शेअर बाजार गेल्या पाच सत्रांत सातत्याने वाढ दर्शवत असून मार्च 2023 मध्ये 57 हजार 500 असणारा सेन्सेक्स आता 65 हजार 700 अंकाच्या पुढे गेला आहे. सेन्सेक्स ही भारताच्या शेअर्स बाजाराची एकूण स्थिती व्यक्त करण्याची पद्धत मुख्यत्वे 30 महत्त्वाच्या शेअर्सवर आधारित असून भारतातच नव्हे तर जगभर त्याचा वापर होतो. याच्या जोडीला राष्ट्रीय सूचकांक निफ्टी हा 50 शेअर्सवर आधारित असून तोही 19 हजार 490 अंकाचा टप्पा गाठत आहे. शेअर बाजार केवळ तीन महिन्यांत 11 टक्क्यांनी वाढला असून आता जागतिक क्रमवारीत अमेरिका चीन आणि जपाननंतर सर्वात मोठा आहे.
शेअर बाजारात आणि म्युच्युअल फंडातून गुंतवणूक असणार्यांचे परतावे दोन अंकी वाढ दर्शवत असून हे 'अच्छे दिन' सातत्याने चालणार का? अद्याप पुढे किती, घसरणीची शक्यता किती, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत असतात. भारतीय शेअर बाजाराचे मूल्य आता 3.5 लाख कोटी रुपयांच्या वर गेले आहेत. आगामी 3 ते 4 वर्षांत सेन्सेक्स लाखाचा टप्पा पार करणार असल्याचे आशावादी चित्र सध्या अनेक तज्ज्ञ मांडत आहे. सेन्सेक्सच्या या कामगिरीचे गुपित आणि भविष्य समजून घेताना प्रथम हे लक्षात घेणे आवश्यक आहे की, युरोपियन बाजारपेठ, अमेरिका यांच्या अर्थव्यवस्था मंदीच्या सावटाखाली असून अमेरिकन डॉलर गुंतवणुकीच्या द़ृष्टीने दुबळा वाटत असल्याने विदेशी गुंतवणूक संस्था आणि देशांतर्गत गुंतवणूक संस्थांनी भारतीय बाजाराकडे आपला गुंतवणूक ओघ वळवला असून परिणामी एका आठवड्यात निफ्टी आणि सेन्सेक्स 2.4 टक्क्यांनी वाढला आहे. यामध्ये बँकिंग क्षेत्रानेही मोठी भर घातली आहे आणि बँक निफ्टीने 43 हजार 233 अंकाची मजल गाठली आहे.
विदेशी गुंतवणूकदारांना भारतीय बाजारपेठ अधिक परतावा देणारी वाटत आहे. याचे महत्त्वाचे कारण अर्थव्यवस्थेत असणारी उत्पन्नवाढीची क्षमता! वाढती आणि मोठी लोकसंख्या, वाढते उत्पन्न, मध्यमवर्गीयांचे वाढते उत्पन्न आणि खर्चिक वृत्ती या सर्व गोष्टींचा परिणाम कंपन्यांची सकारात्मकता किंवा फायदेशीर कामगिरीतून व्यक्त होत आहे. आयसीआयसीआय, अॅक्सिस बँक, बजाज ऑटो, मारुती, नेस्ले या प्रातिनिधिक कंपन्यांकडे पाहिल्यास हे स्पष्ट होते.
'गुंतवणुकीचा चमकता तारा', असे जागतिक स्तरावर भारताबद्दल नाणेनिधीने मत व्यक्त केले आहे. गतवर्षी 50 बिलियन डॉलर्स इतकी विदेशी गुंतवणूक भारतात करण्यात आली असून भारतीय अर्थव्यवस्था जगातील सर्वाधिक तिसर्या क्रमांकाची ठरली आहे. भारतीय हवाई क्षेत्राचा विकास हे वाढत्या उत्पन्न पातळीचे दर्शक असून इंडिगो कंपनीने 500 विमाने खरेदी करण्याचे ठरवले आहे. ही सर्वात मोठी विमान खरेदी ऐतिहासिक उच्चांक गाठणारी आहे. रशिया आणि चीन या मोठ्या अर्थ व्यवस्था जागतिक विकासात आता मोठे योगदान देऊ शकत नाहीत हे स्पष्ट झाल्याने विकास क्षमता, गुंतवणुकीचा लोंढा भारताकडे वळत आहे.
