पुढारी ऑनलाईन : आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरूवात होत आहे. या पार्श्वभूमीवर नवीन संसद भवन ठरेल प्रेरणेचे केंद्र ठरेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. ते अधिवेशनापूर्वी नवीन संसद भवन परिसरात माध्यमांशी बोलत होते. (Parliament Special Session)
यावेळी पीएम मोदी म्हणाले, G20 परिषद भारतासाठी उत्सव ठरली. चंद्रावर आपला तिरंगा अभिमानाने फडकत आहे. या गोष्टी भारताच्या विकासाच्या दृष्टीकोनातून अभिमानास्पद आहेत. संसदेच्या या विशेष अधिवेशनात ऐतिहासिक निर्णय घेतले जाणार आहेत. या अधिवेशनात गेल्या ७५ वर्षांतील अनुभव आठवणींसह आपण विकसित देशाकडे वाटचाल करण्यावर आज संसदेत चर्चा होणार आहे, असेदेखील पंतप्रधानांनी विशेष संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सांगितले. (Parliament Special Session)
उद्या गणेश चतुर्थीला आपण नवीन संसदेत जाणार भगवान गणेशाला 'विघ्नहर्ता' म्हणूनही ओळखले जाते. त्यामुळे आता देशाच्या विकासात कोणतेही अडथळे येणार नाहीत. 'निर्विघ्न रूप से, सप्ने सारे, संकल्प भारत परिपूर्ण करेंगे' असे म्हणत संसदेचे हे अधिवेशन लहान असले तरी ते ऐतिहासिक ठरेल असा विश्वास देखील पीएम मोदी यांनी व्यक्त केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असेही म्हटले आहे की, "हे एक छोटेसे अधिवेशन आहे. त्यामुळे खासदारांनी जास्तीत जास्त वेळ अधिवेशनात उत्साह आणि जल्लोषाच्या वातावरणात घालवला पाहिजे. रडगाणे गाण्यासाठी भरपूर वेळ असतो, पण नवीन उमंग आणि विश्वासपूर्वक काही गोष्टी करणे गरजेचे असते. यासाठी आपण करत राहिले पाहिजे. आपल्याकडचेच आपल्याला विकसित भारत निर्माण करण्यासाठी मदत करेल. तसेच भारताच्या विकासात यापुढे कोणतेही विघ्न राहणार नाही, असे देखील पीएम मोदी यांनी स्पष्ट केले.
संसदेचे हे विशेष अधिवेशन लहान असले तरी कालांतराने ते खूप मोठे होईल. हे ऐतिहासिक निर्णयांचे अधिवेशन आहे. या अधिवेशनाचे वैशिष्ट्य म्हणजे 75 वर्षांचा प्रवास एका दिवसापासून सुरू झाला होता. या अधिवेशनाची सुरूवात जुन्या सभागृहातून होत आहे. तर उद्यापासून नवीन संसद ठिकाणाहून प्रवास पुढे नेत आहोत. २०४७ पर्यंत देशाला विकसित देश बनवायचे आहे. त्यासाठी येणाऱ्या काळातील सर्व निर्णय नवीन संसद भवनात घेतले जातील, असेही पीएम मोदी यांनी स्पष्ट केले आहे.