अलिबाग,महाड; पुढारी वृत्तसेवा : मातृभूमीच्या रक्षणार्थ जम्मू काश्मिरमधील दूर्गम भागातील सीमेवर कार्यरत रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यांतील ईसाने कांबळे गावांतील जवान राहूल आनंद भगत परकियांबरोबर मुकाबला करिता असताना रविवार (दि. 2 ऑक्टोबर) रोजी संध्याकाळी वयाच्या अवघ्या 28व्या वर्षी शहिद झाले असल्याची माहिती रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी दैनिक 'पुढारी'शी बोलताना दिली आहे.
2 ऑक्टोबर या महात्मा गांधी जयंती व लालबहाद्दूर शास्त्री जयंती निमीत्ताने देशभरात पाळण्यात येणार्या अहिंसा दिनीच राहूल भगत यांना विरगती प्राप्त झाली आहे. दरम्यान शहिद राहूल भगत यांच्यामागे पत्नी, मुलगा,आई व वडिल असा परिवार असल्याची माहिती महाड उप विभागीय महसुल अधिकारी प्रतिमा पूदलवाड यांनी दिली.
शहिद राहूल भगत यांचे पार्थीव मंगळवारी त्यांच्या मुळ गावी म्हणजे ईसाने कांबळे येथे आणण्यात येणार असल्याची माहिती भारतीय लष्कराच्या सूत्रांनी दिली आहे. दरम्यान शहिद राहूल आनंद भगत यांचे पार्थिव भारतीय लष्कराच्या माध्यमातून त्यांच्या गावी आणल्यावर त्यांच्यावर संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यविधी करण्यात येणार असल्याचे महाड उप विभागीय महसुल अधिकारी पूदलवाड यांनी सांगीतले.