याचे प्रतिबिंब शेअर्स निर्देशांकात दिसले आहे. 1982 मध्ये सुरू झालेला शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्स अनेक धक्के पचवत 1992 मध्ये 4 हजार 500 अंक, 1999 मध्ये 5 हजार अंक, 2007 मध्ये 8 हजार 200 अंक, 2008 मध्ये 20 हजार अंक, 2021 मध्ये 50 हजार अंक, सप्टेंबर 2021 मध्ये 60 हजार अंक आणि जुलै 2023 मध्ये 65 हजार 785 अंकाचा अंक गाठला आहे, असे असले तरी 'मंजिले और भी है' हे महावास्तव आपण विसरता कामा नये!
शेअर बाजारात नेहमीच चढ आणि उतार येत असतात. शेअर्स बाजारातील तेजी एका टप्प्यानंतर फायदा वसुली करून देणारी असते तर कधी कधी घसरण सुरू होते. तांत्रिक द़ृष्टीने अंदाज व्यक्त करणारे निफ्टी 19 हजार अंकानंतर घसरण दर्शवेल, असे म्हटले होते. प्रत्यक्षात हा टप्पा बराच मागे पडला असून बाजाराने आगेकूच चालूच ठेवली आहे. जागतिक स्तरावर इतरत्र गुंतवणूक संधी वाढल्या तर गुंतवणूक ओघ बदलू शकतो. परंतु ही शक्यता नजीकच्या भविष्यकाळात फार कमी दिसते. आपला शेअर बाजार आता किंमत नफा गुणोत्तराच्या स्वरूपात 70 टक्के असून हेच प्रमाण अमेरिकन आणि अन्यत्र 10 टक्के आहे. यावरून भारतीय कंपन्यांचे मूल्यांकन आकर्षक नाही. तथापि वृद्धीची खात्रीशीर संभाव्यता आणि नफा विस्तार आणि निकषांवर भारतीय बाजार महत्त्वाचा ठरतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अलीकडील अमेरिकन दौरा आणि त्यातून संरक्षण, व्यापार, तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूक करार हे भारतीय बाजारपेठेचे महत्त्व स्पष्ट करत आहे.
गुंतवणूकदारांचे आयपीओमार्फत गतवर्षी 19 बिलियन डॉलर्स कंपन्यांकडे आले. त्यातून गुंतवणूकदारांचा त्यांच्यावरील विश्वास व्यक्त होतो. चांगल्या कंपन्यांचा आयपीओ 107 पट भरणा होतो ही आपल्या बाजाराची सक्षमता स्पष्ट करते. बाजाराची सकारात्मक दिशा ही एकदिशा नसते. त्यात घसरण ही नव्याने गुंतवणुकीस आकर्षण ठरत असते. त्यामुळे घसरणीच्या भयाने बाजार सोडण्याचा प्रयत्न छोट्या गुंतवणूकदारांनी न करता घसरण झाल्यास गुंतवणूक वाढीचे धोरण ठेवणे आवश्यक ठरते. पार्टी की अभी शुरुवात है! हे विसरू नये. पण येणारी घसरण ही शेअर बाजाराची नियमितता असते हे लक्षात घ्यावे. शेअर बाजारात नेहमीच चढ आणि घसरण होत असते. मात्र सध्या भारतीय बाजार सकारात्मक दिशा दाखवत आहे. त्यामुळे गुंतवणुकीचा कल वाढत असल्याचे चित्र आहे. भविष्यात भारतात अनेक उद्योग येण्याची शक्यता आहे. गुजरातमध्ये सेमी कंडक्टरचा भारतातील पहिला प्रकल्प लवकरच उभारला जात आहे. ट्विटर आणि टेस्ला कंपनीचा मालक अॅलन मस्क यांनीही भारत हा जगातील कोणत्याही अन्य देशांपेक्षा गुंतवणुकीस सर्वोत्तम देश असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मस्क भविष्यात भारतात गुंतवणूक करण्याच फारच उत्सुक आहेत. येऊ घातलेल्या प्रकल्पामुळे देशात तरुणांना नवी रोजगाराची संधी मिळवून देण्याची शक्यता आहे. भविष्यातील गुंतवणुकीमुळे शेअर बाजारात चांगले दिवस येण्याची अपेक्षा बाळगायला हरकत नाही.