Pimpri Chinchwad Drain Blogging Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Drain Cleaning Monsoon Risk: पिंपरी-चिंचवडमध्ये नाले तुंबले; पावसाळ्यात पूराचा धोका वाढला

गाळ, कचरा आणि झुडपांमुळे नाल्यांचा प्रवाह विस्कळीत; प्रशासनासमोर आव्हान

पुढारी वृत्तसेवा

बजरंग मासाळ

पिंपरी: पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना पिंपरी-चिंचवड शहरातील प्रमुख नाले आणि उपनाले मोठ्या प्रमाणात तुंबलेल्या अवस्थेत असल्याचे वास्तव समोर आले आहे. साचलेला गाळ, टाकण्यात येणारा कचरा, राडारोडा, अन झुडपे यामुळे अनेक नाल्यांच्या प्रवाहात अडथळा आला आहे. पावसाळ्यापूर्वी नाले सफाईचे काम पूर्ण न झाल्यास शहरातील अनेक भागात पूरस्थितीचा धोका उद्भवू शकतो. एका बाजूला स्मार्ट सिटीचे स्वप्न दाखवले जात असताना दुसऱ्या बाजूला शहरातील नालेच गुदमरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

शहरातील अनेक मुख्य नाले आणि उपनाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने प्रवाह विस्कळीत झाला आहे. अनेक ठिकाणी नाल्यांमध्ये झुडपे वाढलेली असून काही भागांत राडारोडा आणि चिखल दिवसेंदिवस नाल्यांच्या कडेलाच पडून असल्याचे दिसत आहे. त्यामुळे मुसळधार पावसात हा गाळ पुन्हा नाल्यात वाहून जाऊन परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. उपनगरे व एमआयडीसी परिसरासह अनेक भागांतील प्रमुख नाले ,स्ट्रॉम वॉटर निचरा होण्यासाठीचे छोटे नाले पूर्ण क्षमतेने वाहू शकतील अशी स्थिती नसल्याने पावसाचे पाणी थेट रस्ते, सोसायट्या आणि व्यापारी आस्थापनांमध्ये शिरण्याची भीती व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे शहरातील अनेक नाला परिसरामध्ये उद्याने असल्याने त्या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना अत्यंत अपुऱ्या असल्याचे चित्र आहे.

काही ठिकाणी वळणाच्या ठिकाणी नाल्यांचे कठडे तुटलेल्या अवस्थेत असून त्यांची दुरुस्ती अद्याप करण्यात आलेली नाही. त्यामुळे वहानचालक,शतपावलीसाठी येणारे ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी हे नाले धोकादायक ठरत आहेत; तसेच काही नाल्यांलगतच विद्युत खांब उभे करण्यात आलेले आहेत. मुसळधार पावसात नाले तुडुंब भरल्यास पाणी विद्युत यंत्रणेला स्पर्श करून विजेचा प्रवाह उतरण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. त्यामुळे पाण्यातून मार्ग काढणाऱ्या नागरिकांच्या जीवितालाच धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.

आवश्यक उपाययोजना:

  • सर्व प्रमुख नाल्यांची युद्धपातळीवर यांत्रिक सफाई

  • काढलेला गाळ व राडारोडा त्वरित हटविणे

  • तुटलेल्या कठड्यांची तातडीने दुरुस्ती

  • नाल्यांलगतच्या विद्युत यंत्रणांची तपासणी

  • अतिक्रमणांवर कठोर कारवाई

  • पूरप्रवण भागांचे विशेष सर्वेक्षण

  • रोगराई रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक फवारणी मोहीम

संभाव्य धोके:

नाले तुंबल्याने पावसाचे पाणी वेगाने वाहून जाऊ शकत नाही. परिणामी मुख्य रस्ते, चौक, सोसायट्या आणि व्यापारी भाग पाण्याखाली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. दूषित पाणी निवासी भागातील जलवाहिनीत मिसळल्यास डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो आणि त्वचारोगांसारख्या साथींचा फैलाव होऊ शकतो. नाल्यांलगत असलेले विद्युत खांब आणि यंत्रणा पाण्याच्या संपर्कात आल्यास नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. पूर परिस्थिती उद्भवल्यास रस्ते पाण्याखाली जाऊन वाहतूक कोंडी उद्भवू शकते.

पावसाळ्यापूर्वी नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी नालेसफाईची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. ज्या ठिकाणी अडथळे, गाळ आणि कचऱ्याची समस्या आहे. तेथे तातडीने उपाययोजना करण्यात येत असून लवकरच सर्व कामे पूर्ण केली जातील.
शांताराम माने, आरोग्य सहायक अधिकारी आरोग्य विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT