सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातारा शहराच्या पश्चिमेस पावसाचा जोर वाढला आहे. मान्सून सक्रिय होत असताना कास परिसर व डोंगररांगांत अनेक रानभाज्या उगवल्या आहेत. जुने, अनुभवी व्यक्ती रानोरानी दुर्मीळ रानभाज्या शोधून आणत आहेत. या रानभाज्यांचा समावेश ग्रामीण भागातील व्यक्तींच्या आहारात सर्रास होत असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
कास पठार परिसरात काही थंड तर काही उष्णवर्गीय रानभाज्या उपलब्ध होत असतात. भारंगीची भाजी विशेष आवडीने खाल्ली जाते. या भाजीच्या पानात लोह जास्त असल्याने पचनक्रिया सुधारते. ही भाजी खोकला व कफ कमी करण्यासाठी गुणकारी आहे.
आळू, शेंडवल, आक्वल, भोकरी, तरळी, वाघचौवडा, अळंबी, मोरशेडा, कुरडू, रानआळू आदींसारख्या गोड, आंबट, खारट चव असणार्या नैसर्गिकरीत्या उगवलेल्या पौष्टिक, औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे रासायनिक खत नसल्याने पावसाळा ऋतूत भाज्यांचे सेवन केल्याने शरीरास आरोग्यद़ृष्ट्या महत्त्वाच्या ठरतात.
पावसाळा सुरू झाला की साधारण जून महिन्यापासून या रानभाज्या निसर्गत: कास तसेच आसपासच्या डोंगराळ भागात उगवून येण्यास सुरुवात होते. रानभाज्या दसरा, दिवाळीपर्यंत उपलब्ध असतात. सध्या कास परिसरासह आसपासच्या सर्व डोंगराळ भागात या रानभाज्या मुबलक प्रमाणात उगवून येण्यास सुरुवात झाली आहे. स्थानिक ग्रामस्थ या भाज्यांचा समावेश आहारात करतात. शहरी भागात अशा रानभाज्या खायला मिळणे म्हणजे फारच दुर्मीळ. जवळच्या बाजारपेठेतदेखील ग्रामस्थांकडून या रानभाज्या विक्रीस नेल्या जातात. कोणत्याही खताविना उगवून आलेल्या या रानभाज्या पावसाळ्यात पर्वणीच असते. सध्याच्या घडीला कास पठार व परिसरात पावसाचा जोर हळूहळू वाढू लागला आहे. यानंतर रानभाजा उगवण्यास सुरूवात होणार आहे. त्यामुळे जुलै अखेर किंवा ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभी या रानभाजा तोडण्यासाठी येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.