बंधू : (मातोश्रीवरून फोन) कोणी धनुष्य देता का धनुष्य? कोठे गेला असेल? पाहिलास का तू आपल्याकडे होता म्हणे?
राज : साहेबांनी (बाळासाहेब) जाताना बरोबर नेला असे समजावे. धनुष्य होता तरी का? निशाणी म्हणा!
बंधू : काय चेष्टा करतोस ऊठ सूट. तू काही साहेबांचा उत्तरदायी वगैरे समजू नको. आम्ही आहोत साहेबांनंतर.
राज : मग धनुष्य आपल्यातून गेला त्याचेही उत्तरदायी आपणच आहात बंधुराया.
बंधू : ठीक आहे. आम्ही शोधू. तुम्ही तुमची शाब्दिक तोफ डागायची बंद करा. तोफेचे तोंड विरोध्यांकडे असू दे नेहमी. आपल्यात वाद नको.
राज : मला आणि तुलाही माहिती आहे धनुष्य कोठे आहे. जिकडे बाणाचे रोख होते तिकडेच धनुष्य पण फिरला. साहेबांनी शेवटी कोणावर निशाणा धरला होता?
बंधू : कोकणाच्या दिशेने?
राज : यही तो राज की बात है! तो धनुष्य आता एका टीळाधारीकडेच आहे. हे तुलाही माहिती आहे. ते सगळे एक आहेत.
बंधू : पण, ती फक्त निशाणी सांभाळतात. धनुर्धारी तर आम्ही आहोत वारशात.
राज : योग्य बोलले होते साहेब. धनुष्य पेलवणं सोपं नाही. अहो बंधुराया, निशाणीतूनच निशाणा साधला तुमच्यावर. खरे शिवधनुष्य तेच आहे. तू धनुष्य शोधण्याच्या नादात निशाणी हरवलास. तेच तर होते खरे धनुष्य.
बंधू : काय सांगतोस? साहेब निशाणीला धनुष्य संबोधत होते. आम्हाला वाटलं झेंडा नेतायत नेऊदेत.
राज : बाप रे! केवढं हे अज्ञान?
बंधू : आम्ही तर साहेबांची माळ पण लपवली होती.
राज : जाऊदे ते. तू चहा घ्यायला येतोस का पार्कमध्ये. मीही बाहेर पडलोय. फ्रेश होशील. झालं गेलं गंगेला मिळालं.
बंधू : अरे, असा कसा रे तू विरुद्ध वाहतोस अगदी प्रवाहाच्या? ते निशाण परत आणण्यासाठी मदत करशील ना?
राज : मी सुखी आहे. सुखात राहूदे. लोकल धावताना पाहिली की मन सुखावतं. तेवढं पुरेसं आहे. रिकामी का धावेना!
बंधू : आम्हाला पण लोकलने प्रवास करायचा आहे. भविष्यात तुझ्यासोबत, असा विचार करतोय आम्ही सध्या. चल, येतोय मी चहासाठी. ठरवू.
राज : अवश्य!