ये बदली ही मजेशीर गोष्ट असते. नेमेचि येतो पावसाळा तसंच नेमेचि होते बदली, असे हे प्रकरण आहे. काहीजण यामुळे खूश असतात, तर काहीजण नाराज.

पुढारी वृत्तसेवा

शासकीय कर्मचार्‍यांच्या आयुष्यामध्ये बदली ही मजेशीर गोष्ट असते. नेमेचि येतो पावसाळा तसंच नेमेचि होते बदली, असे हे प्रकरण आहे. काहीजण यामुळे खूश असतात, तर काहीजण नाराज. अशाच बदलीची टांगती तलवार जिल्हा परिषद कर्मचारी आणि विशेषत: शिक्षकांवर असते. दर तीन वर्षाला बदली करायची, हा शासकीय नियम असल्यामुळे नुकताच कसाबसा स्थिर झालेला कर्मचारी सामान बांधून दुसर्‍या गावाला जायला सज्ज होतो. आपल्या मुलाबाळांच्या शिक्षणामुळे बरेच शिक्षक आपले कुटुंब एका ठिकाणी स्थिर ठेवतात आणि स्वतः पृथ्वीभोवती फिरणार्‍या उपग्रहासारखे फिरत राहतात. साधारणतः, जून महिन्यात बदल्या होतात; पण त्यासाठी कर्मचार्‍यांचे प्रयत्न मार्चपासूनच सुरू होतात. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण सभापती आणि शिक्षणाधिकारी यांचा बदल्यांमध्ये महत्त्वाचा रोल असतो. विशिष्ट गावाला बदली मागण्याचे विशिष्ट कारण द्यावे लागते.

अहिल्यानगर जिल्ह्यात बदलीसाठी वाट्टेल ती कारणे देण्याचे प्रकरण समोर आले आहे. यात गमतीचा भाग असा की, बहुतांश महिलांनी आपला घटस्फोट झाला असून, आपण एकटे राहत आहोत, असा दावा केलेला आहे. बर्‍याच महिला शिक्षकांनी आपल्याला नवर्‍याने टाकलेले असून, म्हणजेच त्या परित्यक्ता आहोत, त्यामुळे सोयीचे गाव द्यावे, अशी विनंती केलेली आहे. अहिल्यानगरचे कार्यकारी अधिकारी अचानक वाढलेल्या या घटस्फोटांच्या प्रकरणांमुळे चकित झाले आणि त्यांनी चौकशी करायला सुरुवात केली, तेव्हा असे लक्षात आले की, अर्ज करणार्‍या शिक्षिका घटस्फोटीत नसून, आपल्या नवर्‍याबरोबर सुखाने संसार करत आहेत.

याचा अर्थ इतकाच की, आपण घटस्फोटीत किंवा विभक्त असल्याचे कारण दाखवून सहानुभूती मिळवायची आणि अपेक्षित ठिकाणी बदली करून घ्यायची, असा हा प्रकार. काहींनी घटस्फोट मंजूर झाल्याची कागदपत्रे सोबत जोडली होती. म्हणजे कागदोपत्री घटस्फोटही मिळवला आणि पाहिजे तिथे बदली करून घेतली. हा चमत्कार फक्त हे कर्मचारीच करू जाणे. एका बदलीसाठी किंवा तीन वर्षे याच ठिकाणी राहण्याचा हव्यास व्यक्तीला कुठपर्यंत घेऊन जातो याची ही परिसीमा म्हणावी लागेल. एकमेकांचे पटत नाही म्हणून घटस्फोट घेणे हे समजू शकते; पण एकमेकांना एकत्र राहता यावे म्हणून घटस्फोट, हे नवीनच आहे. आता तुमच्या लक्षात आले असेल की, अनेकजण वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कसे ठाण मांडून बसतात किंवा एकाच गावात या विभागातून त्या विभागात बदली करून घेतात; पण काहीही झाले तरी गाव सोडत नाहीत, असे कसे. तर ही सारी प्रकरणे अशाप्रकारची असतात. सामोपचारानेही बदल्या होतात आणि त्या यशस्वीही होतात; पण घटस्फोट दाखवून सुखाने संसार करणार्‍यांची संख्या काही कमी नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT