हेमांगी सूर्यवंशी
पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस रिक्षाचालकांची मनमानी वाढत असल्याच्या तक्रारी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) प्राप्त झाल्या होत्या. यामुळे आरटीओने मार्च ते एप्रिल 2026 या दोन महिन्यांत 2 हजार 790 रिक्षांची तपासणी केली. यामध्ये 912 वाहने दोषी आढळली आहेत. तसेच, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून 5 लाखांचा दंड आकारण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या तीस लाखांच्या घरात पोहचली आहे. शहरात मोठ्या संख्येने कामगार व नोकरदारवर्ग असल्यामुळे रस्त्यावर नेहमीच रहदारी असते. शहरात 47 हजार 500 ऑटो परमिट वितरित करण्यात आले आहेत. मात्र, रिक्षाचालकांची मनमानी वाढल्याने नागरिक हैराण झाले आहे. अनेक रिक्षाचालक जादा पैसै मिळावे म्हणून पाच ते सहा आसनी रिक्षामधून प्रवासी वाहतूक करतात.
आरटीओच्या नियमाप्रमाणे प्रत्येक रिक्षाचालकांनी मीटरप्रमाणे भाडे आकारावे आणि वैध कागदपत्रे (लायसन्स, बॅज, परमिट) जवळ ठेवणे आवश्यक आहे. मात्र, रिक्षाचालकांकडून सर्रासपणे याचे उल्लघंन होत होते. हे प्रादेशिक प्रादेशिक परिवहन पिंपरी-चिंचवड (आरटीओ) कार्यालयाच्या निदर्शनास येताच मार्च ते एप्रिल या दोन महिन्यांत 2 हजार 790 रिक्षाची तपासणी करण्यात आली, यामध्ये 912 दोषी वाहने आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून 5 लाखांचा दंड आकारण्यात आला आहे.
रिक्षाचालक आणि प्रवाशांमधील वादावादीमुळे कॅबला पसंती
शहरातील अनेक रिक्षाचालक कमी अंतरावर जाण्यासाठी मीटरप्रमाणे भाडे आकारण्यास नकार देतात. त्याचप्रमाणे रिक्षाचालक दुप्पट-तिप्पट भाड्याची मागणी करतात. यामुळे नागरिकांकडून कॅबच्या पर्यायाला पसंती दिली जाते. शहरातील वाहतूक दिवसेंदिवस वाढत आहे. प्रत्येक वेळी स्वतःचे वाहन वापरणे किंवा बसने प्रवास करणे शक्य होत नाही. त्यातुलनेत रिक्षा इच्छितस्थळी सोडत असल्याने या पर्यायाला पसंती देतात. पुणे-पिंपरी चिंचवड शहरात मीटरप्रमाणे रिक्षाचे भाडे आकारणे नियमाने बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच, मीटरप्रमाणे भाड्याची मूलभूत रक्कम 18 रुपयांपासून सुरू होते. त्यानंतर अंतर वाढत जाते. बऱ्याचदा मीटरप्रमाणे भाडे आकारण्यास रिक्षाचालक नकार देतात. त्यामुळे ग्राहकांचा भ्रमनिरास होतो. तसेच, मेट्रो स्थानकाबाहेर रिक्षाचालकांकडून मनमानी भाडे आकारले जात असल्याच्या तक्रारी आल्या आहेत.
नियमाचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांवर वारंवार कारवाई केली जाते. मागील दोन महिन्यांत 5 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मीटरप्रमाणे भाडे नाकारणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात जर एखाद्या प्रवाशाने आपले सरकार या पोर्टलवर तक्रार केली तर, वाहन चालवण्याचा परवाना निलंबित केला जातो. तसेच, भाडे नाकारणाऱ्या रिक्षाचालकांकडून नियमाप्रमाणे 500 रुपये इतका दंड वसूल केला जातो.राहुल जाधव उपप्रादेशिक परिवहन आधिकारी
पिंपरी चिंचवड शहरात नवीन आलो होतो. एमआयडीसी भागात नोकरी मिळावी म्हणून त्या भागात रिक्षाचालकाला सोडायला सांगितले, परंतु रिक्षाचालकाने तू येथे उतर आणि दुसरी रिक्षा बघ, मी मीटरप्रमाणे जात नाही, असे सांगितले.शुभम नरुणी, प्रवासी
अनेक रिक्षाचालक वेगात वाहन दामटवतात. तसेच, काही रिक्षाचालक रात्रीच्या वेळेत मद्यपान करून प्रवासी वाहतूक करतात. त्यामुळे अपघात होऊन प्रवाशाचा बळीदेखील जाऊ शकतो. याकडे वाहतूक पोलिसांनी लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी.आतिश माने, प्रवासी