पिंपरी चिंचवड

येवलेवाडीत उघड्यावर होतात अंत्यसंस्कार

ग्रामस्थांनी सरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली

पुढारी वृत्तसेवा

कामशेत : शासनाने गाव तेथे स्मशानभूमी करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, येवलेवाडी येथील गावाला स्मशानभूमी नसल्याने गावातील मृत नागरिकांवर उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी सरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.

ऊन असो वा पाऊस बेलवाडीमधील ग्रामस्थ तसेच पाहुणे-मंडळींना गेल्या अनेक वर्षांपासून या समस्येला सामोरे जावे लागत आहे. स्मशानभूमीच्या अभावामुळे पावसाळ्यात अंत्यविधी करताना अडचण निर्माण होत आहे. या संदर्भात ग्रामस्थांनी प्रशासनाकडे अनेकवेळा पाठपुरावा केला होता. परंतु, याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

जागेच्या प्रश्नामुळे स्मशानभूमीचा अभाव

याठिकाणी अंत्यविधी करत असेलेले ठिकाण हे वन विभागाच्या क्षेत्रात आहे. तसेच, वनक्षेत्रात स्मशानभूमी करण्यासाठी वनक्षेत्र परवानगी देत नाही व त्या शेजारी खासगी क्षेत्र आहे. त्यामुळे अंत्यविधी कुठे करायचा हा प्रश्न निर्माण होत आहे. खासगी जागा स्मशानभूमीसाठी दिली तर आसपासच्या जागेची किमत कमी होईल, त्यामुळे नागरिक स्मशानभूमीसाठी जागा देत नाहीत. 1998 पर्यंत अंत्यसंस्कार हे येवलेवाडी येथील ओढ्यालगत केले जात होते. त्यानंतर 2010 सालापासून कामशेत येथील दौडे कॉलनी शेजारी ओढ्यालगत अंत्यसंस्कार केले जात. तर, 2015 पासून येवलेवाडी येथील वन विभागाच्या जागेत अंत्यसंस्कार केले जात आहेत. त्यामुळे अंत्यविधीसाठी सतत जागा बदलली जात असल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

स्मशानभूमीच्या रस्त्याचीही मोठी समस्या

पावसाळ्यात मध्ये येवलेवाडी गावातून स्मशानभूमीपर्यंत अंत्ययात्रा नेणे म्हणजे जिकिरीचे ठरते. रस्ता नसल्याने मोठ्या प्रमाणात चिखल अशी अवस्था याठिकाणची असते. पावसाळ्यात अंत्यविधीसाठी आलेल्या पाहुण्यांना या रस्त्यामुळे मोठा त्रास होतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT