Latest

Lok Sabha Election : जागावाटपावरून राहुल गांधी यांची पवार-ठाकरेंसोबत ‘फोन पे चर्चा’

Arun Patil

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रातील जागावाटपाचे अडलेले 'मविआ'चे गाडे पुन्हा हलू लागले आहे. भारत जोडो न्याय यात्रेतून वेळ काढून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचे समोर आले आहे. जागावाटपाबाबत 'मविआ'ची येत्या 27 तारखेला बैठक होणार असून त्यात तोडगा निघण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. (Lok Sabha Election)

काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल गांधी यांनी प्रारंभी शरद पवार यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून तब्बल तासभर चर्चा केली. या चर्चेचा सविस्तर तपशील समोर आला नसला तरी ज्या जागांवरून घोडे अडले आहे, त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न दोन नेत्यांतील चर्चेत झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्याचे चित्र 27 तारखेला होणार्‍या बैठकीत दिसेल, अशी आशा काँग्रेसच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे. (Lok Sabha Election)

दरम्यान, काँग्रेस आणि ठाकरे गट यांच्यात रामटेक, हिंगोली, जालना, वायव्य मुंबई, द. मध्य मुंबई, शिर्डी, भिवंडी आणि वर्धा या जागांवरून रस्सीखेच सुरू आहे.

सध्याच्या सुचवण्यात आलेल्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार काँग्रेसला 14, ठाकरे गटाला 15 आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला 9 जागा असे वाटप सुचवण्यात आले आहे. त्यात वंचित बहुजन आघाडी आणि स्वाभिमानी पक्षाला ठाकरे गटाच्या कोट्यातून प्रत्येकी एक जागा सोडली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT