पिंपरी: आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाची झळ शहरात हॉटेल आणि खाणावळ चालकांना बसू लागली आहे. एलपीजी गॅसच्या विस्कळीत पुरवठ्यामुळे हॉटेल तसेच खाणावळ व्यावसायिक गंभीर संकटात सापडले आहेत. गेल्या काही दिवसांपासून व्यावसायिक सिलिंडर देणे बंद केले आहे. त्यामुळे या व्यावसायिकांना दररोजचे अन्नपदार्थ बनविणे अवघड जाऊ लागले आहे. परिणामी शहरातील सुमारे 20 ते 30 टक्के हॉटेल व खाणावळीवर मोठा परिणाम झाला असून, काही हॉटेल तसेच खाणावळी चालकांनी आपले व्यवसाय गॅसटंचाईचे संकट दूर होईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
गॅस सिलिंडर मिळणे बंद झाल्याने हॉटेल व्यावसायिकांना आपला भटारखाना सुरू ठेवणेही मुश्किल झाले आहे. अनेकांनी पर्याय म्हणून तंदूर भट्टीचा वापर सुरू केला आहे; मात्र प्रदूषणाचे कारण देत पर्यावरण विभागाने अशा भट्ट्यांवर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे व्यावसायिकांकडे पर्यायच उरलेला नाही. दुसरीकडे, शहरातील अनेक भागांमध्ये एमएनजीएल (पाइपद्वारे गॅसपुरवठा) कनेक्शन अद्याप उपलब्ध नाही. त्यामुळे हॉटेलमालक पूर्णपणे सिलिंडरवर अवलंबून आहेत. सिलिंडरचा पुरवठा खंडित झाल्याने खर्च वाढला असून सद्यस्थितीत व्यवसाय सुरू ठेवणे कठीण झाले आहे. सिलिंडर टंचाईची स्थिती अशीच राहिल्यास अनेक छोटे हॉटेल व खाणावळी काही दिवसांत बंद पडू शकतात. यामुळे केवळ व्यावसायिकांचेच नव्हे, तर त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांच्या रोजगारावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
मुख्य समस्या
गॅस सिलिंडरचा अनियमित व अपुरा पुरवठा.
कोळशावरील तंदूर भट्ट्यांवर पर्यावरण विभागाचे निर्बंध. अनेक भागांमध्ये एमएनजीएल कनेक्शनचा अभाव.
वाढलेला खर्च आणि कमी होत चाललेला व्यवसाय.
हॉटेलचालकांची मागणी
हॉटेल व खाणावळींसाठी गॅस सिलिंडरचा नियमित पुरवठा करावा.
एमएनजीएल गॅस कनेक्शनचा विस्तार शहरातील सर्व भागांत करावा.
पर्यावरण नियमांचे पालन करत पर्यायी उपाय उपलब्ध करून द्यावेत.
सध्याची परिस्थिती कायम राहिल्यास शहरातील अनेक हॉटेल आणि खाणावळींवर टाळे लागण्याची शक्यता.
परगावची लेकरं उपाशी!
पिंपरी-चिंचवड शहरात गॅसटंचाईमुळे मेस, खाणावळी, उपहारगृहे बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे परगावातून शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची उपासमार होऊ लागली आहे; तसेच उपहारगृहेदेखील बंद असल्याने शहरात शिक्षणासाठी आलेल्या परगावच्या लेकरांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे.
शहरात पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, निगडी, वाकड, हिंजवडी याठिकाणी शिक्षणासाठी परजिल्ह्यातून हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी पीजी, हॉस्टेल किंवा भाड्याने रूम करून राहत आहेत. हे विद्यार्थी सकाळी आणि रात्री मेसच्या जेवणावर अवलंबून आहेत. तसेच दिवसभरात कधी भूक लागल्यास उपहारगृहे, नाश्ता सेंटरमधून वडापाव, समोसा, इडली सांबार आदी खावून आपली भूक भागवितात. त्यामुळे कोरोनाचा काळ सोडला तर जेवणाची आबाळ त्यांनी कधी अनुभवली नव्हती. त्या वेळी किचन सुरू असल्याने निदान पार्सल सेवा तरी उपलब्ध होती. मात्र, गॅसटंचाईमुळे किचन बंद ठेवण्यात आले आहेत.
सध्या हॉटेल्स सुरू आहेत, पण हॉटेलमध्ये खाणे विद्यार्थ्यांना परवडत नाही. बहुतांश विद्यार्थी ग््राामीण आणि आर्थिक दुर्बल घटकातील आहेत. विद्यार्थी शिक्षण, राहणे, खाणे याचा खर्च कसा तरी भागवितात. गॅसटंचाईमुळे त्यांच्यावर अतिरिक्त खर्चाचा बोजा पडला आहे. कारण नाश्ता व डब्यांचे दरदेखील वाढले आहेत. मेस बंद ठेवल्यामुळे दररोज मिळणारा सकाळी आणि रात्रीचा डबा बंद झाला आहे. ज्या मेस सुरू आहेत त्या अधिक दराने डबा देतात. त्यामुळे ऐन परीक्षांच्या काळात विद्यार्थ्यांना गावी जाणेदेखील मुश्किल झाले आहे.
आयटी कंपन्यांतील कँटीननाही फटका
हिंजवडी आयटी पार्कमधील काही मोठ्या कंपन्यांमध्येही गॅसटंचाईचा परिणाम दिसू लागला आहे. कँटीनमध्ये गॅस उपलब्ध नसल्याने काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरून टिफिन आणण्याचा सल्ला दिला आहे. काही ठिकाणी फूड कोर्टमध्ये फक्त रेडी-टू-ईट किंवा कमी गॅस लागणारे पदार्थ उपलब्ध करून दिले जात आहेत.
‘पीजी’मध्ये राहत असल्याने आम्ही दररोज मित्र मेसमध्ये जेवण करतो. गॅसटंचाईची जशी समस्या उद्भवली आहे. आमच्या मेसवाल्यांनी मेस बंद ठेवली आहे. त्यामुळे आम्ही दुसऱ्या मेसवाल्यांकडून चढ्या अधिक पैसे देऊन डबा घेतो. जे मित्र घरून येतात त्यांच्याकडून कधी कधी डबा घेतो.कुशल रहाटकर (विद्यार्थी)
शहरातील उपहारगृह आणि मेस बंद असल्याने अर्धपोटी रहावे लागते. भूक भागविण्यासाठी पॅकेट फुडचा आधार घ्यावा लागतो; परंतु जेवण ते जेवणच असते. नाश्ता सेंटर बंद असल्याने वडापाव मिळणेदेखील कठीण झाले आहे. माझ्या मैत्रिणी माझ्यासाठी जास्तीचा डबा घेवून येतात.दीक्षा पवार (विद्यार्थिनी)
नेमके आमचे परीक्षांचे दिवस आहेत आणि आमच्या खाण्याची आबाळ होत आहे. सुटीचे दिवस असते तर घरी गेले असते; मात्र आता इथे राहूनच खाण्याची सुविधा शोधावी लागणार आहे.प्राजक्ता सवणे (विद्यार्थिनी)