पिंपरी : पुढारी वृत्तसेवा
मौजमजेसाठी दुचाकी चोरी करून त्याची विक्री करणाऱ्या दोन जणांना निगडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून चोरीच्या ३० दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे १५ पोलिस ठाण्यातील २७ गुन्हे उघडकीस आले आहेत.
राम ऊर्फ कविराज ज्ञानोबा केंद्रे (२८) आणि अविनाश तुकाराम होळंबे (२०, दोघेही रा. मु. खोकलेवाडी, पो. सुपा, ता. गंगाखेड, जि. परभणी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. निगडी पोलिस ठाण्यातील एका वाहनचोरीच्या गुन्ह्याचा तपास करीत असताना तपास पथकाचे प्रमुख सहायक निरीक्षक अंबरिश देशमुख यांनी ३०० सीसीटीव्ही कॅमेरे तपासले.
त्या वेळी त्यांना गुन्हा केलेल्या दोन संशयीत आरोपींबद्दल माहिती मिळाली. निगडी पोलिस ठाण्यातील अंमलदार दत्ता शिंदे, सुनील पवार, प्रवीण बांबळे यांनी छत्रपती संभाजीनगर येथून आरोपी राम केंद्रे आणि त्याचा साथीदार अविनाश होळंबे यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या तपासात अनेक गुन्हे केल्याची कबुली दिली.
त्या दोघांनी मिळून १५ दुचाकी चोरून नेण्यासाठी चिखली परिसरात एका पडीक जागेत लपवून ठेवल्याचे निष्पन्न झाले. तसेच, काही दुचाकी त्यांच्या मुळगावी विक्री केल्याचेही सांगितले. पोलिसांनी चोरीची वाहने विक्री केलेल्या दोन एजंटला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीच्या ५ दुचाकी हस्तगत केल्या. आरोपींना अटक झाल्याची बातमी त्यांचे मूळगाव परिसरात कळाल्याने अनेक लोकांनी विकत घेतलेल्या चोरीच्या १० दुचाकी आरोपींच्या घराबाहेर बेवारस आणून सोडल्या. ...
दोन्ही आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. मागील काळात ते चिखली परिसरात वास्तव्यास होते. दरम्यान, त्यांच्याकडे असलेली डुप्लिकेट चावी ज्या मोटारसायकलला बसेल, ती चोरी करून त्या गाड्या निर्जनस्थळी लावत. त्यानंतर मागणी प्रमाणे गावाकडे नेऊन विक्री करून, पुन्हा पुण्यात येऊन फॅब्रिकेशनचे काम करत होते. तसेच, गावी येताना - जाताना संबंधित भागातूनसुध्दा ते मोटारसायकल चोरी करत असल्याचे समोर आले आहे.
यांनी केली कामगिरी उपायुक्त स्वप्ना गोरे, सहायक आयुक्त मुगुटलाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निगडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शत्रुघ्न माळी, पोलिस निरीक्षक निलेश वाघमारे सहायक निरीक्षक अंबरिश देशमुख, पोलिस अंमलदार भगवान नागरगोजे, राहुल गायकवाड, सुधाकर अवताडे, सिद्राम बाबा, विनोद होनमाने, दत्तात्रय शिंदे, स्वप्नील पाचपांडे, तुषार गैंगजे, विनायक मराठे, सुनील पवार, दीपक पिसे, प्रवीण बांबळे, केशव चेपटे, नूतन कोंडे यांच्या पथकाने कामगिरी केली आहे.