Baner metro connectivity update
पंकज खोले
पिंपरी: आयटीनगरी हिंजवडी गेले काही दिवसांपासून वाहतूक कोंडी आणि पावसामुळे झालेल्या दुरवस्थेमुळे चर्चेत आहे. येथील कोंडी सोडविण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्नही सुरु आहेत; मात्र कोंडीचे चित्र जैसे थे आहे.
यातून आयटीयन्स तसेच स्थानिकांची सुटका करण्यासाठी मेट्रोकडून पावले उचलली जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे माण डेपो ते बाणेर स्टेशन दरम्यान मेट्रो धावण्यासाठी पीएमआरडीएकडून प्रयत्न सुरू आहेत. आयटीयन्सकडूनही सातत्याने मागणी होत आहे. मागणीची दखल घेतल्यास पुढील दोन महिन्यांत मेट्रो रूळावरून धावू शकेल. (Latest Pimpri News)
हिंजवडीतील वाहतूक समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच वाहतूककोंडी सोडविण्यासाठी पीएमआरडीए, एमआयडीसी आणि त्याच बरोबर वाहतूक पोलिसदेखील विविध उपाययोजना करीत आहेत. मात्र, वाहतूक कोंडीतून आयटीन्सची सुटका झालेली नाही. त्यातच पावसाच्या काळात रस्त्यावर मोटारींची संख्यादेखील वाढली आहे.
दरम्यान, ही वाहतूककोंडी कमी करुन सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे वळविण्यासठी मेट्रो सक्षम पर्याय आहे. त्याच धर्तीवर आता माण डेपोपासून पुढे पहिली दहा स्टेशन्स सुरू करता येतील का, याबाबतचे नियोजन मेट्रोकडून केले जात आहे.
दरम्यान, शिवाजीनगर ते हिंजवडी, माण या मेट्रो स्थानकाचे काम 87 टक्के झाले आहे. मेट्रोचा ट्रकचे कामही पूर्ण झाले आहे. आता केवळ स्टेशनची कामे काही प्रमाणात अपूर्ण राहिलेली आहेत. मेट्रोचे चार अत्याधुनिक रेक डेपोमध्ये दाखल झाले आहेत. तसेच, त्याचीदेखील चाचणी घेण्यात आली आहे.
त्यानंतर चार दिवसांपूर्वी माण डेपो ते पीएमआर या चार स्थानकांवर मेट्रोची चाचणी घेण्यात आली. आणखी पुढे सहा स्थानकापर्यंत चाचणी पूर्ण झाल्यावर तसेच स्थानकांची उर्वरित काम पूर्ण झाल्यानंतर मेट्रो धावण्याची शक्यता आहे.
मेट्रो सुरू करण्यासंदर्भात आयटीयन्सकडूनही सातत्याने मागणी केली जात आहे. याबाबत आयटीयन्स संघटनांकडून पीएमआरडीएकडे पाठपुरावा केला जात आहे. या पाठपुराव्यास यश आल्यास येत्या दोन महिन्यांत मेट्रो धावू शकेल.
स्थानकांची कामेही सुरू राहणार
माणपासून ते बाणेरपर्यंत काही स्थानके पहिल्या टप्प्यात सुरू करता येतील का, याचा आढावा घेण्यात आला आहे. त्यानुसार काही स्थानके सुरू करुन उरेलल्या स्थानकांची कामे सुरू राहतील. ते पूर्ण झाल्यानंतर ती टप्याटप्याने सुरू करण्याचे नियोजित आहे.
मेट्रो सुरू झाल्यानंतर आयटीयन्सचा उत्तम प्रतिसाद मिळेल. त्यातच हिंजवडी, माण आणि बाणेर हे दोन क्लस्टर सुरू झाल्यानंतर निश्चितच वाहतुकीवरील ताण कमी होईल. मेट्रो सुरू होण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. मेट्रोबरोच अन्य सार्वजनिक वाहतूक सेवाही महत्त्वाची आहे.- सुधीर देशमुख, आयटी फोरम हिंजवडी
मेट्रो लवकर सुरु करावी, अशी आमची मागणी आहे. त्यासाठी पीएमआरडीए प्रशासनाकडे अनेकदा बोलणे झाले. दरम्यान, पहिल्या टप्यात काही स्टेशन्स सुरु झाल्यास स्वागतच आहे. जेणेकरुन भुजबळ चौक, शिवाजी चौक, इंडियन ऑईल पेट्रोलपंप येथील चौकातील वाहतूककोंडी कमी होवू शकेल.- ज्ञानेंद्र हुलसुरे, हिंजवडी कर्मचारी आणि निवासी संघ, अध्यक्ष
यंदा पावसामुळे हिंजवडीतील सर्वांचे हाल झाले. सार्वजनिक वाहतूक सक्षम आणि वेळेवर नसल्याने अन्य खासगी वाहनांवर अवलंबून राहवे लागते. त्यामुळे मेट्रोचा पर्याय उत्तम राहील. जेणेकरुन हिंजवडी वाहतूक कोंडीतून लवकर सुटका होऊ शकेल.- महेश संकपाळ, आयटी अभियंता.