पुढारी ऑनलाईन डेस्क : पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेना नेते रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आली असून याचे पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. सोशल मीडियातून हे पत्र व्हायरल झाले आहे.
मागील काही दिवसांपासून रामदास कदम पक्षनेतृत्वावर नराज होते. आपली ही नाराजी कदम यांनी आज उद्धव ठाकरे यांना पत्रामार्फत कळवत पक्षनेतेपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. त्यांचे पुत्र व आमदार योगेश कदम शिवसेनेचे बंडखोर नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात आधीच दाखल झाले आहेत. त्यामुळे रामदास कदम यांच्या राजीनाम्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे. कदम यांनी आपला राजीनामा उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला आहे.
या पत्रात रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अनेक आरोप केले. "शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी माझी शिवसेना नेतेपदी नियुक्त केली होती. मात्र, शिवसेना प्रमुखांचे निधन झाल्यानंतर नेतेपदाला कुठलीही किंमत राहिली नाही, हे मला पहायला मिळालं," अशी खदखद रामदास कदम यांनी बोलून दाखवली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी रामदास कदम यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला.
शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचीदेखील शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. अडसूळ यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर अडसूळ शिंदे गटात सामील होण्याची शक्यता वर्तविली जात होती. तसे संकेत अडसूळ यांचे पुत्र अभिजित अडसूळ यांनी दिले होते. "गेल्या कित्येक वर्षांपासून एकनाथ शिंदे जेव्हा मंत्री होते, तेव्हा मी हक्काने त्यांच्याकडे जायचो. अगदी रात्री २ वाजता देखील त्यांच्याकडे गेलो, तरी त्यांचे दरवाजे उघडे असायचे. त्यामुळे गट-तट मी मानले नाहीत. मी शिवसैनिक आहे. एकनाथ शिंदे दाखवतील, त्या दिशेने चालणारा मी शिवसेना कार्यकर्ता आहे," असे अभिजित अडसूळ यावेळी म्हणाले होते. त्यामुळे आनंदराव अडसूळ यांनी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचे आज आदेश दिले आहेत.