लोणावळा: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर लोणावळा शहरातील वाहतुकीचा ताण कमी होईल, असा दावा शासनाकडून करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात चित्र पूर्णपणे वेगळे असून, मागील तीन दिवसांत लोणावळ्यात झालेली अभूतपूर्व वाहतूक कोंडी पाहता शासनाचा हा अंदाज सपशेल चुकीचा ठरला असल्याचे स्पष्ट झाले आहे. आषाढ महिन्यातील शेवटचा रविवार लोणावळा शहर आणि ग्रामीण परिसरासाठी प्रचंड वाहतूक कोंडीचा ठरला असून, पर्यटनस्थळांवर पर्यटकांचा जनसागर उसळला होता.
पर्यटनस्थळांचे मार्ग पूर्णपणे ब्लॉक
शहरांतर्गत भागात सेंटर पॉईंट हॉटेल ते नाझर कॉर्नरपर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रीय महामार्गाप्रमाणेच लोणावळा शहर, ग्रामीण भाग आणि पवनानगर परिसरातील सर्व पर्यटनस्थळांकडे जाणारे मार्ग वाहनांनी गच्च भरले होते. भुशी डॅम, पवनानगर परिसर तसेच विविध पर्यटन स्थळांवर अक्षरशः पाय ठेवायलाही जागा नव्हती. पर्यटकांच्या या उदंड प्रतिसादामुळे परिसरातील सर्व हॉटेल्स, खासगी बंगले आणि फार्म हाऊस तुडुंब भरले होते.
हजारो पर्यटक शहरात दाखल
येत्या गुरुवारपासून श्रावण महिना सुरू होत असल्याने, आषाढाच्या शेवटच्या विकेंडचा आनंद घेण्यासाठी आणि मांसाहारी खाद्यपदार्थांच्या पार्ट्या करण्यासाठी शुक्रवारी, शनिवारी आणि रविवारी हजारो पर्यटकांनी लोणावळ्यात गर्दी केली होती. त्यामुळे मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर वाकसाई फाटा ते पाथरगाव दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सुमारे ८ ते १० किलोमीटर अंतरापर्यंत राष्ट्रीय महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला होता.
नागरिक, पर्यटकांचे हाल; पोलिसांची तारेवरची कसरत
अगदी अंतरा-अंतरावरील किरकोळ प्रवासासाठी वाहनचालकांना तासनतास गाडीतच ताटकळत राहावे लागले, ज्यामुळे पर्यटकांचा संडे पूर्णपणे वाहतूककोंडीतच गेला. या महाकोंडीमुळे स्थानिक नागरिकांना घराबाहेर पडणेही मुश्कील झाले होते. शहरातील व महामार्गावरील ही वाहतूककोंडी सोडवताना पोलिस प्रशासनाची मोठी दमछाक झाली.
मात्र, रस्त्यावर वाहनांची संख्याच एवढी प्रचंड होती की, वाहतूक सुरळीत करताना पोलिसांच्या नाकी नऊ आले होते. मिसिंग लिंकनंतरही लोणावळ्याची वाहतूककोंडीची समस्या कायम राहिल्याने भविष्यात यावर कायमस्वरूपी काय उपाययोजना केली जाणार का?, असा प्रश्न आता नागरिक आणि पर्यटकांकडून उपस्थित केला जात आहे.