मनीषा थोरात
मोशी: तळवडे परिसराची ओळख सांगणाऱ्या कमानीचे काम मागील चार वर्षांपासून सुरू आहे. आतापार्यंत तीन वेळा मुदतवाढ देऊनही पन्नास टक्केच काम पूर्ण झाले आहे. रस्त्याच्या मधोमध हे काम सुरू असल्यामुळे आषाढी वारी, तुकाराम बीज या दरम्यान आतापार्यंत चार वेळा कमानीचा ढाचा काढण्यात आला आहे. तसेच मजुरांचे शॉर्टेज अन् ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे हे कामकाज रखडले आहे. रखडलेल्या कामामुळे रहदारीचा प्रश्न गंभीर बनला आहे. आषाढीवारी आधीच या कमानीसाठी उभे केलेले लोखंडी अँगल काढण्याचे काम सुरू आहे. ज्यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. लवकरात-लवकर कमानीचे काम पूर्ण करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
देहू आणि आळंदी या प्रमुख तीर्थक्षेत्रांना जोडणारा हा मार्ग एमआयडीसी, आयटी पार्क, शाळा, महाविद्यालये आणि निवासी भागांमुळे कायम वर्दळीचा असतो. या मार्गावर महापालिकेकडून कमान उभारणीचे काम जून २०२२ मध्ये सुरू करण्यात आले. काम पूर्ण करण्याची मुदत जून २०२४ पर्यंत होती. मात्र, मुदत संपून दोन वर्षे उलटल्यानंतरही काम पूर्णत्वास गेले नाही. या प्रकल्पासाठी रस्त्याच्या मध्यभागी लोखंडी अँगल उभारण्यात आल्याने रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असून, अनेकदा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. तसेच राडारोड्यामुळे परिसरात धुळीचे प्रमाण वाढले असून, नागरिकांना गेल्या चार वर्षांपासून या समस्यांचा सामना करावा लागत आहे. काम वेळेत पूर्ण न केल्याबद्दल संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई सुरू असूनही प्रत्यक्षात कामाच्या गतीत फारशी सुधारणा झालेली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
रहदारीस अडथळा
देहू आळंदी तीर्थक्षेत्रांना जोडणारा मार्ग तळवडे येथून जातो. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून येणार्या वारकरी व भाविकांचे स्वागत करण्यासाठी महापालिका हद्द व देहू नगर परिषद सीमेवर भव्य स्वागत कमान उभारण्यात येत आहे. परंतु कासवगतीने सुरू असलेल्या कामामुळे व संबंधित ठेकेदाराच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका या मार्गाने प्रवास करणारे वारकरी, भाविक व स्थानिक नागरिकांना मागील चार वर्षांपासून बसत आहे. कमानीच्या कामामुळे रस्ता अरुंद झाल्याने या भागात नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. रहदारीस अडथळा येत आहे. तरी महापालिका प्रशासनाने येथील कमान लवकरात लवकर करण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.
महत्त्वाच्या नोंदी
३० जून २०२२ रोजी कामाचा आदेश कामासाठी २४ महिन्यांची मुदत (२९ जून २०२४) अद्यापपर्यंत तीन वेळा मुदतवाढ ठेकेदारास दररोज दोन हजार रुपयांचा दंड चार वर्षांनंतरही केवळ ५० टक्केच काम पूर्ण पालखी सोहळ्यापूर्वी जूनअखेरपर्यंत लोखंडी अँगल हटविण्याचे आश्वासन जुलै अखेरपर्यंत काम पूर्ण करण्याच्या सूचना.
तळवडे येथे उभारण्यात येत असलेल्या कमानीचे काम दगडाचे आहे. यामुळे कामाला वेळ लागत आहे. दोन वेळा पालखीसोहळा, तुकाराम बीज यामुळे कमानीसाठी उभारलेला ढाचा काढावा लागला. त्यानंतर मॅनपॉवर शॉर्टेज, ठेकेदाराची चूक यामुळे काम संथगतीने झाले. आता पालखी सोहळ्यामुळे कमानीच्या कामासाठी उभे केलेले अँगल काढण्याचे काम सुरू आहे. ठेकेदाराला दररोज दोन हजार रुपये दंड आकारण्यात येत आहे. काम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, दररोज कामाचा आढावा घेतला जात आहे. पुढील चार महिन्यांत हे कामकाज पूर्णत्वास जाण्याची अपेक्षा आहे.संजय काशिद, कार्यकारी अभियंता, महापालिका.
कमानीचे कामकाज लवकरात-लवकर पूर्ण होण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे सतत पाठपुरावा करत आहोत. परंतु, दगडाचे कामकाज असल्याने उशीर होत असल्याचे सांगितले जात आहे. पुढील चार ते पाच महिन्यांत हे कामकाज पूर्णत्वास नेण्यासाठीची चर्चा झाली आहे. त्यानुसार हे कामकाज लवकरात-लवकर मार्गी लागून देहू-आळंदी रस्त्यावरील जगद्गुरु संत तुकाराम महाराज प्रवेशद्वार तयार होणार आहे.प्रवीण भालेकर, नगरसेवक
प्रशासनाच्या कार्यकाळात कमानीच्या कामाकडे दुर्लक्ष झाले. संबंधित ठेकेदाराला टर्मिनेट करण्याचा विषय तत्कालीन आयुक्त यांच्यापुढे झाला होता. मात्र, प्रवेशद्वाराचे कामकाज लवकरात-लवकर पूर्णत्वास नेतो, असे आश्वासन ठेकेदाराने दिले. त्यानुसार कामकाज सुरू आहे. त्यांना प्रवेशद्वाराचा ढाचा आतापर्यंत चार वेळा काढावा लागला आहे. आता पालखीसोहळ्यामुळे काम थांबणार आहे. मात्र, पुढील चार ते पाच महिन्यांत कामकाज पूर्ण होण्याची शक्यता आहे.पंकज भालेकर, नगरसेवक