पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात सलग गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाने उद्योगनगरीला अक्षरश: झोडपून काढले. जोरदार सरींनी सगळीकडे पाणीच पाणी केले होते. रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहत होते. उपनगरांतील अनेक भागांत पाणी साचल्याने वाहतुकीचे तीनतेरा झाले होते. दिवसभर कोसळणाऱ्या जलधारांनी वातावरणात कमालीचा गारवा निर्माण केला. शहरात गेल्या २४ तासांत ५१.५ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली.
शहरालगत असलेल्या मावळ भागात जोरदार पावसाने शहरातील पवना व इंद्रायणी नद्यांना पूर आला आहे. शहर परिसरात पावसाचा जोर वाढला असून रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहत होते. सखल भागांमध्ये पाणी साचल्यामुळे पादचार्यांची चालताना कसरत होत होती.
कामानिमित्त बाहेर पडलेले नागरिक छत्री व रेनकोट असूनही भिजले होते. पावसामुळे रस्त्यावरील भाजी विक्रेते आणि टपरी, पथारीवाल्यांचे हाल झाले. सामानाची आवराआवर करताना त्यांची तारांबळ होत होती. रविवार असूनही पावसामुळे ग्राहकांची वर्दळ रोडावल्याचे दिसून आले.
नेहमी गजबजलेल्या पिंपरी बाजारपेठेत देखील पावसामुळे नागरिकांची वर्दळ कमी होती. पीएमपी बसस्थानकावर प्रतीक्षा करणार्या नागरिकांना बसशेड अपुरे पडत होते. काही ठिकाणी बसथांब्याजवळ पाणी साचल्याने प्रवाशांना उभे रहायला जागा नव्हती.
नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
पिंपरी याठिकाणी नदीकाठी वास्तव्य करणार्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शहरातील श्री मोरया गोसावी मंदिरात पाणी शिरले तर केजुबाई मंदिर व रावेत बंधारा पाण्याखाली गेला आहे. जोरदार पावसामुळे सखल भागात पाणी साचून तळे तयार झाले होते. गटारींचे पाणी नाल्यात गेल्यामुळे नाले देखील भरून वाहत होते. पावसामुळे रस्ते स्वच्छ झाले असले तरी काही ठिकाणी रस्त्यांची कामे, बांधकामे सुरु असल्याने अनेक ठिकाणी चिखल झाला होता.
शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहन चालकांना अंदाज घेवून वाहने चालवावी लागत होती. काही ठिकाणी रस्त्यावरील खडी बाहेर पडल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत होती. पावसामुळे सावकाश वाहने चालवावी लागत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडली.
पाणीच पाणी
आकुर्डी, पिंपरी, काळभोरनगर व कासारवाडी येथील भुयारी मार्गात पाणी साठले होते. निगडी, आकुर्डी, चिंचवड, वाल्हेकरवाडी, भोसरी, सांगवी, चिखली याभागत जोरदार पाऊस झाला.
श्री मोरया गोसावी मंदिरास पाण्याने वेढले
मावळ तालुक्यातील शहराला पाणी पुरववठा करणार्या पवना धरण क्षेत्रात गेल्या काही दिवसापासून पाऊस होत असल्याने पवना नदीची पाणी पातळी वाढली आहे. चिंचवडगावातील पवना नदीचे पाणी श्री मोरया गोसावी मंदिरात शिरले असून मंदिराला वेढा घातला आहे.