मुंबई, पुढारी वृत्तसेवा : शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटींमुळे महाविकास आघाडीतील संभ्रमाचे वातावरण वाढले आहे. शरद पवारांशिवाय विरोधी आघाडीची मोर्चेबांधणी करण्याचे संकेत शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसकडून दिले जात आहे. त्यातच बुधवारपासून ठाकरे गटाने लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्याचे नियोजन केले आहे. यात पवारांचा बालेकिल्ला मानल्या जाणार्या बारामती लोकसभा मतदारसंघाचाही आढावा घेतला जाणार आहे.
शरद पवार आणि अजित पवारांची भेट ही कौटुंबिक असल्याची बतावणी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून केली जात आहे. ही काका-पुतण्याची भेट होती, अशी सारवासारव राष्ट्रवादीकडून करण्यात आली असली तरी शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस नेत्यांनी मात्र या भेटींबाबत साशंकता व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांच्या मातोश्री निवासस्थानी झालेल्या भेटीतही या घडामोडींबाबत चर्चा झाली. त्यामुळे शरद पवार यांना वगळून राजकीय आघाडीची, समीकरणांची तयारी ठेवण्याचा विचार दोन्ही पक्षात सुरू असल्याचे समजते. त्यातच ठाकरे गटाने राज्यातील सर्व 48 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
येत्या चार दिवसात पहिल्या टप्प्यात 16 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे. मातोश्री निवासस्थानी होणाऱ्या या बैठकांना संबंधित मतदारसंघातील साधारण तीस प्रमुख पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यात, संबंधित लोकसभा मतदारसंघासाठीचे संपर्कनेते, स्थानिक उपनेते, जिल्हा संपर्कप्रमुख, स्थानिक विभागीय महिला संघटीका, जिल्हाप्रमुख, खासदार, आमदार, माजी खासदार, माजी आमदार, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख विधानसभाप्रमुख, विधानसभा संपर्कप्रमुखांना बैठकीस उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. बुधवारी नंदुरबार, धुळे, जळगाव आणि रावेर या मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे. तर, गुरूवारी नगर, नाशिक, दिंडोरी आणि शुक्रवारी मावळ, शिरूर, बारामती, पुणे लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे. शनिवारी पश्विम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे.
काँग्रेस कोअर कमिटीच्या बैठकीत होणार मतदारसंघ अहवालावर चर्चा
काँग्रेसने लोकसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्रात मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. राज्यातील सर्व 48 लोकसभा मतदारसंघांतील सद्यस्थितीबाबत पक्षातील निरीक्षक आणि समन्वयकांनी दिलेल्या अहवालावर चर्चा करण्यासाठी बुधवारी प्रदेश काँग्रेस कोअर कमिटीची विशेष बैठक मुंबईत बोलावण्यात आली आहे. या अहवालाच्या आधारे पक्षाची पुढील रणनीती ठरविली जाणार आहे.
आगामी लोकसभा निवडणुकांच्या प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच पक्षाने मतदारसंघनिहाय निरीक्षक आणि समन्वयकांची नियुक्ती केली होती. या निरिक्षकांना 15 आँगस्टपर्यंत आपापल्या मतदारसंघांचा अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार, बहुतांश लोकसभांचे अहवाल मंगळवारी रात्रीपर्यंत पक्षाकडे सादर करण्यात आले. तर, उर्वारित अहवाल बुधवारी सकाळपर्यंत सादर करण्यात येणार असल्याची समजते. या अहवालावर चर्चा करण्यासाठी बुधवारी वांद्रे येथे कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्यासह इतर वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत प्राप्त अहवालांवर सविस्तर चर्चा करून याबाबतचा एकत्रित अहवाल दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे पाठविला जाणार आहे.
दरम्यान, बुधवारच्या कोअर कमिटीची बैठकीनंतर गुरुवारी जिल्हाध्यक्षांची बैठक बोलविण्यात आली आहे. या बैठकीत पक्षाने जाहिर केलेल्या विभागीय पदयात्रेबाबत चर्चा होईल. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्षांची बैठक होईल.