खराळवाडी: भारत सरकारच्या संचार मंत्रालयाच्याअंतर्गत भारतीय टपाल विभागाने पोस्टमन काकाच्या माध्यमातून सर्व समाज घटकांना जीवन विमा योजनेचे कवच देण्याचा निर्णय घेतला आहे. सामाजिक सुरक्षेच्या अंतर्गत अंतर्भूत करण्याकरिता टपाल खात्याने हा उपक्रम हाती घेतलेला आहे. त्यासाठी पुणे शहर पूर्व टपाल विभागाने पिंपरी चिंचवड व पुणे महापालिकाअंतर्गत येणाऱ्या सर्व टपाल कार्यालयातील पोस्टमन काका, टपाल कर्मचारी यांच्या माध्यमातून पात्र नागरिकांना भारतीय डाक विभागाचा सर्वात जुना व विश्वसनीय असा टपाल जीवन विमा देण्यासाठी तसेच या योजनेची माहिती प्रसार व प्रचार करण्यासाठी पोस्ट खात्याने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
टपाल विभागाच्या माध्यमातून सन 1884 पासून सुरू असलेल्या टपाल जीवन विमा योजनेची वैशिष्ट्ये म्हणजे 20 हजार ते 50 लाखांपर्यंत विमा राशी रक्कम. सर्वात कमी हप्त्याची रक्कम. सर्वात जास्त प्रति लाख प्रतिवर्ष पाच हजार दोनशे रुपये बोनस. आपल्या सोयीनुसार परिपक्वता काल मर्यादा ठरविण्याची सुविधा. विम्याच्या हप्त्याची वार्षिक देयता यावर 2 टक्के सूट व प्राप्तिकर सवलतीसाठीचे 80 सी अंतर्गत प्रमाणपत्र सुविधा. गरज पडल्यास तीन वर्षांनंतर पॉलिसी गहाण ठेवून लोन घेण्याची सुविधा.
हप्ता भरण्यासाठी प्रत्येक वेळी पोस्ट ऑफिसमध्ये न जाता ऑनलाइन, डेबिट कार्ड, यूपीआय, क्रेडिट कार्ड तसेच आपल्या बँकेच्या पगारी खात्यातून परस्पर हप्ता वळती करण्याची सुविधा. मुलांसाठी नव्यानेच अंमलात आणलेल्या बालजीवन विमा योजनाअंतर्गत रुपये तीन लाखांचे विमा संरक्षण सुविधा. 20 हजारपासून ते 20 लाख रुपयांपर्यंतच्या आर्श्वासित टपाल जीवन विमा मूल्यासाठी कोणत्याही वैद्यकीय चाचणीची गरज नाही. टपाल विभागाच्या सर्व पोस्टमन आणि पोस्ट मास्तर यांना टपाल जीवन विमा संबंधीचे विशेष प्रशिक्षण देऊन नागरिकांना ही सुविधा देण्यासाठी तयार करण्यात आलेले आहे.
टपाल जीवन विमा कोण घेऊ शकतो?
भारत सरकारच्या आस्थापनेवरील सर्व विभागातील कर्मचारी व अधिकारी राज्य सरकारच्या स्थापनेवरील सर्व विभागातील कर्मचारी व अधिकारी सार्वजनिक सेवा क्षेत्र केंद्र व राज्य यामधील कर्मचारी व अधिकारी स्थानिक स्वराज्य संस्थेतील सर्व कर्मचारी व अधिकारी व्यावसायिक सर्व नागरिक नॅशनल स्टॉक एक्सचेंज व बॉम्बे स्टॉक एक्सचेंज अंतर्गत नोंद असलेल्या नोंदणीकृत कंपन्यांचे सर्व कर्मचारी व अधिकारी तसेच कोणत्याही विदया शाखेचा पदवीधर अथवा पदवीकाधारक वरील सर्व नागरिकांना टपाल जीवन विमा घेता येतो.
भारत सरकारच्या सर्वसामान्य जनतेच्या सामाजिक संरक्षण आणि उन्नतिकरण धोरणास अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने भारतीय टपाल विभागाने टपाल जीवन विमा योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन केले आहे. ग््रााहकांची वैयक्तिक आर्थिक उद्दिष्टपूर्ती,विकास व कौटुंबिक संरक्षण या दोन्ही बाबतीमध्ये टपाल जीवन विमा योजनेस भारतीय नागरिकांचे पहिले प्राधान्य मिळत आहे.समीर महाजन, सनदी अधिकारी, भारतीय टपाल सेवा, प्रवर अधीक्षक डाकघर, पुणे शहर पूर्व