वर्षा कांबळे पुढारी प्रतिनिधी
पिंपरी : पुढारी वृत्तसेवा
एकमेकांशी संवाद साधण्यासाठी आता प्रत्येकाच्या हाती मोबाईल आहेत; मात्र गेल्या काही वर्षांपूर्वी टपाल कार्ड हेच संवादाचे साधन होते. आपल्या दूरच्या नातेवाईकांची खुशाली कळावी, म्हणून अनेकजण पत्राची आतुरतेने वाट पहात असत; मात्र ज्या टपाल पेटीच्या माध्यमातून प्रवास करत ते पत्र आपल्या हाती पोहोचत असे, ती टपाल पेटी मात्र आता दिसेनाशी झाली आहे.
गेल्या काही वर्षांपूर्वी दळणवळणाची साधने कमी असताना टपाल कार्ड, आंतरदेशीय पत्रे हे दूरगावी राहणाऱ्या नातेवाईकांशी संवाद साधण्याचे महत्त्वाचे साधन होते. टपाल पेटीत ते पत्र टाकले की, ते साधारण तीन ते चार दिवसांनी आपल्या नातेवाईकांना मिळत असे.
त्या टपाल कार्डच्या माध्यमातून त्यांची खुशाली कळत असे; मात्र आता संगणक, मोबाईलच्या युगात पत्रलेखन काळाच्या ओघात गायब झाले आहे; तसेच त्या टपाल पेट्याही दुर्लक्षित झाल्या. पत्रलेखनाचे प्रमाण तर खूपच कमी झाले आहे. त्यामुळे टपाल पेट्याही गायब होऊ लागल्या. सध्या पत्रपेट्यांचा वापर लग्नपत्रिका, कार्यक्रम पत्रिका, मासिके यासाठी होत आहे.
मात्र, जवळपास पत्रपेटी कुठे आहे माहितच नसल्याने थेट पोस्टातच जावून टपाल द्यावे लागत आहे. पूर्वी अनेकजण आपल्या घराचा पत्ता सांगताना घराजवळ पोस्टाची पेटी असेल तर तिचा संदर्भ द्यायचे. मात्र, ई-मेलचे प्रस्थ वाढले आणि या पत्रपेट्यांचे अस्तित्व कमी झाले.
कधी रस्ता रुंदीकरणामध्ये पत्रपेट्या गायव झाल्या, तर गंजलेल्या पत्रपेट्या काढून टाकण्यात आल्या. आता पिंपरी चिंचवड शहराचा विस्तार वाढत आहे तशा नव्या वस्त्यांमध्ये नव्या पत्रपेट्याही बसविण्याची गरज आहे. मात्र, त्यांचा पूर्वीइतका वापर होत नसून, पत्रलेखनाचे प्रमाणही ५० टक्क्यांहून कमी झाले असले तरी सरकारी पत्रव्यवहरासाठी पोस्टाला पसंती दिली जाते.
शहरात अनेक जुन्या पत्रपेट्या काळाच्या ओघात गायब झाल्या आहेत. पार्सले वाढली पत्रलेखनाचे प्रमाण तर खूपच कमी झाले आहे. पत्रपेट्यांमधून पूर्वी पोस्टमन गठेच्या गड्ढे बॅगेत भरून आणायचे. या गठ्याचा आकार गेल्या काही वर्षांमध्ये कमी होताना दिसत आहे,
दरम्यान, पत्रांचे प्रमाण कमी झाले तरी पार्सलचे प्रमाण पूर्वीच्या तुलनेत प्रचंड वाढल्याचे सांगण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये जवळपास आकुर्डी, भोसरी, चिंचवड, चिंचवडगाव, दापोडी, कासारवाडी, नेहरुनगर, पिंपरीगाव, सांगवी, यमुनानगर, रुपीनगर, ताथवडे, थेरगाव, पुनावळे, तळवडे, जांबे, वाकड अशी जवळपास ३२ पोस्ट ऑफिस आहेत.
शहरामध्ये सर्व पोस्ट ऑफिसचा मिळून ६० पत्रांचा बटवडा होत असतो. दिवसाला साडेचारशे साधे, स्पीड पोस्ट १००, रजिस्टर ७० ते ८० असा व्यवहार होतो. पोस्टाच्या स्पीड पोस्ट, बिझनेस पोस्ट, एक्सप्रेस पार्सल पोस्ट,
मीडिया पोस्ट, ग्रीटिंग पोस्ट, लॉजिस्टिक पोस्ट या प्रीमियम सेवांसोबतच आर्थिक सेवांचे आकर्षण कायम राहिले. त्यामूळे सर्वसामान्य नागरिक आपली बचत पोस्ट विभागाकडे सोपविण्यासाठी इच्छुक असतात.
कुरियर कंपन्यांसोबतच बँकादेखील अप्रत्यक्षपणे पोस्टाचे प्रतिस्पर्धी ठरले. खासगी कुरियर कंपन्यांची ऑफिसेस गल्ली बोळात उघडली.
पाहता पाहता पोस्टाच्या सेवेस हजारोंच्या संख्येने प्रतिस्पर्धी निर्माण झाले. तरीही पोस्टावरच नागरिकांचा विश्वास कायम आहे. पोस्ट ही खात्रीशीर सेवा आहे.
शहरामध्ये ३२ पोस्ट ऑफिस आणि एकूण ६२ पोस्ट पेट्या आहेत असे सांगितले जाते पण काही ठिकाणी पोस्टपेट्या जुन्या झाल्या म्हणून काढल्या आहेत तिथं नवीन बसविल्या नाहीत.
त्यामुळे ६२ पोस्ट पेट्या आहेत का याबद्दल शंका आहे. तसेच काही पोस्ट पेट्या जुन्या व गंजलेल्या आहेत त्यांचा वापर होतो की नाही माहिती नाही.
पूर्वी काकडे पार्कमध्ये पोस्ट पेटी होती. पण गेल्या सात ते आठ वर्षापूर्वी काढून नेली. त्यानंतर काकडे पार्क व केशवनगर भागात कुठेही पोस्टाची पेटी नाही. या भागातील ज्येष्ठ नागरिकांनी त्यांना दरवेळी पोस्टात जाणे शक्य होत नाही त्यामुळे पोस्ट पेटीची मागणी देखील केली आहे. पोस्टामध्ये गेल्यावर नागरिकांना सहकार्य केले जात नाही अशी तक्रार आहे. पोस्ट म्हणतंय पोस्ट पेट्या आहेत तर त्या दिसत का? नाहीत.मधुकर बच्चे, (सामाजिक कार्यकर्ते)