देहूगाव: भेटी लागे जीवा लागलीसे आस… या श्री संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील ओढ, तळमळ आणि विठ्ठल दर्शनाची आस जणू देहूनगरीत साकार झाल्याचे चित्र सोमवारी (दि. 6) पाहायला मिळाले. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या आषाढी पायी वारी पालखी प्रस्थान सोहळ्याच्यानिमित्ताने देहूनगरीत अवघा वारकरी संप्रदाय एकवटला असून, सर्वत्र नामस्मरण आणि हरिनामाचा अखंड गजर दुमदुमत आहे.
शेकडो दिंड्या आणि हजारो वारकरी, भाविकांच्या उपस्थितीने देहूनगरी अक्षरशः भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे. टाळ-मृदंगाच्या निनादात पुंडलिक वरदा हरी विठ्ठलचा गजर होत असून, प्रत्येकाच्या ओठांवर नाम आणि हृदयात विठ्ठलाची आस दिसून येत आहे. यंदा अनेक वर्षांनंतर इंद्रायणी नदीला आलेल्या महापुराने या सोहळ्याला वेगळेच आध्यात्मिक रूप प्राप्त झाले आहे. इंद्रायणी मातेच्या पवित्र जल मुख्य मंदिराच्या भिंतीला स्पर्श करत जणू संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेत, पालखी सोहळ्याचे स्वागतच केल्याचे बोलले जात आहे. नदीच्या या पूररूपातही भक्तांना माऊलींचे दर्शन घडत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
देहू देवस्थान संस्थानच्या वतीने सोहळ्यासाठी सर्वतोपरी तयारी करण्यात आली आहे. पहाटेपासूनच विविध धार्मिक विधींची सुरुवात झाली. पहाटे ५ वाजता श्री शिळा मंदिरात महापूजा, त्यानंतर तपोनिधी नारायण महाराज समाधी महापूजा, तसेच श्री तुकोबारायांच्या पादुकांची महापूजा संपन्न होणार आहे. सप्ताहातील कीर्तन कार्यक्रमांनंतर दुपारी मान्यवरांच्या हस्ते महापूजा होऊन पालखी प्रस्थान सोहळ्यास प्रारंभ होईल. मंगळवारी दुपारी सुमारे ३ वाजता टाळ-मृदंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या घोषात संत तुकाराम महाराजांची पालखी भजनी मंडपातून बाहेर पडणार असून, पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.
भुकेलिया बाळ अति शोक करी, वाट पाहे परी माऊलीची…या अभंगातील ओढ जशी लेकराला आईसाठी असते, तशीच विठ्ठल दर्शनाची आस प्रत्येक वारकऱ्याच्या मनात दिसून येत आहे. या भक्तिभावाच्या महासागरात देहूनगरी पुन्हा एकदा पंढरीच झाल्याचे भाविकांच्या अनुभवातून जाणवत आहे.
तुकाेबांच्या पालखी रथाचे पूजन
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी तयार करण्यात आलेला चांदीमढीत नवीन रथ सेवेसाठी दाखल झाला असून, या रथाची पूजन सोमवारी (ता. ६) सायंकाळी ६ वाजता धार्मिक वातावरणात पार पडले.
या वेळी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या पोलिस उपायुक्त श्वेता खेडकर (देहूरोड विभाग), सहायक पोलिस आयुक्त प्रवीण मोरे, पोलिस उपायुक्त विठ्ठल कुबडे, देहू देवस्थानचे पालखी सोहळाप्रमुख विक्रमसिंह मोरे, वैभवमहाराज मोरे, गणेशमहाराज मोरे, विश्वस्त उमेशमहाराज मोरे, लक्ष्मणमहाराज मोरे, कुंडलिकमहाराज मोरे तसेच आजी-माजी विश्वस्तांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली.
पूजनानंतर रथाला नवीन बैलजोडी जुंपून टाळ-मृदंगाच्या गजरात मुख्य मंदिर, चौदा टाळकरी कमान, प्राथमिक आरोग्य केंद्र, छत्रपती शिवाजी महाराज चौकमार्गे पुन्हा मुख्य मंदिर अशी भव्य मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान, इंद्रायणी नदीला आलेल्या महापुरामुळे मुख्य मंदिराच्या पान दरवाजा परिसरापर्यंत पाणी पोहोचले आहे. या पार्श्वभूमीवर देहू देवस्थान संस्थानच्या वतीने इंद्रायणी मातेची विशेष पूजा करण्यात आली. पोलिस उपायुक्त श्वेता खेडकर, माजी उपसरपंच शुभांगी मोरे तसेच महिला वारकरी भाविकांच्या हस्ते साडी-खण, नारळ अर्पण करून ओटी भरत मनोभावे पूजा करण्यात आली. या वेळी देवस्थानचे आजी-माजी अध्यक्ष, पालखी सोहळाप्रमुख व विश्वस्त उपस्थित होते.
पालखी रथासाठी खिलारी बैलांची जोडी
देहू देवस्थान संस्थानने यंदा महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील निपाणी येथून तीन बैलजोड्या खरेदी केल्या आहेत. यामध्ये देहू ते पंढरपूर पालखी रथासाठी सर्जा, राजा, हिरा, मोती या खिलारी बैलांची निवड करण्यात आली असून, चौघडा गाडीसाठी सोन्या व राजा ही जोडी असणार आहे. सोमवारी या बैलजोड्यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. देवस्थानच्या वतीने पालखी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली असून, देहू परिसरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.