बाळ : मला गणित खूप अवघड वाटते. मला गणितचा पेपर अवघड जाणार. मंत्र्यांसारखे विद्यार्थ्यांचे असते, तर मी चौथी सोडून डायरेक्ट पाचवीत गेलो असतो.
भारती : असे कसे? गणित सुटले नाही तर मराठीचा पेपर चांगला लिही. मराठी आलीच पाहिजे. गणित येऊ दे नाही येऊ दे. मी गणितचा अभ्यास सोडून दिला. कारण, पुस्तकच चुकीचे आहे असे समजले.
बाळ : मी तर कॉन्व्हेन्टला जाईन म्हणतो. आई-बाबा बोलत होते.
भारती : मी मराठी नाही सोडू शकत गणितासाठी.
बाळ : मला तर शाळाच नको वाटते. इतिहास, गणित आणि भूगोल. सगळेच डोक्याबाहेरचे.
भारती : शिकून मोठं व्हा म्हणतात; पण मोठे झाल्यावर शिकलेल्या गोष्टीचा काय उपयोग ते सांगत नाहीत हे मोठे लोक.
बाळ : शिकून झाल्यावर फक्त सत्ता गाजवायची घरात, बाहेर, राजकारणात! नाही तर अभिनेता व्हायचं. कारण, अभ्यासात डोकं नसल्यावर काय करणार. म्हणून बाबा म्हणतात. डोकं चालव. आपल्याला मंत्री व्हायचं नाही. ऑफिसर, डॉक्टर व्हायचंय.
भारती : नंतर राजकारणात जायचं! बरोबर ना?
बाळ : अगं असं नसतं. डॉक्टर, ऑफिसर, अभिनेते मंत्री होतात; पण सगळेच नाही काही. वेडी.(हसत)
भारती : पण, आपण मत मंत्र्यांना देतो, निवडून आणतो. मग, ते श्रेष्ठ नाहीत का? शिकून कोणी मंत्री होतात का?
बाळ : (डोळे विस्फारत) तू हो बाई. मला पण घेता येईल राजकारणात एन्ट्री. मला नाही तर अभ्यासच नको वाटतो.
भारती : बाबा म्हणतात, मराठी बाणा आपला! मराठी आलीच पाहिजे. ते राजसाहेबांचं भाषण ऐकतात. मग, बाबांचं भाषण आम्हाला घरी ऐकावं लागतं.
बाळ : पण, बरे झाले गणिताच्या पुस्तकाने घोळ घातला नाही तर मला गणित येते कुठे! (तोंडावर हात ठेवून हसत)
भारती : यात पण मला गोची वाटते. गणित कोणालाच आवडत नाही असे दिसते. गणिततज्ज्ञही आता गणिताला कंटाळले. मग, आपण कशाला त्याला सोडवायचं? पुस्तक बंद. उघडायचेच नाही. देऊळ बंद तसे गणित बंद म्हणून गणिताच्या पुस्तकाला कुलपात टाकू. मग बघू कोण सोडवते! (हसत टाळ्या देत.)