पिंपरी: सर्वसामान्य लोकांना तसेच विद्यार्थ्यांना आपल्या माय मराठी भाषेची गोडी लागणे आवश्यक आहे; मात्र मराठी बोलताना अनेकदा अशुद्ध भाषा बोलली जाते. त्यामुळे शुद्ध मराठी भाषेची माहिती असणे गरजेचे आहे. या उद्देशातून भाषा अभ्यासक माधव राजगुरु हे अक्षरभारती अकादमी संस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना समजेल अशा पद्धतीने मराठी शुद्धलेखन सुधार मोहीम राबवित आहेत.
बालभारती संस्थेतील मराठी विभागप्रमुख इतकीच त्यांची ओळख नाही. तर ते कवी, लेखक, मराठी भाषेचे अभ्यासक, मराठी भाषा साहित्यविषयक चळवळीतील कार्यकर्ते म्हणूनही परिचित आहेत. लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत शुद्ध स्वरूपातील मराठी भाषेची रूजवण करण्यासाठी मराठी लेखनविषयक नियम सर्वांना समजावून सांगण्यासाठी ते धडपड करतात.
दुकानांवरील किंवा इमारतीवरील पाट्या, रस्ते नामनिर्देश करणारे फलक, जाहिरात फलक, दृकश्राव्य वाहिन्यांच्या कार्यक्रमात दिसणारे लेखन व मुद्रित प्रसारमाध्यमे यामध्ये अनेकदा अशुद्ध लेखन पहायला मिळते. यासाठी त्यांनी मराठी सुधार प्रकल्प राबविला. शिक्षक, विद्यार्थी, पालक व सामान्य वाचक यांच्याकडून होणारे अशुद्ध लेखन सुधारण्यासाठी वर्तमानपत्रामध्ये लेख प्रसिद्ध करण्यात आले. प्रश्नावली देऊन त्याआधारे मूळ समस्या व उपाययोजनांचा विचार करण्यात आला. यातून मराठी भाषेची लिपी, तिच्या लेखनविषयक अडचणी, शुद्धलेखनबाबतच्या नियमावलीतील त्रुटी, जोडाक्षरांच्याबाबत उभे राहणारे प्रश्नांबाबत लोकांची मते जाणून घेतली. त्या वेळी सुमारे 80 टक्क्यांपेक्षा जास्त लोकांना संस्कृत भाषेचे ज्ञान व लेखनविषयक नियमांची अपूर्ण माहिती असल्याचे कळाले.
या संदर्भात त्यांनी मराठी शुद्धलेखन पुस्तिका तयार केली आहे. भाषेचा वापर करणाऱ्यांना भाषा व्यवहाराचे अनौपचारिक आणि औपचारिक शिक्षण घर, परिसर आणि शाळेतून मिळत असते. असे असले तरी शब्दांची उत्पत्ती, अर्थ, शब्दांचा वापर आणि लेखनासंबंधीचे नियम माहिती असणे गरजेचे आहे. या पुस्तिकेत शुद्धलेखन म्हणजे काय? याविषयी माहिती असून, अठरा लेखनविषयक नियम समाविष्ट केले आहेत.
न आणि ण चा फरक
व्यवहारात किंवा लिखाणातदेखील अद्यापही ‘न’ आणि ‘ण’ कुठे वापरावा हे अनेकांना कळत नाही. त्यामुळे बहुतांश ठिकाणी फलकांवर चुकीच्या पद्धतीने लिखाण केले जाते. उदा. ‘प्रतिष्ठान’ हा शब्द बरोबर असताना प्रतिष्ठाण केले जाते. तर कधी अतिशुद्ध बोलण्याच्या प्रयत्नात ‘न’ चा उच्चार ‘ण’ केला जातो.
सुशोभिकरणातील घोषवाक्यांत चुका
मराठी भाषेचा प्रचार व प्रसार होण्यासाठी शहरामध्ये हिंदी व इंग्रजी भाषेतील फलक आहेत ते मराठी भाषेत हवेत. त्यामुळे मराठी भाषा संवर्धनाला हातभार लागेल. महापालिकेने शहराच्या सुशोभिकरणासाठी व जनजागृतीसाठी पुलाच्या भिंतीवर घोषवाक्ये लिहिलेली आहेत. त्यामध्ये शुद्धलेखनाच्या चुका आहेत. मराठी भाषा बोलायची असेल तर तीचे स्वरुप शुद्धच असायला हवे, अशी अपेक्षा राजगुरू व्यक्त करतात.
वर्षातून एकदा मराठी भाषा गौरव दिन साजरा करून मराठीचे संवर्धन होणार नाही. मराठीचे जतन-संवर्धन करायचे असेल, तर उगवत्या, उमलत्या पिढीवर मराठी भाषेचे उत्तम संस्कार होणे गरजेचे आहे. वास्तवात मराठी शाळा बंद पडत आहेत. पालक शिक्षणाचा खर्च पेलवत नसताना कर्ज काढून पाल्यांना इंग्रजी शाळेत घालत आहेत. दुसऱ्या बाजूने शासन याबाबतीत ठोस पावले उचलत नाही, त्यामुळे भविष्यात मराठीचे अस्तित्व टिकणार का, याचीच चिंता वाटते.माधव राजगुरू (अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था)