आधुनिक विज्ञानाने तसे माणसाचे जीवन खूपच सुकर केले आहे. कपडे धुण्यासाठी घरोघर वॉशिंग मशिन आल्या. उन्हाळ्यातील उष्णतेवर मात करण्यासाठी एसी आले. घरीच चित्रपटाचा फील देणारे होम थिएटर आले. एवढेच काय, भांडे घासण्याची कटकट नको म्हणून डिश वॉशरही आले आहेत. घरातील झाडपूस, साफसफाई करण्यासाठी ऑटोमॅटिक रोबोटसुद्धा विज्ञानाने दिले आहेत. या मशिन्सचा आविष्कार पाहून आपणही कधीकधी चकित होऊन जातो. फरशी पुसणार्या रोबोटला तुम्ही प्रोग्रामिंग करून दिली की, घरातील चार्जिंग स्टेशनवरून गोल गोल फिरत तो निघतो आणि तुम्ही नेमून दिलेल्या घराचा भाग चकचकीत करून परत चार्जिंग स्टेशनला जाऊन स्वतःची चार्जिंग करून घेतो.
एवढे सगळे आपण करत असताना कृत्रिम बुद्धिमत्ता नावाचे प्रकरण आपल्या आयुष्यात येऊ घातले आहे. यापूर्वीच अलेक्सा नावाची एका असिस्टंट बाई घराघरांमध्ये स्थापित झाली आहे. या अलेक्साचे कनेक्शन सर्व उपकरणांना लावले की, तुम्ही फक्त आदेश द्यायचा, अलेक्सा किशोर कुमारचे गाणे लाव!’ अलेक्सा तुमच्या साऊंड बॉक्सला तो आदेश देऊन तत्काळ किशोर कुमारचे गाणे तुम्हाला ऐकवेल. कृत्रिम बुद्धिमत्ता हे त्याच्या पुढचे प्रकरण आहे. उदाहरणार्थ, तुम्हाला पत्र लिहायचे आहे. आणखी सोपे करून सांगायचं, तर तुम्हाला कोणाला प्रेमपत्र लिहायचे आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेला पत्र कुणाला लिहायचे आहे? त्यात नुसतेच प्रेम व्यक्त करायचे आहे की अन्य काही पाहिजे? चंद्र, सूर्य, निसर्गातील कोणत्या उपमांचा वापर करायचा आहे, हे एकदा सांगितले की, अवघ्या काही सेकंदांत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून ते प्रेमपत्र तुमच्यासमोर येते. कृत्रिम बुद्धिमत्ता तुम्हाला कविता, कथा लिहून देईल किंवा गाणी पण तयार करून देईल.
कुठलाही ड्राफ्ट तुम्हाला करायचा असेल किंवा कोणतेही काम करायचे असेल, तर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने अवघ्या काही क्षणांत करणे ते शक्य झाले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे नोकर्या वाढतील की कमी होतील, याविषयी चर्चा सुरू असताना यामुळे माणसाची बुद्धिमत्ता किंवा त्याची सर्जनशीलता कमी होईल का, याविषयीसुद्धा भीती व्यक्त करण्यात येत आहे. भारताचा संगणक क्षेत्रामध्ये मोठा दबदबा आहे. आपण संगणक तयार करत नाही, तर हे संगणक वापरणारे अभियंते तयार करतो आणि जगभरातील कंपन्यांना जसे पाहिजे तसे प्रोग्राम्स हे अभियंते तयार करून देत असतात. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून प्रोग्रॅमिंग व्हायला लागले, तर संगणक अभियंत्यांच्या नोकर्या कमी होतील, ही शक्यता निश्चितच निर्माण झालेली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणारे बुद्धिमान लोक आता तयार करावे लागतील, तरच या नोकर्या टिकण्याची शक्यता आहे.