Pimpri Chinchwad Municipal Corporation Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Indrayani Water Pollution: इंद्रायणी नदीतून दूषित पाणीपुरवठा; पालिकेने हात झटकले

सांडपाणी व रासायनिक प्रदूषणामुळे चिखली जलशुद्धीकरण केंद्रात रसायनांचा जास्त वापर; नागरिकांमध्ये तक्रारी वाढल्या

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून निघोजे येथील इंद्रायणी नदी बंधाऱ्यातून पाणी उपसा केला जातो. तेथून चिखली जलशुद्धीकरण केंद्रात त्या पाण्यावर प्रक्रिया करून परिसरात पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र, काही दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत असल्याची ओरड सुरू आहे. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने त्याचे खापर जलसंपदा विभाग, एमआयडीसी, पीएमआरडीए, प्रदूषण नियंत्रण मंडळावर फोडले आहे. इंद्रायणी नदीत मोठ्या प्रमाणात सांडपाणी मिसळत असल्याने त्यांचा फटका शहरवासीयांना बसत असल्याचा आरोप महापालिकेने केला आहे.

शहरासाठी आंद्रा धरणात 100 एमएलडी पाणी साठा आरक्षित आहे. आंद्रा धरणापर्यंत महापालिकेने अद्याप भूमिगत जलवाहिनी टाकलेली नाही. त्यामुळे महापालिकेस थेट धरणातून शुद्ध पाणी मिळत नाही. महापालिकेने तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या निघोजे येथील इंद्रायणी नदी बंधाऱ्यातून अशुद्ध पाणी उपसा केला जातो. सध्या तेथून दररोज 90 एमएलडी पाणी उचलले जाते. ते पाणी चिखली जलशुद्धीकरण केंद्रात नेऊन त्यावर प्रक्रिया करून ते पिण्यायोग्य शुद्ध पाणी मोशी, बोऱ्हाडेवाडी, चिखली, डुडुळगाव, वडमुखवाडी, चोविसावाडी, चऱ्होली या परिसरात सोडले जाते.

निघोजे बंधाऱ्यांपासून आंद्रा धरण हे सुमारे 35 किलोमीटर अंतरावर आहे. पावसाळा वगळून आंद्रा धरणातून दररोज इंद्रायणी नदीत पाणी सोडले जाते. नदीच्या पात्रात एमआयडीसी, वडगाव नगरपंचायत, तळेगाव दाभाडे नगरपरिषद, इंदुरी ग्रामपंचायत, देहू नगरपंचायत, सांगुर्डी, खालुंब्रे, सदुंबरे या गावातील मैला सांडपाणी तसेच, रासायनिक सांडपाणी नाल्याद्वारे थेट इंद्रायणी नदीत मिसळते. मात्र, पावसाळ्याचे दिवस वगळता इतर कालावधीत नदीचा प्रवाह वेगाने वाहत नसल्याने पात्रात मैलासांडपाणी व रासायनिक सांडपाण्याचे प्रमाण अधिक असते.

नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात दूषित असल्याने महापालिकेच्या चिखली जलशुद्धीकरण केंद्रात त्या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी रसायनाचा मोठ्या वापर केला जातो. दूषित पाणी आणि मोठ्या प्रमाणात रसायनाचा वापर केल्याने त्या पाण्यामुळे शहरातील नागरिकांवर विपरीत परिणाम होत आहे. पाणी हिरवट व दूषित असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. इंद्रायणी नदी प्रदूषणाला जलसंपदा विभाग, एमआयडीसी, पीएमआरडीए, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ जबाबदार आहे. त्यांनी दुर्लक्ष केल्याने थेट इंद्रायणी नदी नाल्याद्वारे थेट मैलासांडपाणी तसेच, रासायनिक सांडपाणी मिसळत आहे. त्याचा फटका पिंपरी-चिंचवड शहराला बसत असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे मत आहे.

त्या संदर्भात महापालिकेने आयुक्त श्रावण हर्डीकर आणि अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. नदीत सांडपाणी मिसळणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना संबंधित विभागास देण्यात आल्या आहेत. दरम्यान, महापालिकेमुळे चिखली परिसरातील भागात दूषित पाणीपुरवठा होत नसल्याचा दावा पाणीपुरवठा विभागाने केला आहे. शासनाच्या दुसऱ्या विभागावर जबाबदारी झटकून अधिकाऱ्यांनी आपली चूक नसल्याचा दावा केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT