नवी दिल्ली ः पुढारी वृत्तसेवा आगामी 75 वर्षे ही देशातील प्रत्येक नागरिकासाठी अमृतकाळासारखी आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. रविवारी 'मन की बात' कार्यक्रमात ते बोलत होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत नागरिकांनी 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत आपापल्या घरावर तिरंगा लावावा, असे आवाहनही त्यांनी केले.
तिरंगा आपणा सर्वांना जोडण्याचे काम करतो आणि देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा देतो, असे सांगतानाच 2 ते 15 ऑगस्ट या काळात नागरिक सोशल मीडिया प्रोफाईलवर तिरंगा लावू शकतात, असेही मोदी यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान मोदी यांनी आयुष मंत्रालयाचे यश, स्टार्टअप्स्, औषधांवरील संशोधन आदी विषयांवर मते व्यक्त केली. खेळणी उत्पादनात देश प्रगती करीत असून मागील काही वर्षांत खेळणी निर्यातीत वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, कोरोनाविरोधातील लढाई अद्यापही सुरू असून या लढाईत पारंपरिक उपचार पद्धतीने मोठे योगदान दिले. चालू महिन्याच्या सुरुवातीला मेघालयात एका कार्यक्रमाची सुरुवात केली होती. यात स्थानिक संस्कृतीला दर्शविले होते. तेथील क्रांतिकारी लोकांनी संस्कृतीवर आक्रमण करणार्यांना कसे हुसकावून लावले, याचे नाट्यही सदर कार्यक्रमात दाखविले होते. अशाच प्रकारे कर्नाटकात अमृता भारती कन्नाडार्थी नावाचे अभियान चालविले होते. मोदी यांनी शहीद उधमसिंग यांच्यासह इतर शहिदांना आदरांजली अर्पण केली.
क्रांतिवीरांनी आणि स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. या कर्तव्यपथावर प्रत्येकाने चालणे आवश्यक आहे, असे मोदी म्हणाले.
मोदी म्हणाले की, स्वातंत्र्याच्या लढाईत रेल्वेने दिलेले योगदान कधीही विसरता येणार नाही. जुलै महिन्यात 'स्वातंत्र्याची रेल्वेगाडी आणि रेल्वे स्टेशन' ही मोहीम सुरू केली होती. झारखंडमधील गोमो रेल्वे स्थानक 'नेताजी सुभाषचंद्र बोस जंक्शन' या नावाने ओळखले जाते. कारण कालका मेलमध्ये बसून याच ठिकाणाहून सुभाषचंद्र बोस ब्रिटिशांना चकवा देऊन फरारी होण्यात यशस्वी ठरले होते. काकोरी रेल्वे स्थानकाचे नाव रामप्रसाद बिस्मिल आणि अशफाक उल्लाह खान यांच्याशी जोडले गेलेले आहे. देशातील अशा इतिहासाशी जोडल्या गेलेल्या 75 स्थानकांना सजविले आहे. नागरिकांनी संबंधित रेल्वे स्थानकांवर निश्चितपणे गेले पाहिजे.